Saturday, 21 February 2026

निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न

गाव झालं लई न्यारं!

पावसाळा संपला. ढेकळांचे अमाप पीक आले, हे नित्याचेच झाले. दुष्काळ दरवर्षीच येतो; परंतु लोकांनी कधी तरी, केव्हा तरी स्वप्नात इथल्या मातीचा साक्षात्कार बघितला. एका जिद्दीने रात्रंदिवस राबून कोसळलेला थेंब अन् थेंब जागीच जिरवला. सोन्याचा कोंभ रूजवून काढला. वैराण रानात नक्षत्रतारकांचे लखलखते जीवन तरारून आले! हे शब्द आहेत ना. धो. महानोरांच्या कवितेतले; पण ही कथा खानदेशातली नाही. ती आहे माणदेशातली; परंतु ती व्यंकटेश माडगुळकरांच्या ‘बनगरावडी’तल्या मास्तरांची नाही. ती आहे माणदेशातल्या निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांची. त्यांच्या माणसांची, तिथल्या मातीची, अर्थातच ‘दळवी पॅटर्न’ची!

गावाच्या परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या दळवी यांच्या प्रयत्नांची फलश्रुती पत्रकार व लेखक सुनील चव्हाण यांनी ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केली आहे. हे पुस्तक म्हणजे ग्रामविकासाचे ‘हँडबुक’ किंवा ‘कार्यपुस्तिका’ आहे. शेती आणि ग्रामीण विषयाचे जाणकार असलेले चव्हाण यांनी एका दुर्लक्षित, दुष्काळी खेड्याच्या परिवर्तनाचे चित्र शब्दबद्ध केले आहे.

खटाव तालुक्यातील (जि. सातारा) निढळचे भूमिपूत्र असलेले दळवी यांनी सुवर्णपदकासह एम.एस्सी. (ॲग्री) पदवी संपादन केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 1983 मध्ये उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारीसह विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. प्रशासकीय सेवा कार्यकाळात दळवी यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना, महत्मा गांधी तंटामुक्त गाव योजना आदी अनेक योजना संकल्पित करुन शासनाच्या वतीने त्यांची राज्यस्तरावर अंमलबजावणी केली.

घार उडे आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी’ या म्हणीप्रमाणे श्री. दळवी शासकीय सेवेनिमित्त कुठेही असले तरी त्यांचा एक पाय सतत गावकडे असायचा. त्यातूनच त्यांनी निढळमध्ये परिवर्तन घडवून आणले. ते 2018 मध्ये पुणे विभागीय आयुक्त म्हणून निवृत्त झाले; परंतु आपल्या जन्मगावचा केलेला कायापालट म्हणजे निवृत्तिनंतरचे त्यांचे उफाळून आलेले प्रेम नाही. त्यासाठी ते गेली चार दशके झटत होते. प्रशासकीय सेवेतील जबाबदाऱ्या सेवाभावी वृत्तीने पार पाडत असतानाच निढळच्या विकासावर ते जातीने लक्ष देत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ग्रामसुधारणेचा मूलमंत्र। सज्जनांनी व्हावे एकत्र। संघटना हेचि शक्तीचे सूत्र। ग्रामराज्य निर्माण करी॥ या ओव्यांचा ते अखंड कृतिशीलपणे जप करत राहिले.

आपल्या भविष्याची किंवा समृद्धीची गुरुकिल्ली आपल्याच हाती आहे, ही जाणीव निढळच्या ग्रामस्थांमध्ये रुजविण्यात श्री. दळवी यशस्वी झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिकत असताना त्यांनी आपल्या गावावर संशोधनात्मक प्रबंध तयार केला होता. जवळपास 750 माणसे मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांत रोजगारासाठी स्थलांतरीत झाल्याचे त्यांना आढळले. गावतली शाळा बंद पडण्याच्या वाटेवर होती. सततच्या दुष्काळाने गाव आपले गावपण हरवून बसले होते.

निढळकरांना एकत्र आणण्यासाठी 1983 च्या दिवाळी पाडव्याला त्यांनी घेतलेल्या ग्रामसभेत परिवर्तनाचे बीज अंकुरले. ‘निढळ नोकरवर्ग आणि व्यावसायिक संघटने’ची स्थापना केली. लोकवर्गणीतून विद्यालयाची भव्य इमारत उभी केली. गावातील विविध कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीशिवाय भौतिक विकासाला अर्थ नाही, या जाणिवेतून दळवी यांनी गावाच्या पाणलोट विकासाचा संकल्प केला; पण पदरी अपयश येऊन हा ‘नाबार्ड’चा हा प्रकल्प रद्द झाला. दळवी निराश झाले; पण हतबल झाले नाहीत. नाबार्डच्या मदतीने पुन्हा नव्याने 2006 मध्ये 1.46 कोटी रुपयांचा पथदर्शी पाणलोट विकास प्रकल्प हाती घेतला आणि तो विक्रमी वेळेत पूर्ण केला. हा तपशील रंजक आहे. 

निढळचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी 525 मिमी. आहे; परंतु पाणलोट विकासामुळे सिंचनाच्या सुविधा आल्या. बागायती पिके गावात वाढली. शेतीपूरक व्यवसाय सुरू झाले. भौतिक विकासातही गाव पुढे गेले. दलित वस्त्यांचा विकास केला गेला. विविध सुविधा गावच्या पायाभूत विकासाची साक्ष देतात. ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत एखादे कॉर्पोरेट पद्धतीचे कार्यालय वाटते. एखाद्या खेड्यात साडेतीन एकरवर सुंदर व प्रशस्त उद्यान असू शकेत, यावर क्षणभर पुस्तक वाचताना विश्वास बसत नाही. वाड्या-वस्त्या डांबरी रस्त्याने जोडल्या गेल्या. या गावाला चक्क रिंगरोड आहे.

श्री. दळवी यांनी व्यक्तिकेंद्रीत दृष्टिकोन न ठेवता गावाला केंद्रबिंदू मानून पावले टाकली. उत्साहाने सळसळणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज उभी केली. आजी- माजी सैनिकही ग्रामविकासात स्वत:ला झोकून देऊन योगदान देत आहेत. महिलांनाही ग्रामविकासात सहभागी करुन घेतले आहे. निळकंठेश्वर पतसंस्था, कार्यकारी सेवा संस्था, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा ह्या गावातल्या मुख्य अर्थवाहिन्या बनल्या आहेत. एकेकाळी मनिऑर्डवर चालणाऱ्या या गावात आता कोट्यवधींचे व्यवहार कसे होऊ लागले याचे उत्तर पुस्तकातून मिळते.

अध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीच्या वाटेवरही निढळ अग्रेसर आहे. दळवींच्या प्रयत्नांनी गावातील हेमाडपंथी पुरातन महादेव मंदिराचा 1996 मध्ये जीर्णोद्धार घडवून आणला. अंधश्रद्धा निर्मुलन आणि व्यसनमुक्तीसारख्या चळवळीही गावात रुजविल्या. गावाने ‘संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात’ प्रथम क्रमांक पटविला. ‘निर्मल ग्राम पुरस्कारा’नेही निढळचा सन्मान झाला. ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजने’तेही निढळने बाजी मारली आहे. या गौरवास्पद कामगिरीचे गमक सविस्तरपणे या पुस्तकातून उलगडत जाते.

शेती- मातीच्या भवतालातला अंधार गड होण्याची भीती संभवताना शेतकरी व ग्रामस्थांमध्ये स्वावलंबी आणि स्वाभिमानी आयुष्य जगण्याची उमेद जागविण्याचा ध्यास श्री. दळवी यांनी ऊरी बाळगला होता. तो चार दशकानंतर फलश्रुत झाला. निढळमधून रोजगारासाठी होणारे स्थलांतर आता जवळपास थांबले आहे. बाहेर गेलेली माणसं गावात परतू लागली आहेत. सर्वांगीण विकास झाला की माणसं खेड्यांकडे वळू शकतात. निढळ हे त्याचं उदाहरण आहे. दुष्काळी आणि दुर्लक्षित खेडे असलेले निढळ आता ‘परिपूर्ण गाव’ किंवा ‘स्मार्ट व्हिलेज’ कसे झाले? याचे कथनही हे पुस्तक करते. निढळच्या धरतीवर राज्यातील इतर गावांचा विकास व्हावा यासाठी दळवी यांनी समविचारी लोकांना बरोबर घेऊन सत्त्व फाउंडेशनची स्थापना केली. त्याची माहिती पुस्तकात आहे. पुस्तक संपूर्ण रंगीत असून त्यात निम्मी पाने जवळपास छायाचित्रे आहेत. निढळच्या विकासाची ती साक्ष आहे.

प्रख्यात अभिनेते आणि ‘नाम फाऊंडेशन’चे नाना पाटेकर यांची ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाचा केवळ मसुदा वाचून त्यांनी प्रस्तावना लिहिलेली नाही. त्यासाठी त्यांनी निढळला भेट दिली. गावात एक दिवस मुक्कामही केला. सगळी विकासकामे स्वतः पाहिली. एका माणसाने ध्यास घेतला तर काय आणि किती करु शकतो, याचं हे उदाहरण आहे. निढळ गावाचा कायापालट ही चंद्रकांतची कमाल आहे, असे श्री. पाटेकर यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे.

(निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न, लेखक: सुनील चव्हाण, पृष्ठे- 200,   प्रकाशक: सत्त्व फाउंडेशन, पुणे. संपर्कासाठी लेखकाचा भ्रमणध्वनी क्र. 9403855345)  

                                                                                                   -डॉ. जगदीश मोरे

 





Wednesday, 27 August 2025

#नवसाचा_गणपती #साने_गुरुजी #श्यामची_आई

 

श्यामची आई’ हा ग्रंथ लिहिणारे साने गुरुजी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. आपल्या ज्ञानामध्ये, सद्भावनांमध्ये वाढ होणार असेल आणि ती गणरायाला दाखवता येणार असेल, तर दरवर्षी गणपती आणण्याला अर्थ आहे, असं सांगणाऱ्या गुरुजींच्या नजरेतला गणपती कसा होता, त्याचा घेतलेला हा वेध…

श्यामची आई’ हा ग्रंथ लिहिणारे साने गुरुजी आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. आपल्या ज्ञानामध्ये, सद्भावनांमध्ये वाढ होणार असेल आणि ती गणरायाला दाखवता येणार असेल, तर दरवर्षी गणपती आणण्याला अर्थ आहे, असं सांगणाऱ्या गुरुजींच्या नजरेतला गणपती कसा होता, त्याचा घेतलेला हा वेध.

अमळनेरच्या खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये साने गुरुजी 17 जून 1924  रोजी शिक्षक म्हणून रूजू झाले. त्याच वर्षी शाळेतल्या गणेशोत्सवालाही प्रारंभ झाला. या शाळेचे पुढे प्रताप हायस्कूल असे नामकरण झाले. साने गुरुजींवर या शाळेच्या छात्रालय (वसतिगृह) प्रमुखाचीही जबाबदारी सोपवलेली होती. तिथे साने गुरुजी ‘छात्रालय’ नावाचे दैनिक दररोज पहाटे उठून स्वहस्ताक्षरात लिहून काढायचे. ‘छात्रालया’च्या एका अंकात गुरुजींनी लिहिले होते, छात्रालयाच्या ग्रंथालयात गणेश चतुर्थीच्या सुमारास बरीच नवीन पुस्तके मागविली आहेत. ती येणार आहेत. मुलांनी वाचावित इच्छा असेल तर. ‘यंग इंडिया’ही आठ दिवसांनी येऊ लागेल. मी स्वत: ‘क्रॉनिकल’ घेणार आहे. तोही छात्रालयात ठेवित जाईन. वाचीत जा म्हणजे झाले.

निरोगी आरोग्य व सतेज बुद्धीबाबत गुरुजींनी एका अंकात नमूद केले आहे, पुढील वर्षी आपण देवास या. सिद्धीविनायक विश्वेश्वरास पुन्हा आणू; परंतु या वर्षापेक्षा पुढील वर्षी आपल्या मनाची वाढ, हृदयातील सद्‌भावनांची वाढ, बुद्धीची वाढ व शारीरिक बलाची वाढ आपणास त्यास दाखविता आली पाहिजे. पुढील वर्षी गणपती येईल, त्यावेळी प्रत्येक काम, नवीन ज्ञान देवापुढे मांडावे. म्हणजे त्यास आनंद होईल.

मुलांच्या प्रगतीच्या अनुषंगाने गुरुजी लिहितात, गणपती बाप्पा दरवर्षी आपली सुधाराणा पाहण्यास येतो. त्याला मुलांची सर्वांगीण सुधारणा दिसली, तनमन सुसंस्कृत दिसले तर तो आनंदाने चार दिवस राहील. नाही तर त्यास आपल्याबद्दल दया, प्रेम वाटणार नाही.

साने गुरुजींनी प्रताप हायस्कूलमधील नोकरीचा 1930 मध्ये राजीनामा दिला होता. नंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यांच्याजवळ आजोबांकडची गणपतीची लहान सुंदर पितळी मूर्ती होती. ती मूर्ती ते नेहमी खिशात ठेवत असत. एका मित्राने ती मूर्ती त्यांच्याकडून मागितली. गुरुजींना क्षणभर मोह पडला; परंतु त्यांनी ती मूर्ती त्याला देऊन टाकली. कारण विरक्त वृत्ती हीच त्यांच्या जगण्याची प्रेरणा होती.

साने गुरुजींनी ‘साधना’ साप्ताहिकातून आपली पुतणी सुधास (सुधा साने-बोडा) उद्देशून पत्रं लिहिली होती. ती पत्रं सुधास उद्देशून असली तरी सर्वच वाचकांमध्ये, विशेषत: मुलांमध्ये जिज्ञासा उत्पन्न करणारी होती. सप्टेंबर 1949 च्या अंकातील पत्रामध्ये त्यांनी नमूद केले होते, गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय केला. या दहा दिवसांत एकत्र यावे, ज्ञानाची उपासना व्हावी, राष्ट्रीय वृत्ती वाढावी, असा त्यांचा हेतू. आज राष्ट्र स्वतंत्र आहे. आपण आपल्या उत्सवाला सर्वांना बोलवावे. कुरुंदवाड गणेशोत्सवात मुसलमान बंधूही पूर्वी येत. ती सुंदर प्रथा आज आहे की नाही, मला माहीत नाही.

साने गुरुजींना लहानपणी सगळेजण ‘पंढरी’ म्हणून हाक मारत असत. त्यांनी एका पत्रात आपल्या बालपणीच्या गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला होता. ते लिहितात, गौरी-गणपतीचे दिवस येणार म्हणून तयारी सुरू होती. गावात अनेकांकडे गणपतीच्या मूर्ती तयार होत होत्या. तो मुक्या पटवर्धन- तो किती सुंदर गणपती बनवतो! लहानपणी आम्ही मुले गावाबाहेर किल्ल्याकडे एका पऱ्ह्याच्या काठी जात असू. तेथे चिकण माती असे. एकदा काठाची माती काढताना मी प्रवाहात पडलो, वाहूनच जायचा! आम्ही मुलांनी त्या मातीचा गणपती केला, उत्सव केला. मारकुटे हेडमास्तरांची बदली व्हावी म्हणून. तो आमचा नवसाचा गणपती होता.

साने गुरुजींनी सुधाला लिहिलेल्या एका पत्रात नमूद केले होते, तू मागे लिहिलेस की, समितीच्या काही बायका गांधीजींबद्दल वाटेल ते बोलतात. ‘एवढा काय गांधीजींबद्दल पुळका येतो तुम्हाला?’ असे एक बाई म्हणाल्या. ते ऐकून तुला वाईट वाटले, तू उठून गेलीस वगैरे. चांगले केलेस. त्यांना पाप करू दे. तू दूर राहा. तुझ्या मैत्रिणी, तुम्ही तुमचा मानवता संघ काढा. गणपतीचा उत्सव सर्वत्र सुरू आहे. नाना प्रकारचे, नाना आकारांचे गणपती- नेहरूरूपधारी, गांधीरूपधारी असे नमुने. गणपती शेत नांगरीत आहे, असेही देखावे आहेत म्हणे. त्या-त्या वेळच्या गरजांना अनुरूप असा आपला देव बनतो.

गणपतीचे मस्तक मोठे आहे. पोट मोठे आहे. सर्वांचे अपराध तो पोटात घालील आणि थोर विचार डोक्यात खेळवील. गणपतीचे स्वरूप म्हणजे महान नेत्याचे स्वरूप. गांधीजी सर्वांचे अपराध पोटात घालीत. डोक्यात महान विचार खेळवीत. केवळ चिरफाड करणारे ते नव्हते, तर समन्वय करणारे होते. सारे जग हिंसेकडे जात असता ‘जगाला जर खरी शांती हवी असेल, तर या विशेष मार्गाने जा’ असे ते सांगणारे होते. ते साधे नव्हते, तर विनायक म्हणजे विशेष रीतीने नेतृत्व करणारे होते. अशा भावनेतून गुरुजी मुलांना गांधीदर्शन घडवत असत.

मुंबई आणि कोकणातल्या गणेशोत्सवाचे वर्णन सांगताना साने गुरुजी लिहितात, गौरी-गणपतीचे दिवस कुणबी मंडळींत फार आनंदाचे. मुली माहेरी येतात. नवी लुगडी, नवे कपडे आणि त्यांचे ते नाच. मुंबईचे रामा लोक नाचाची तालीम घेतात. तो नाच फार आवडतो. पायांत घुंगरू, हातांत निरनिराळ्या रंगांचे रूमाल. एकदम बसतात, उठतात. गिरकी घेतात. रूमाल नाचवतात. वाद्ये वाजत असतात. आनंद असतो. शेतीची कामे संपलेली असल्यामुळे हे पंधरा दिवस ते मजेत दवडतात; परंतु पाऊस नीट पडलेला असला, तर हा आनंद... नाही तर चिंताच असते.

मुळातच आपले सण-उत्सव कृषक संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत. त्याबाबत साने गुरुजी सुधाला सांगताना लिहितात, घरी आणलेल्या गणपतीभोवती आरास केलेली आहे लोकांनी. वरती ती भाळी. भाळीला कवंडळे, कांगण्या; तसेच दोडके, सहस्रफळ वगैरे भाजी-फळे. कांगण्यासुद्धा दिसतात छान. जणू बारीक सुपाऱ्यांचे पेन्द्रे! मला गणपतीच्या डोक्यावर पावसाळ्यातील फळे टांगायची कल्पना फार आवडते. जे आपण पावसाळ्यात निर्मिले, त्याचीच सजावट उपयुक्त. तेच सुंदर!

गणपतीला निरोप दिल्यानंतरच्या भावपूर्ण वातावरणाचे वर्णन करता साने गुरुजी लिहितात, गणपतीला बुडवायला नेतो, तेव्हा जरा वाईट वाटते. जणू घरातलेच कोणी जात आहे, असे वाटते. आम्ही गणपती घेऊन वाजत-गाजत कोंढीवर गेलो. चौरंग डोक्यावर घेऊन तरुण पाण्यात शिरले. ‘गणपती बाप्पा मोरया’ जयघोष होत होता. पाणी गळ्याएवढे झाले. गेले...आणखी पुढे गेले... बुडवले गणपती... मूर्ती तळाशी गेल्या...

मुंबईत 1940 मध्ये ब्राह्मण सभेच्या गणपतीच्या उत्सवात त्यांना व्याख्यानासाठी बोलावले होते. तेथे त्यांच्या व्याख्यानात विघ्न आणण्यासाठी पुष्कळ लोक आले होते. एकदा साने गुरुजींनी कुठे तरी लिहिले होते, नाशिकच्या रामाच्या रथाला हरिजनाचे हात लावू देत नसाल, तर ती...

व्याख्यानात विघ्न आणणाऱ्यांनी हस्तपत्रके वाटली होती. त्यात लिहिले होते, ते शब्द मागे घ्या न् मग बोला.

हस्तपत्रक हातात घेऊनच साने गुरुजी बोलायला उभे राहिले आणि ते म्हणाले, मी लहानपणी गणपतीचं जे अथर्वशीर्ष शिकलो, त्यात ‘सर्वे जगदिदं त्वत्तो जायते’- ‘हे सारं जग तुझ्यापासून जन्मलं’, असं म्हटलं आहे. आम्ही ब्राह्मणच त्याच्यापासून जन्मलो, असं नाही. आपण सारी प्रभूची लेकरं. त्याच्याजवळ सर्वांना जाता येत नसेल, तर तो देव कसा?

साने गुरुजी दोन तास बोलले. ती सभा शांतपणे पार पडली. विरोधक शांत राहिले. लहानपणी साने गुरुजी गणपतीच्या देवळात जायचे, उपवास करायचे, खूप फुले आणून पूजा करायचे. कालांतराने ते तसे काही करीत नसत. एखादे वेळेस देवाची आठवण आली की ते जेथे असत तिथे क्षणभर डोळे मिटून डोके टेकवत असत. तेवढ्याने त्यांना समाधान वाटे.

लहानपणी श्याम शाळेतल्या मुलांना देवादिकांच्या, साधुसंतांच्या गोष्टी सांगत असे. चातुर्मासात पालगड येथील श्यामच्या घराजवळील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. श्यामच्या घरी मुले जमली. घरातील रिकामे डब्बे घेतले. मुले डब्बे बडवत भजने म्हणू लागली, मुलांच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. पुराण ऐकायला आलेले म्हणू लागले, काय शिंची कार्टी!

हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? असे कोणी तरी म्हणाले.

श्यामची आईदेखील मंदिरातच होती. हा संवाद ऐकून ती घरी आली, श्याम!

 आईच्या आवाजातला क्रोध लक्षात येताच श्याम चपापला. भजन थांबले. डब्ब्यांचा मृदुंग मुका झाला. श्यामने विचारले, काय झाले आई?

तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला, आईने रागातच विचारले.

आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत, श्याम म्हणाला.

श्यामचे म्हणणे आईने ऐकून घेतले. मग तिने श्यामला समजावून सांगितले. श्यामला ते पटले. आई म्हणाली होती, हळूहळू टाळ्या वाजवा. ताल धरा, म्हणजे झाले. वाजविणे ही महत्त्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरड व वाजविणे हेच आवडते? श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो, ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये.

श्यामला हे उमगले. म्हणूनच मोठेपणी श्यामचे गणेशप्रेम विरक्तीकडे, मूल्यांकडे झुकले.

-डॉ. जगदीश मोर

#नवसाचा_गणपती #साने_गुरुजी #श्यामची_आई

Monday, 17 March 2025

‘ओके… सॉरी… थँक्यू!’ #OK,Sorry,Thankyou!

        ‘ओके’, ‘सॉरी’ आणि ‘थँक्यू’ हे तीन शब्दांत जादू आहे. ते माणसे जोडण्याचा कानमंत्र देतात. मानवी मूल्यांशी नाते सांगतात. त्यांना नम्रतेचा गंध आहे. सौजन्याचा साज आहे. ते अंतर्मनातील वेदनेवर हळूच फुंकर घालतात. काळजातल्या वेदनेची दाहकता कमी करतात. अचूक वेळी अंत:करणापासून प्रकट होणाऱ्या या शब्दांतून सद्‌भाव प्रदर्शित होतो. सहमती, क्षमा आणि कृतज्ञतेचे भाव त्यात सामावलेले आहेत…
        औष्णिक ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन क्षेत्रात प्रख्यात असलेले प्रफुल्ल वानखेडे यांची लिखाणातही मुशाफिरी सुरू असते. ‘केल्व्हिन’ व ‘लिक्विगॅस’सह पाच कंपन्यांचे ते संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत. शिवाय ‘लेट्‌स रीड इंडिया’ वाचक चळवळ त्यांनी आरंभली आहे. त्यांनी राज्यभरात वाचन संस्कृती रुजविण्याकरिता पुढाकार घेतला आहे. आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठीदेखील ते प्रयत्नशील असतात. जगण्याचा एकमेव आधार पैसा नसला तरी विविध आधारांपैकी तो एक महत्वाचा आधार आहे. तो स्वत:च निर्माण केला पाहिजे. अट फक्त एकच आहे, प्रामाणिक मार्गाने पुढे त्यांचे जतन, संवर्धन करता आले पाहिजे. त्याचा परीघ विस्तारता यायला हवा. त्यासाठीची कौशल्य आत्मसात करता आली पाहिजेत. तरुणांमध्ये हीच स्वप्ने पेरणाचे काम श्री वानखेडे गेली अनेक वर्षे व्याख्यानांतून, स्तंभ लेखनातून आणि पुस्तकांद्वारे करीत आहेत. त्यातूनच साकार झालेल्या त्यांच्या ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाच्या हजारो प्रती खपल्या; परंतु मी तुम्हाला आज पैशापाण्याची गौष्ट सांगत नाहीय. ही गोष्ट आहे त्यांच्या ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या नव्या कोऱ्या पुस्तकाची.
        ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या पुस्तकाचे सहलेखक आहेत व्यंगचित्रकार आलोक. राजकीय आणि सामाजिक विषयावरील तिरकत आणि उपाहासात्मक शैलीमुळे आलोक यांच्या व्यंगचित्रांचा भावार्थ मनोरंजनातून प्रबोधनाडे जाणारा असतो. त्यांच्या कुंचल्याच्या फटकऱ्यांतून आविष्कृत होणारे आशयगर्भित भाष्य मोठे मार्मिक असते. आलोक सध्या ‘सकाळ’ माध्यम समूहात राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची यापूर्वीही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
        श्री. वानखडे आणि श्री. आलोक या जोडगोळीचे ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ हे मराठीतील वेगळ्या धाडणीचे पुस्तक आहे. तसा तो छान प्रयोग आहे. शब्दांशिवायदेखील वाचकांशी संवाद साधण्याची क्षमता आलोक यांच्या चित्रांत असते; परंतु इथे वानखेडे यांच्या शब्दांच्या माध्यमातून आलोक यांची चित्रे वाचकाशी वार्तालाप करतात. आलोक यांच्या रेषा बोलू लागतात. त्याचवेळी आलोक यांच्या कुंचल्याने वानखडे यांच्या शब्दांना आशयगर्भित सौंदर्य प्राप्त होते. हीच वानखेडे व आलोक यांची शब्दचित्रे व्यक्तिगततेबरोबरच सामूहिक आत्मपरीक्षणाचा संदेश देऊ जातात. 
        ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ तीन शब्दांत जादू आहे. ते माणसे जोडण्याचा कानमंत्र देतात. मानवी मूल्यांशी नाते सांगतात. अंतर्मनातील वेदनेवर हळूच फुंकर घालतात. वेदनेची दाहकता कमी करतात. या शब्दांना नम्रतेचा गंध आहे. सौजन्याचा साज आहे. अचूक वेळी अंत:करणापासून प्रकट झालेल्या शब्दांतून सद्‌भाव प्रदर्शित होतो. हे तीन शब्द भावना व्यक्त करण्याचे एक प्रभावी साधन आहे. सहमती, क्षमा आणि कृतज्ञतेचे भाव त्यात आहेत. ‘ओके’ या सहज साध्या, सोप्या शब्दांतून व्यापक सहमती घडून येऊ शकते. सहमतीतून सहकार्य आणि सकारात्मकतेकडे वाटचाल होते. ‘सॉरी’ शब्दातही मोठी ताकद आहे. क्षमा मागण्यासाठी आणि क्षमा करण्यासाठी माणूस दर्यादिल असावा लागतो. क्षमाशीलता दुर्बलतेचे लक्षण नसते. तो संस्काराचा भाग असतो. ‘थँक्यू’ शब्दातल्या कृतज्ञतून सामंजस्याचे भाव वृदिंगत होतात. 
        ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या पुस्तकाला अनुक्रमणिका नाही आणि त्यातल्या पृष्ठांनाही अनुक्रमांक नाही; पण पानोपानी एक स्वतंत्र संदेश आहे. विचार आहे आणि त्याचा धागा आधीच्या पृष्ठावरील विचारांशी जोडलेला आहे. तरीही प्रत्येक पृष्ठाला स्वतंत्र आशय आहे. कुठेलेही पृष्ठ यादृच्छिकपणे उघडून वाचायला सुरुवात केली तरी हे पुस्तक तिथून सूरू झाल्याचा भास होतो आणि पुढच्या पृष्ठावरील मजकूर नाही वाचाला तर हे पुस्तक तिथेच संपले असावे, असेही वाटू लागते. प्रत्येक पृष्ठाची हीच तर गंमत आणि ताकद आहे. सगळे पृष्ठ मिळून एक भक्कम विचार मनात रुंजी घालू लागतो आणि हे पुस्तक एक चांगला संदेश देऊन जाते. 
        मार्शल मॅक्लुहानचे ‘माध्यम हाच संदेश’ हे प्रसिद्ध विधान संप्रेषणाच्या (communication) अभ्यासात खूप महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे पुस्तक हाच एक संदेश असतो. त्याच धर्तीवर ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या शीर्षकातच एक प्रभावी संदेश आहे. आतल्या प्रत्येक पृष्ठावर, पृष्ठावरील प्रत्येक चित्रांत किंवा संवादात एक संदेश दडला आहे. प्रत्येक संदेशात एक स्वतंत्र विचार आहे. मॅक्लुहानच्या मते माध्यम म्हणजे केवळ माहिती पोहोचविण्याचे साधन नाही, तर ते स्वतःच एक शक्ती आहे. त्या शक्तीची जाणीव या पुस्तकातून होते. 
        ‘ओके’, ‘सॉरी’ आणि थँक्यू’ या शब्दांचा वापर आपण अगणिक वेळा करत असतो. त्याचे आपण मोजमापही करू शकत नाही; पण हे शब्द किती अंतर्मनातून येतात, वेळ किती अजूक आहे (टायमिंग) आणि तुमची देहबोली काय असते? त्यावर त्यांचा प्रभाव आणि निर्मळता अवलंबून असते. प्रत्येकला हे शब्द वापरण्याचे किंवा न वापरण्याचेही स्वातंत्र्य असते. त्यातून व्यक्तिमत्व प्रतीत होते. ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ हे पुस्तक विचारांच्या स्वातंत्र्यालाच अर्पण केले आहे. त्यांची अर्पण पत्रिकाही कलात्मक आहे. प्रत्येकाला स्वत:ची ‘इकोसिस्टिम’ योग्य वाटते, तेच त्यांच्या विचाराचे स्वातंत्र्य असते आणि हाच संदेश हे पुस्तक देत असते. 
        अर्पण पत्रिकेतल्या गर्भित आशयानेच पुस्तकाची सुरुवात होते. अर्पणपत्रिकेच्या पृष्ठावर चार बाजूंना चार रेखाटणे दिसतात. त्यात कोळ्याचे जाळे, मधमाशांचे पोळ, माकड आणि मोबाईलमध्ये मग्न माणसाचे चित्र आहे. कोळ्याचे जाळे आणि मधमाशांच्या पोळ्यात सौंदर्य आहे. जाळे किंवा पोळ कुठेही दिसले की आपले लक्ष वेधून घेतात. कोळ्याचे जाळे मात्र दुसऱ्या जीवाच्या शिकारीसाठी विणलेले असते. त्याला ‘जाळ्या’ऐवजी ‘सापळा’ म्हटले की अचूक भाव व्यक्त होतो. कोळ्याचे हे जाळे ‘डिस्ट्रक्टिव्ह’ असते. मध्यमाशांचे पोळ ‘कन्स्ट्रक्टिव्ह’ असेत. त्याद्वारे मधमाशा मनस्वी आनंद घेत एकतेचा संदेश आणि भान देतात. एकसारखे षटकोन, त्यातल्या एखाद्या षटकोनाची बाजू खराब झाली तरी इतर त्याला सावरतात.
        माकड हे माणसाच्या उत्क्रांतीचा पाया आहे आणि प्रतीक आहे. मोबाईलमध्ये मग्न असलेल्या चित्रातील माणसाला तुम्ही तरुणही म्हणू शकता. अर्थात, ते तुमच्या दृष्टीवर अवलंबून आहे. माकडापासून सुरू झालेला प्रवास माणसापर्यंत आला आहे; पण माकडापासून मानवापर्यंतची ‘इवोल्यूशन’ आता मोबाईल फोनमध्ये अडकून पडली आहे. हातात मोबाईल घेऊन बसणारा माणूस आता माकडासारखा वाटायला लागलाय का? असा प्रश्न इथे उपस्थित होतो. मोबाईलमधून होणारा माहितीचा मारा किंवा भराभर रील्स पाहताना मेंदूपर्यंत काय व किती पोहचत असेल आणि त्यातल्या किती माहितीचे पचन होत असेल? हा खरोखर गंभीर विषय आहे, तेच तर ही चित्रे सूचवू पाहत नाहीत ना?
        माणसाचा मेंदू ‘युनिक’ आहे. मेंदूने विचार करायचा असतो. मोबाईल किंवा इंटरनेट हे ‘एक्सटेंडेड मेमरी’ म्हणून वापरायच्या असतात हे बहुतांश जण विसरत चालले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) कितीही विकास झाला तरी तिच्या जन्मदात्या मानवाला लाभलेली ‘क्रिएटिव्हीटी’ ही शाश्वत आहे. तेच तर माणसाला मिळालेले ते सर्वात मोठे वरदान आहे. एआय आपला ‘मास्टर’ न होता ‘असिस्टंट’ झाला पाहिजे, यासारख्या गोष्टींचे भान कदाचित हे पुस्तके देऊ पाहते.
        कलात्मक अर्पण पत्रिकेच्या अशायाची फोड करताना लेखकद्वयी नमूद करतात, “माणसानं स्वतः विचार करावा. तोच बेसिक फरक माणूस आणि इतर प्राण्यांत आहे! तोच आपला सर्वांच्या प्रगतीचा मूळ आधार आहे. तो आपण जपायला, वाढवायला हवा! आपल्या रोजच्या जगण्यात आर्थिक स्वातंत्र्य, मानसिक शांतता, कौटुंबिक सुख, सामाजिक बांधिलकी हवीच... पण हे सर्व कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आपला विवेक जागृत हवा. तो विवेक जागृत असणाऱ्या व विचार स्वातंत्र्य मान्य करणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक अर्पण!”
        अर्पणपत्रिकेपासून सुरू होणारा विचारांचा हा प्रवास मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाच्या चित्राच्या पार्श्वभूमीवरील दोन व्यक्तींतल्या संवादापासून एखाद्या गोष्टीसारखा सुरू होतो. तिथेच मराठी आस्मितेचा संदेश आणि विचार मनात डोकावतो. 105 हुतात्म्यांचे स्मरण होते. मुंबईत दुकानाच्या मराठी पाट्यांचा प्रश्न अधून मधून ऐरणीवर येत असतो; पण दुकानदार कोण? हा प्रश्न मात्र मेंदूत फारसा शिरत नाही, अशा विविध प्रश्नांवर या पुस्तकात मार्मिक भाष्य आहे. पुस्तकातील वेगवेगळी पात्र विविध विषयांवर सहज, सुलभ संवादाद्वारे भाष्य करतात. त्यातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, करियरविषयक, वाचन संस्कृती, व्यसन, टाईम मॅनेजमेंट, गरिबी, पैसा, गुंतवणूक अशा विविध विषयांना मोजक्या शब्दांत स्पर्श करण्यात आला आहे. मोजक्या शब्दांत मोठा आशय दडला आहे. आशयात विचार आहे. संदेश आहे.
        शून्य मिनिटात येतो म्हणारी व्यक्ती तासाभरानेही येत नाही, त्यावेळी ‘टाईम मॅनेजमेंट’चे बारा वाजलेले असतात. आपल्या लायकीपेक्षा किंवा क्षमतेपेक्षा जास्त काहीच मिळत नाही तरीही सोशल मीडियावरच्या ‘घरबसल्या करोडपती’ सारख्या व्हिडोओंना आपण भुलतो; परंतु लायकी किंवा क्षमता वाढविण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. मोबाईलमुळे आपण वाचनापासून दूर जात आहोत. एखादी व्यक्ती पुस्तक वाचत असल्यास तिचा मोबाईल बंद पडला असावा, एवढाच अंदाज व्यक्त करण्यापर्यंत आपली क्षमता राहिली आहे. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये पूर्वी बहुतांश जण वृत्तपत्र किंवा पुस्तक वाचताना दिसायचे. कुणी भंजनात दंग व्हायचेत. काही लोक पत्तेही कुटायचेत. आता मात्र बहुतांश जण मोबाईलमध्ये मग्न असतात. रिल बघता बघता स्वत:शीच हासतात. अर्थात, ते हसतायेत की रडतायेत ते पाहायला इतर चाकरमान्यांना वेळ नसतो. कारण तेही मोबाईमध्ये ‘बिझी’ असतात. आपला दीड जीबी डेटा भला आणि आपण भले! या दीडजीबी डेट्याने लोकल ट्रेनमधले भांडण, तंटे कमी केले आहेत. बहुतांश बिचारे गरीब मुंबईकर रील्स किंवा पायरेटेड सिनेमे अथवा वेब सिरीज बघत आपले डेस्टिनेशन गाठतात!
        ‘ओके’, ‘सॉरी’ आणि थँक्यू’मधील “प्रत्यक्ष कृतीपेक्षा कधी कधी कन्फ्युजनमुळेही दमायला होतं.” हे विधान बरेच काही संगून जाते. प्रत्यक्ष कामापेक्षा किंवा कृतीपेक्षा काही लोक नियोजनावरच जास्त भर देतात आणि ऐन कृतीच्या वेळी मात्र त्यांचा शक्तीपात झालेला असतो. “श्रीमंत दिसण्याच्या नादात अनेक जण गरीबच राहतात,” अशा विधानांच्या माध्यमातून आर्थिक सजगतेवर आणि गुंतवणुकीवरही या पुस्तकात भाष्य केले आहे; परंतु पैसा ही एकमेव गुंतवणूक नाही. ‘यशस्वी’, ‘आनंदी’ आणि ‘समाधीनी’ जीवनासाठी इतरही बाबींतही गुंतवणूक करावी लागते. आपल्या कमाईला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी ‘इमोशनल कोशंट’ आणि ‘फायनान्शिल कोशंट’ यांचा मेळ घालता यायला हवा, याची जाणीव पुस्तक वाचताना होते.  
        “दुसऱ्याला केलेली मदत लगेच विसरता आली की आपण माणूस म्हणून घडत जातो,” सुभाषितांसारखा हा संवाद पटकन आपले लक्ष वेधतो. नाही तर छटाकभर मदतीचाही आपण गावभर डंका पिटतो. “मला कोणाची गरज नाही,” असं म्हणारे लोकही भवती असतात. रागाच्या भरात आपणही असे उद्‌गार काढतो; पण ही दांभिकता असते. त्यातून फक्त अहंकार कुरवाळला जातो आणि आपल्या जगण्याचा पालापोचोळा होतो. तो वादळासोबत उडून जातो. प्रवाहासोबत वाहून जातो. हे टाळण्यासाठी आपल्या मेंदूला विचार कराण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते.
“इलेक्ट्रिक गाड्यांमुळे आता प्रदूषण होणार नाही,” असे नुकताच इंजिनियर झालेला एक तरुण आजोबांना सांगतो. त्याचवेळी आजोबांच्या मनात त्यांच्या इमेजचा कोळसा होता. इथे इंजिनियरच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थितीत होते. मुळातच लेखक वानखेडे ऊर्जा क्षेत्रातले जाणकार आहेत. त्यांनी ‘इलेक्ट्रिक कार वास्तव काय?’ या शीर्षकाचा लेख 7 नोव्हेंबर 2021 रोजी एका वृत्तपत्रात लिहिला होता. त्यात या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. आपण बऱ्याचदा भ्रमात जगतो आणि त्याला सकारात्मकतेचा मुलामा देऊन वास्तवाकडे दुर्लक्ष करतो, हे या दाव्यातून लक्षात येते.
        प्रसारमाध्यमांच्या समकालीन स्थितीवरही या पुस्तकात बोट ठेवले आहे. एक जण सांगतो, “सांभाळून हां… आजोबा ते पत्रकार आहेत.” त्यावर आजोबा विचारतात, “हो? कुठल्या पक्षाचे?” हा उपरोधिक टोला जिव्हारी लागण्यासारखा असतो; परंतु तो नाकारता कसा येईल? असे विविध संवाद वाचत ‘ओके’, ‘सॉरी’ आणि थँक्यू’ हे पुस्तक कधी संपते, ते कळतही नाही. त्यात कधी उपरोधिक, तर कधी तिरकस, तर कधी विनोदी स्वरुपाचे भाष्य आहे; पण त्यामागे एक गंभीर विचारसुद्धा असतो, तो आपल्या अंतरमनापर्यंत चपखलपणे पोहचविण्यात लेखकद्वयी यशस्वी झालेले दिसतात. 
        आपण आयुष्यभर कुठे कुठे सुख शोधत असतो. ते आपल्याच भवताली असते. ते छोट्या छोट्या छोट्या गोंष्टींत सामावेलेले असते. आपल्याला वाऱ्याच्या झुळूकमधील संगीत ऐकता यायला हवे, वृक्ष वेलींच्या पानांच्या सळसळीतली कळ लक्षात यायला हवी, समुद्राची गाज कानांत साठवता यायला हवी, आवडत्या व्यक्तीचा हातात हात घेऊन एकमेकांच्या स्पर्शाची अनुभूती घेता यायला हवी, आदी लहान सहान गोष्टींत आनंद, सुख, समाधान सामावलेले असतं! त्याच्यासाठीच तर ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ वाचायला हवे!
                                                                                                                                            -डॉ. जगदीश मोरे

Sunday, 20 October 2024

व्हॉट्सॲप ग्रुप #Whatsapp_Group

मित्रा,

नको सोडूस मित्रांचा व्हॉट्सॲप ग्रुप

कुणाशिवाय अडत नाही कुणाचं

असोत नाती मित्रत्वाची वा रक्ताची

नसेलही फायदा मित्रांच्या ग्रुपचा

नुकसान तर नक्कीच नाही ना?

 

संपर्कातून एकमेकांच्या

होईलही मदत एखाद्या मित्राला

निमित्त व्हॉट्सॲप ग्रुपचं

औचित्य ते एक मैत्रीचं

 

वाहून गेलंय बरंच पाणी

कॉलेजनंतर नळातून

नाही ना आठवत आता

मित्रांच्या मुला-मुलींची बारसे

जातोच ना आताशी त्यांच्या लग्नाला!

 

अर्धी लाकडं जातील मसणात

होईलच ना राख अहंकाराची

कशाला फुंकर गुलामगिरीची?

 

वाढली असेल बैठक एव्हाना

प्रत्येकाच्या विचारसणीची

नाही नाकारता येत

झाले असतील बदल विचारांत

झाल्याच असतील दुरुस्त्याही

 

बैठकच नसेल काहींना

नसू शकते ठाम भूमिका

त्यात गैर आहे काय?

उगाच म्हणावं कशाला

बिनबुडाचा कुणाला?

 

नकोच मित्रांच्या ग्रुपवर

विचारसरणीच्या पोस्टी

तसंही ‘फॉरवर्ड’ होण्यात

कसलं आलंय कर्तृत्व?

केली इकडची पोस्ट तिकडे

झालो फॉरवर्ड

 

द्यायलाचं पाहिजे का उत्तर

प्रत्येक विखारी पोस्टला?

नाही पचत ते एखाद्याला

मौनातही असतेच की एक उत्तर

लागू दे कस ग्रुपच्या बुद्धीचा

करू दे त्यांना भाषांतरं

तुझ्या मौनांची

 

नाही का टाळता येत हे सगळं?

नाही का निभावता येत मैत्री?

नाही का जगतायेत माणूस म्हणून?

 

घेऊनी गोड सुंगधी ओझं अंगावर

ओथंबलेला असतो वारा

तिष्ठत असतो उभा दाराशी

नाही का घेता येणार त्याला उराशी?

 

रंगरूप, लिंग, भाषा, जात, धर्म

आपला प्रांत, आपलं पद, आपलं कर्म

येतंय का मैत्रीच्या आड?

उत्तर असेल ‘होय’

तर, सोड ग्रुप आत्ताच तू

 

पण,

मित्रा, अजून विचार करं

थांब जरा,

नाही का ठरणार

आपला व्हॉट्ॲप ग्रुप

आनंदाचं कारण

कॉलेजच्या मैत्रीचं स्मरण

 

तोडूयात ना हे बांध

मैत्रीआडच्या विचारसरणींचे

आहेत ना ग्रुप त्यास्तव अन्य

प्रसंगी खोडूया मुद्दे एकमेंकांचे

सारूया झूल बाजूला अंहकाराची

 

जिवंतपणाची आहेत लक्षणं

मतभेद आणि वादविवाद

राहायलाच हवं का जीवंत प्रत्येकानं

असतं मरायचं एखाद्याला जिवंतपणी

 

विसरलो का आपण?

आपल्या बहिणाईच्या ओळी

'जगन मरन एका सासाचं रे अंतर'

 

राख किंवा माती

हेच प्राक्तन सगळ्यांचं

आहे का तिसरं काही?

असेल काही तिसरं

तर देहदान वगैरे सोडून

कर इथं ज्ञानदान आपलं

 

जाळलं तर राख, पुरलं तर माती

दिसता भेद राखेत आणि मातीत

दृष्टी नाही दृष्टिकोन तपासू

शेवटी मित्रच बरा

मित्रच खरा

                     -डॉ. जगदीश मोरे