Tuesday, 5 May 2026

प्रकाश होळकर

रानातल कवी

अमळनेरहून निघताना दुपार पार टळून गेली होती. थोडे अंतर पार केल्यावर तिन्हीसांजेचा पिवळसर प्रकाश सर्वत्र पसरला होता. जूनची दहा तारीख पाठमोरी झाली होती. तप्त उन्हाच्या झळा सोसून व्याकुळ झालेल्या वावरांचे आभाळाकडे डोळे लागले होते. कधी दोन- चार थेंब कोसळतील आणि सुगंधी श्वास सोडता येईल, या प्रतीक्षेत शेतीमाती होती. अधूनमधून आकाशात शुभ्रआभ्रखंड दर्शन देत होते. पावसाचा पत्ता नव्हता. आम्ही साधरणत: रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास पत्ता शोधशोधत कांद्याचे कोठार असलेल्या लासलगावच्या विश्रामगृहात पोहचलो.

एक तरुण समोर आला, तुम्ही कवीदादाचे पाहुणे का?

‘कवीदादा’ शब्द भारी वाटला. पत्रकार आणि कवी विजय चोरमारे आणि मी सोबत होतो. कवी आडनावसुद्धा असल्याने कवीदादा असू शकतो; पण आम्ही कवी आडनाव असलेल्या व्यक्तीच्या भेटीसाठी आलो नव्हतो. आडनाव कवी नसलेल्या; पण कविता आणि गाणी लिहिणाऱ्याच्या भेटीसाठी आलो होतो. आम्ही म्हणालो, कवीदादा नव्हे; आम्ही ‘कवी प्रकाश होळकरां’च्या भेटीसाठी आलो आहोत.

अहो, तेच ते कवीदादा!

प्रकाश होळकरांचे हे एक नवीन टोपण नाव कळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्रामगृहातून होळकरांच्या घरी निघालो. गावात शिरलो. गाव तसे मोठे आहे. रस्त्याच्या कडेला दोन- तीन डालक्यांत आंबे विकणारा मध्यम वयीन गृहस्थ बसला होता. त्याला विचारले, प्रकाश होळकराचं घर कुठल्या गल्लीत आहे?

डोकं खाजवत तो म्हणाला, लासलगावात बरेच होळकर आहेत. प्रकाश होळकर नेमकं काय करतात.

शेतकरी आहेत.

अहो, इथले बहुतांश होळकर शेतीच करतात.

तेही शेतीच करतात; परंतु कविता आणि सिनेमाची गाणीदेखील लिहितात.

असं सांगा ना! तर तुम्हाला कवीदादांच्या घरी जायचं आहे!

हो, प्रकाश होळकर- कवीदादांकडेच जायचंय आम्हाला.

समोरच्या रस्त्यानं सरळ जा. थोडं पुढं गेल्यावर डाव्या हाताला वळा. तेथेच कवीदादा राहतात.

एखाद्या कवीची आख्या गावाला त्याच्या नावाऐवजी ‘कवीदादा’ म्हणून ओळख असणे, ही गोष्ट निश्चितच कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठी आहे. कारण भालचंद्र नेमाडे यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ही ओळख ‘लेखकरावा’प्रमाणे ‘कवीराव’ अशी नाही. ती आपुलकीने, प्रमाणे ‘कवीदादा’ अशी आहे.

जनमाणसांच्या भावना शब्दरूपात अविष्कृत करणाऱ्या या कवीचे घर रानात आहे. कविवर्य ना. धो. महानोरांच्या ‘रानातल्या कवितां’चा वारसा सांगणार या ‘रानातल्या कवी’ची भेट झाली आणि कवीदादाने ‘कोरडे नक्षत्र’ मोठ्या आपुलकीच्या ओलाव्याने भेट देऊन आमचे स्वागत केले आणि गप्पांची मैफिल काव्यफुलांनी बहरून गेली. कवीदादांच्या शब्दाशब्दांतून काव्यगंधाची अनुभूती मिळत होती. या भेटीला फार वर्षे झाली नाहीत; परंतु कवीदादांसोबतचा स्नेह फार जुना असल्यासारखा वाटतो. कवीदादांना आणि त्यांच्या कवितांना- गाण्यांना खऱ्या अर्थाने समजून घेता आले ते अलीकडेच ‘मंत्रालय अधिकारी- कर्मचारी कल्याण मंच’ आयोजित ‘कवितेचं गाणं’ या कार्यक्रमात!

श्री. होळकर यांची जडणघड लासलगावत झाली. तिथल्या शेती आणि मातीशी त्यांचे अतूट नाते आहे. ते स्वतः शेती करत असल्याने त्यांच्या कवितेत येणारा निसर्ग हा केवळ वर्णनात्मक नसून तो त्यांच्या जगण्याचा भाग आहे. त्यांच्या ‘कोरडे नक्षत्रया काव्यसंग्रहातून ग्रामीण भागातले दुःख आणि दुष्काळ ठळकपणे जाणवतो; पण तरीही त्यांचे शब्द जगण्याची उमेद जागवतात. ‘पुन्हा एकदा रानवेळ’मध्ये निसर्गाच्या विविध छटांचे दर्शन घडते. ‘टिंग्या’, ‘गोष्ट छोटी डोंगरावराएवढी’, ‘बाबू बॅण्डबाजा’, ‘टपाल’, ‘चिनू’, ‘प्रियतमा’, ‘चूकभूल द्यावी घ्यावी’, ‘धुळमाती’, ‘पिंकी: एक सत्य कथा’, ‘जागर’, ‘कामधेनू’, ‘घाटी’ आदी मराठी सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखनही केले आहे.

होळकरांच्या कविता- गाण्यांत शेतकरी जीवनातील दाहकता आणि निसर्गाचे सौंदर्य यांचा सुरेख संगम आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कविवर्य ना. धो. महानोरांप्रमाणेच होळकर यांच्या कविता शेती, माती, पाऊसपाणी, वृक्ष, पशुपक्षी आणि गावशिवाराभोवती रुंजी घालतात. मातीशी इमान राखणारा आणि निसर्गाशी संवाद साधणारा हा एक निसर्गवेडा कवी आहे.

श्री. होळकर यांच्या कुटुंबाचे कोरडवाहू शेती हेच जगण्याचे साधन होते. कुठल्याही कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी येणारा संघर्ष त्यांनाही चुकला नाही. ते दररोज भल्या पाहटे उठून दुधाचा रतीब घालायचे. कुटुंबाची जगण्याची कसरत सुरू असताना प्रकाश दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. आता शिक्षणाची वाट बंद झाली, असे वाटत असतानाच गावातील विजय काचरे यांनी श्री. होळकर यांना पुन्हा दहावीचे पेपर देण्यासाठी प्रेरित केले आणि ते उत्तीर्ण झाले.

श्री. होळकर यांनी लासलगाव महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला. काही माहिन्यानंतर सूचना फलकावर नोटीस लागली होती. महाविद्यालयाच्या ‘नक्षत्र’ नावाच्या नियतकालिकासाठी कथा, कविता, लोककथा, लेख देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. मराठी विभागप्रमुख विजय काचरे नियतकालिकाचे संपादक होते. त्यांचेकडे होळकर दररोज दूध घालायचे. सर आपल्याला ओळखतात. आपण काही तरी लिहिले आणि त्यात प्रसिद्ध झाले तर कॉलेजातली मुलेमुली आणि गावतले लोक आपल्याला ओळखतील, ही भावना होळकरांच्या मनात दाटून आली.

होळकरांचा किंवा घरातल्या कोणाचाही वाचन, लेखन आणि साहित्याशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. गावातही साहित्यकविषयक वातावरण होते, असेही नाही. एके दिवशी होळकर शेतात गेले होते. दुपारचे रखरखित ऊन होते. भेगाळलेली जमीन होती. नदी- नाले आठलेले होते. पाण्याचा ठाव नव्हता. दुष्काळी वातावरण होते. त्यात रुईचे झाड होळकरांच्या नजरेस पडले. उन्हाळ्यातही ते हिरवेगार होते. त्याच्या आजुबाजूला पालापाचोळा पडला होता. त्याकडे पाहून होळकरांना वाटले, थोडीशी ओल असली तरी माणसाने टिकून राहवे. आशा सोडू नये. नैराश्य कुरवाळत बसू नये, हेच तर काचरे सरांनी आपल्याला सांगितल्याने पुन्हा आपले शिक्षण सुरू होऊ शकले. त्यावरून त्यांना उत्सस्फूर्त ओळी सूचल्या,

वाळल्या झाडाचा पाचोळा भूईला

फाटलेल्या भूईचा आधार रुईला

होळकर घरी गेले कागदावर त्या ओळी लिहिल्या. सायकल घेऊन काचरे सरांकडे धावपळ करत गेले. त्यांना त्या ओळी ऐकवत होळकर म्हणाले, सर, या ओळी सूचल्या आहेत.

अरे, एवढ्या भर दुपारी कशाला? संध्याकाळी आला असता तरी चालले असते. नाही तरी सकाळी दूध घालण्यासाठी येताना या ओळी आणल्या असत्या तरी चालले असते.

काचरे यांनी त्या दोन ओळी बघितल्या आणि संशयाने होळकरांकडे बघितले, हे तूच लिहिलं आहे का?

हो सर, मीच लिहिलं आहे.

दोन ओळींची कविता कशी छापायची? आणखी काही किमान आठ-दहा ओळी लिहून आण.

सर, मला सूचलं तर आणखी लिहून आणेल; पण या ओळी तुम्हाला कशा वाटतात?

या ओळी फार छान आहेत; पण तू लिहिल्या असतील, असं वाटत नाही. एखाद्या वृत्तपत्राच्या रविवारच्या पुरवणीतून तू त्या घेतल्या असाव्यात, असं मला वाटतं.

नाही सर, मीच लिहिल्या आहेत. हवं तर तुम्ही माझ्यासोबत या. मी तुम्हाला शेतातली भेगाळलेली जमीन, पालापाचोळा, रुईचं झाड दाखवतो!

ठीक आहे. आणखी काही ओळी लिहून आण.

होळकरांच्या शब्दांना भावनांचे धुमारे फुटले होते; परंतु काचरे सरांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. असाच प्रसंग दादा कोंडके यांचाही आहे. ते परळच्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये सातवी इयत्तेच होते. त्यांच्या बापट मास्तरांनी मुलांना शाळेच्या गॅदरिंगनिमत्त प्रसिद्ध होणाऱ्या अंकासाठी काही तरी मजकूर लिहून आणयला सांगितला होता. फूल तोडलं तर झाड भकास होईल, त्याला काय वाटेल, कल्पनेतून दादांनी कविता लिहून आणली,

वदला वृक्ष मला पाहूनी

आहो तोडू नका उगाच

फुल ते ऐश्वर्य माझे असे

मातीमोल ठरेन मी

मस्तीखोर म्हणून शाळेत दादांची ख्याती होती. त्यामुळे बापट मास्तर, मुख्याध्यापक आणि घरातलेही कोणी दादांनी कविता लिहिली, यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते; पण पुढे अवघ्या सकल मराठी मनाला दादांच्या गाण्याने वेळ लावले आणि दादा कोंडके हे नाव चित्रपट कथा लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून अजरामर झाले.

 प्रकाश होळकरांकडेही काचरे सरांनी संशयाने बघितले आणि काही ओळी लिहियला सांगितले. लहान मुली खेळताना कानात कर्णफूल म्हणून रूईचे फूल घालत असत. ते बघिलतले आणि त्यांना पुढच्या ओळी सूचल्या,

रुईच्या पाकळ्या पोरींच्या कानांत

लाजून हसल्या तळ्याच्या पाण्यात

लासलगावत पाणी नाही, तळे कोठून येणार; पण त्या मुली फुटलेल्या आरशाच्या तुकड्यांत पाहून कानातले रुईची फुले न्याहळत असत. आरशाच्या तुकड्यांना त्यांनी तळ्याची उपमा दिली. या ओळी घेऊन पुन्हा होळकर काचरे सरांकडे गेले, सर, आणखी दोन ओळी सूचल्या. बघा कशा आहेत?

अशा दोन- दोन ओळी घेऊन येऊ नकोस. पूर्ण कविता घेऊन ये.

होळकर घरी आले; पण त्यांच्यातली ऊर्मी आणि सृजनशीलता त्यांना काही स्वस्थ बसू देई ना. त्यांना साळुंख्याचा थवा दिसला. महिला पाणवठ्यावर एकत्र येतात. गप्पा मारतात. तशा साळुंख्याही एकत्र येऊन गप्पागोष्टी करीत असाव्यात, असे त्यांना वाटले आणि त्यांना अजून काही ओळी सूचल्या,

पिवळ्या पायाच्या साळुंख्या आल्या

आल्या त्या आभाळी न्हाहल्या

अखेर अकरावीतल्या प्रकाशची कविता पूर्ण झाली. ती त्याने ‘नक्षत्र’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी काचरे सरांकडे दिली. सरांनी ती प्रसिद्ध करण्याचे आश्वास दिले. गडी खूश झाला. नवीन शैक्षणिक वर्षे कधी सुरू होईल आणि अंक कधी हातात पडेल, या प्रतीक्षेत होते. वर्षे संपले. अंक आला. महाविद्यालयात अंक वाटप सुरू झाले. रांगेत उभे  होळकरांनी अंक घेतला. झपाझप अंक चाळत गेले. कविता काही सापडेना. बहुधा एकमेकांना चिकटलेल्या पानांत ती असेल म्हणून त्यांनी बारकाईने एकएक पृष्ठ उलगडून बघितलं; पण कविता काही नजरेस पडली नाही. होळकरांचा स्वप्नभंग झाला. त्यांच्या मनात काचरे सरांबद्धल कटूता निर्माण झाली.

काचरे सरांनी एक दिवस होळकरांना बोलवले. त्यांच्या हातात साखर आणि एक अंक दिला. ते म्हणाले, प्रकाश, तुझ्या कवितेचा दर्जा कॉलेजच्या नियतकालिकातल्या कवितांपेक्षा खूप वरचा आहे. म्हणून मी ती ‘अनुष्टूभ’कडे पाठविली होती. ती त्यात प्रसिद्ध झाली आहे.

होळकरांना आनंद झाला. आपल्याला आता सगळे गाव ओळखेल, या आनंदात ते घरी गेले; पण ‘अनुष्टूभ’ कोणाला माहीतच नव्हते. काचरे सरांनी आपली बोळवण केली, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. काचरे सरांकडे एकमेव अंक यायचा. त्यामुळे होळकरांची कविता त्यांना स्वत:ला आणि काचरे सरांनाच माहीत होती; पुन्हा ते निराश झाले. अकरावी- बारावीतल्या मुलाचे यापेक्षा आणखी काय मोठे स्वप्न असेल.

काचरे सरांनी होळकरांची समजूत काढली, प्रकाश, तुझी कविता ‘अनुष्टूभ’मध्ये प्रसिद्ध होणे, ही तुझी या वयातली मोठी कमाई आहे. या अकांच्या संपादक मंडळात कविवर्य पुरुषोत्तम पाटील, ना. धो. महानोर, भाषाशास्रज्ञ अशोक केळकर, समीक्षक रमेश वरखेडे असा दिग्गजांचा समावेश आहे.

सगळे खरे आहे, आपण आपल्याला कोणीही कवी म्हणून ओळखणार नाही, ही खंत त्या किशोर वयीन मुलाच्या मनात कायम होती; पण एके दिवशी अनुष्टूभच्या व्यवस्थापकांनी कळविले, प्रकाश, तुझ्या कवितेचे ना. धो. महानोरांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये (तत्कालीन औरंगाबाद) एका भाषणात कौतुक केले आहे.

होळकरांना आनंद झाला. पाठोपाठ पत्र यायला लागली. ती पत्र केवळ सर्वसामान्य वाचकांची नव्हती. ती आनंद यादव, शांताबाई शेळके यांसारख्या दिग्गजांची प्रेरणादायी पत्रे होती; परंतु होळकरांना वाटले की कुणी तरी खोडसाळपणा केला असावा आणि मोठ्या साहित्यिकांच्या नावाने पत्रे पाठविली असतील. म्हणून ते काचरे सरांकडे गेले. त्यांना पत्र दाखविली. ते म्हणाले, हे पत्र आनंद यादव सरांचंच आहे. मला त्यांचे अक्षर माहीत आहे.

किशोरवयीन प्रकाशचा उत्साह आता मात्र दुणावला होता. तो आनंदला होता. कवी म्हणून आपल्याला कोणी तरी ओळखू लागले आहे, या आनंदाच्या भरात त्यांना काही ओळी सूचल्या,

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवरती

खेडे आमच्या टेकडीवरती

नवी कविता घेऊन होळकर काचरे सरांकडे गेले, सर, मी आणखी एक कविता लिहिली आहे.

काचरे सरांनी कविता बघताच कागद भिरकावून दिला. होळकर अस्वस्थ झाले. काचरे सर म्हणाले, अरे, कुठं आहे तुझं गाव टेकडीवरती? तुझ्या गावात कांदा आहे. विहिरी आटल्या आहेत. पाणी नाही. राबणाऱ्या बायका आहेत; पण तुझ्या कवितेत वास्तव कुठंच नाही. अशी कविता असते का?

काचरे सरांच्या शब्दांचा होळकरांच्या मनावर खोल परिणाम झाला. वास्तवापासून दूर जात उगाच कविकल्पना करण्यात अर्थ नाही, याची त्यांना जाणीव झाली. त्यावर ते म्हणतात, डोळ्याला जे दिसतं, जे काळजाला भिडतं, ज्याचे ओरखडे आपल्या ह्रदयावर उमटतात, ते आपल्याला कवितेत आणता आलं पाहिजे, हे मी काचरे सरांकडून शिकलो. त्यांनी माझ्यासारख्या ओबडधोबड झाडाची छाटणी केली. त्याला आकार दिला. मला बहकू दिले नाही आणि बाजारी कवी होऊ दिले नाही.

प्रकाश होळकर यांच्या कवितांमध्ये, गीतांमध्ये ग्रामीण जीवन आणि निसर्ग यांचे अत्यंत तरल आणि वास्तववादी चित्रण असते. त्यांच्या कवितेतून माती हा केवळ एक पदार्थ नसून ती एक जिवंत संवेदना असल्याची खात्री पटते. शेती, माती आणि नाती यांच्यातील अतूट नाते त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रकट होत असते. कष्टकरी शेतकऱ्याचे जगणे, त्याचा घाम आणि त्यातून फुलणारी सृष्टी, याचे यथार्थ दर्शन त्यांच्या कवितांमधून घडते.

होळकरांच्या कवितांमध्ये निसर्ग केवळ पार्श्वभूमी म्हणून येत नाही, तर तो एका सजीव पात्रासारखा वावरतो. पाऊस, ऊन, वारा आणि झाडे-वेली यांना ते मानवी भावना बहाल करतात. ते अत्यंत साध्या; पण प्रभावी प्रतिमा वापरून निसर्गाचे सौंदर्य मांडतात. रानाफुलांचा सुगंध, पहाटेची थंडी किंवा शेतात राबणाऱ्या बैलांविषयीची माया त्यांच्या कवितेत ओतप्रोत भरलेली असते. निसर्गातील बदलांचा मानवी मनावर होणारा परिणाम ते अतिशय सूक्ष्मपणे टिपतात. पावसाच्या प्रतीक्षेत करपून जाणारी कोवळी पिके आणि पिचली जाणारी शेतीमातीतली माणसे यातील आर्तता त्यांच्या कवितेतून प्रतीत होते. ‘घामाचा गंध आणि मातीचा छंद यांचा सुरेख संगम त्यांच्या कविता आणि गीतांमध्ये असतो. प्रकाश होळकर ग्रामीण भागातले केवळ निसर्गरम्य चित्र न रंगवता, तिथल्या भीषण वास्तवावरही प्रकाश टाकतात.

प्रकाश होळकर दहावीत नापास झाल्याची आठवण सांगत असताना अरुण शेवते यांचे ‘नापास मुलांचे प्रगतिपुस्तक’ हे पुस्तक आठवले. अमिताभ बच्चन आकाशवाणीच्या; तर स्मिता पाटील दूरदर्शनच्या वृत्तनिवेदकाच्या परीक्षेत नापास झाल्या होत्या. किशोरी आमोणकर महाविद्यालयात पहिल्या वर्षी नापास झाल्या होत्या. व्ही. शांताराम यांना विद्यापीठ परीक्षेच्या आधीच्या चाचणी परीक्षेत अपयश आले होते. डॉ. श्रीराम लागू चौथीच्या परीक्षेत आणि एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात नापास झाले होते. नेल्सन मंडेला एल.एल.बीच्या परीक्षेत अनेक वेळा अपयशी ठरले होते. शाहरुख खान हिंदीच्या चाचणी परीक्षेत नापास होत असे. न्यूटनला शिष्यवृत्तीच्या परीक्षेत अपयशाला सामोरे जावे लागले होते. श्री. शेवते यांच्या पुस्तकातले एक वाक्य आहे, अनेकदा अपयशाची चाहूल काही माणसांना लगेच लागते. त्याक्षणी ते अपयशाची सुरू होणारी पाऊलवाट पुसून टाकतात.

होळकरांनीदेखील अपयशाची पाऊलवाट त्याक्षणीच पुसून टाकली होती. साहित्य आणि चित्रपट सृष्टीत जागोजागी त्यांच्या कीर्तीच्या पाऊल खुणा उमटल्या आहेत. त्यांच्या कविता किंवा गाणी असंख्य आज रसिकांच्या ओठी असतात. महाराष्ट्रात असे एकही विद्यापीठ नाही की तिथे त्यांचा काव्यसंग्रह अभ्याला नाही. एवढेच काय गोवा, गुलबर्गा अशा बाहेरच्या राजीतील विद्यापीठांतही त्यांचे पुस्तक अभ्याला आहे. त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनासह विविध संस्था, संघटांनी असंख्य पुरस्कार देऊन गौरविले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे किशोरवयीन जीवनात आपल्या गावातल्या दोन- चार लोकांनी कवी म्हणून आपल्याला ओळखावे, यासाठी धडपडणारा प्रकाश आज अवघ्या महाराष्ट्राला ग्रामीण आणि निसर्ग कवी ‘प्रकाश होळकर’ म्हणून परिचित झाले आहेत. लासलगावात तर ‘प्रकाश होळकरां’ऐवजी ‘कवीदादा’ या नावानेच ते ओळखले जातात, यापेक्षा दुसरी आणखी चांगली ओळख काय असू शकते. अशा या कविदादाला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

          -डॉ. जगदीश मोरे

Saturday, 21 February 2026

निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न

गाव झालं लई न्यारं!

पावसाळा संपला. ढेकळांचे अमाप पीक आले, हे नित्याचेच झाले. दुष्काळ दरवर्षीच येतो; परंतु लोकांनी कधी तरी, केव्हा तरी स्वप्नात इथल्या मातीचा साक्षात्कार बघितला. एका जिद्दीने रात्रंदिवस राबून कोसळलेला थेंब अन् थेंब जागीच जिरवला. सोन्याचा कोंभ रूजवून काढला. वैराण रानात नक्षत्रतारकांचे लखलखते जीवन तरारून आले! हे शब्द आहेत ना. धो. महानोरांच्या कवितेतले; पण ही कथा खानदेशातली नाही. ती आहे माणदेशातली; परंतु ती व्यंकटेश माडगुळकरांच्या ‘बनगरावडी’तल्या मास्तरांची नाही. ती आहे माणदेशातल्या निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांची. त्यांच्या माणसांची, तिथल्या मातीची, अर्थातच ‘दळवी पॅटर्न’ची!

गावाच्या परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या दळवी यांच्या प्रयत्नांची फलश्रुती पत्रकार व लेखक सुनील चव्हाण यांनी ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केली आहे. हे पुस्तक म्हणजे ग्रामविकासाचे ‘हँडबुक’ किंवा ‘कार्यपुस्तिका’ आहे. शेती आणि ग्रामीण विषयाचे जाणकार असलेले चव्हाण यांनी एका दुर्लक्षित, दुष्काळी खेड्याच्या परिवर्तनाचे चित्र शब्दबद्ध केले आहे.

खटाव तालुक्यातील (जि. सातारा) निढळचे भूमिपूत्र असलेले दळवी यांनी सुवर्णपदकासह एम.एस्सी. (ॲग्री) पदवी संपादन केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 1983 मध्ये उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारीसह विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. प्रशासकीय सेवा कार्यकाळात दळवी यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना, महत्मा गांधी तंटामुक्त गाव योजना आदी अनेक योजना संकल्पित करुन शासनाच्या वतीने त्यांची राज्यस्तरावर अंमलबजावणी केली.

घार उडे आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी’ या म्हणीप्रमाणे श्री. दळवी शासकीय सेवेनिमित्त कुठेही असले तरी त्यांचा एक पाय सतत गावकडे असायचा. त्यातूनच त्यांनी निढळमध्ये परिवर्तन घडवून आणले. ते 2018 मध्ये पुणे विभागीय आयुक्त म्हणून निवृत्त झाले; परंतु आपल्या जन्मगावचा केलेला कायापालट म्हणजे निवृत्तिनंतरचे त्यांचे उफाळून आलेले प्रेम नाही. त्यासाठी ते गेली चार दशके झटत होते. प्रशासकीय सेवेतील जबाबदाऱ्या सेवाभावी वृत्तीने पार पाडत असतानाच निढळच्या विकासावर ते जातीने लक्ष देत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ग्रामसुधारणेचा मूलमंत्र। सज्जनांनी व्हावे एकत्र। संघटना हेचि शक्तीचे सूत्र। ग्रामराज्य निर्माण करी॥ या ओव्यांचा ते अखंड कृतिशीलपणे जप करत राहिले.

आपल्या भविष्याची किंवा समृद्धीची गुरुकिल्ली आपल्याच हाती आहे, ही जाणीव निढळच्या ग्रामस्थांमध्ये रुजविण्यात श्री. दळवी यशस्वी झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिकत असताना त्यांनी आपल्या गावावर संशोधनात्मक प्रबंध तयार केला होता. जवळपास 750 माणसे मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांत रोजगारासाठी स्थलांतरीत झाल्याचे त्यांना आढळले. गावतली शाळा बंद पडण्याच्या वाटेवर होती. सततच्या दुष्काळाने गाव आपले गावपण हरवून बसले होते.

निढळकरांना एकत्र आणण्यासाठी 1983 च्या दिवाळी पाडव्याला त्यांनी घेतलेल्या ग्रामसभेत परिवर्तनाचे बीज अंकुरले. ‘निढळ नोकरवर्ग आणि व्यावसायिक संघटने’ची स्थापना केली. लोकवर्गणीतून विद्यालयाची भव्य इमारत उभी केली. गावातील विविध कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीशिवाय भौतिक विकासाला अर्थ नाही, या जाणिवेतून दळवी यांनी गावाच्या पाणलोट विकासाचा संकल्प केला; पण पदरी अपयश येऊन हा ‘नाबार्ड’चा हा प्रकल्प रद्द झाला. दळवी निराश झाले; पण हतबल झाले नाहीत. नाबार्डच्या मदतीने पुन्हा नव्याने 2006 मध्ये 1.46 कोटी रुपयांचा पथदर्शी पाणलोट विकास प्रकल्प हाती घेतला आणि तो विक्रमी वेळेत पूर्ण केला. हा तपशील रंजक आहे. 

निढळचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी 525 मिमी. आहे; परंतु पाणलोट विकासामुळे सिंचनाच्या सुविधा आल्या. बागायती पिके गावात वाढली. शेतीपूरक व्यवसाय सुरू झाले. भौतिक विकासातही गाव पुढे गेले. दलित वस्त्यांचा विकास केला गेला. विविध सुविधा गावच्या पायाभूत विकासाची साक्ष देतात. ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत एखादे कॉर्पोरेट पद्धतीचे कार्यालय वाटते. एखाद्या खेड्यात साडेतीन एकरवर सुंदर व प्रशस्त उद्यान असू शकेत, यावर क्षणभर पुस्तक वाचताना विश्वास बसत नाही. वाड्या-वस्त्या डांबरी रस्त्याने जोडल्या गेल्या. या गावाला चक्क रिंगरोड आहे.

श्री. दळवी यांनी व्यक्तिकेंद्रीत दृष्टिकोन न ठेवता गावाला केंद्रबिंदू मानून पावले टाकली. उत्साहाने सळसळणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज उभी केली. आजी- माजी सैनिकही ग्रामविकासात स्वत:ला झोकून देऊन योगदान देत आहेत. महिलांनाही ग्रामविकासात सहभागी करुन घेतले आहे. निळकंठेश्वर पतसंस्था, कार्यकारी सेवा संस्था, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा ह्या गावातल्या मुख्य अर्थवाहिन्या बनल्या आहेत. एकेकाळी मनिऑर्डवर चालणाऱ्या या गावात आता कोट्यवधींचे व्यवहार कसे होऊ लागले याचे उत्तर पुस्तकातून मिळते.

अध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीच्या वाटेवरही निढळ अग्रेसर आहे. दळवींच्या प्रयत्नांनी गावातील हेमाडपंथी पुरातन महादेव मंदिराचा 1996 मध्ये जीर्णोद्धार घडवून आणला. अंधश्रद्धा निर्मुलन आणि व्यसनमुक्तीसारख्या चळवळीही गावात रुजविल्या. गावाने ‘संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात’ प्रथम क्रमांक पटविला. ‘निर्मल ग्राम पुरस्कारा’नेही निढळचा सन्मान झाला. ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजने’तेही निढळने बाजी मारली आहे. या गौरवास्पद कामगिरीचे गमक सविस्तरपणे या पुस्तकातून उलगडत जाते.

शेती- मातीच्या भवतालातला अंधार गड होण्याची भीती संभवताना शेतकरी व ग्रामस्थांमध्ये स्वावलंबी आणि स्वाभिमानी आयुष्य जगण्याची उमेद जागविण्याचा ध्यास श्री. दळवी यांनी ऊरी बाळगला होता. तो चार दशकानंतर फलश्रुत झाला. निढळमधून रोजगारासाठी होणारे स्थलांतर आता जवळपास थांबले आहे. बाहेर गेलेली माणसं गावात परतू लागली आहेत. सर्वांगीण विकास झाला की माणसं खेड्यांकडे वळू शकतात. निढळ हे त्याचं उदाहरण आहे. दुष्काळी आणि दुर्लक्षित खेडे असलेले निढळ आता ‘परिपूर्ण गाव’ किंवा ‘स्मार्ट व्हिलेज’ कसे झाले? याचे कथनही हे पुस्तक करते. निढळच्या धरतीवर राज्यातील इतर गावांचा विकास व्हावा यासाठी दळवी यांनी समविचारी लोकांना बरोबर घेऊन सत्त्व फाउंडेशनची स्थापना केली. त्याची माहिती पुस्तकात आहे. पुस्तक संपूर्ण रंगीत असून त्यात निम्मी पाने जवळपास छायाचित्रे आहेत. निढळच्या विकासाची ती साक्ष आहे.

प्रख्यात अभिनेते आणि ‘नाम फाऊंडेशन’चे नाना पाटेकर यांची ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाचा केवळ मसुदा वाचून त्यांनी प्रस्तावना लिहिलेली नाही. त्यासाठी त्यांनी निढळला भेट दिली. गावात एक दिवस मुक्कामही केला. सगळी विकासकामे स्वतः पाहिली. एका माणसाने ध्यास घेतला तर काय आणि किती करु शकतो, याचं हे उदाहरण आहे. निढळ गावाचा कायापालट ही चंद्रकांतची कमाल आहे, असे श्री. पाटेकर यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे.

(निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न, लेखक: सुनील चव्हाण, पृष्ठे- 200,   प्रकाशक: सत्त्व फाउंडेशन, पुणे. संपर्कासाठी लेखकाचा भ्रमणध्वनी क्र. 9403855345)  

                                                                                                   -डॉ. जगदीश मोरे

 





Wednesday, 27 August 2025

#नवसाचा_गणपती #साने_गुरुजी #श्यामची_आई

 

श्यामची आई’ हा ग्रंथ लिहिणारे साने गुरुजी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. आपल्या ज्ञानामध्ये, सद्भावनांमध्ये वाढ होणार असेल आणि ती गणरायाला दाखवता येणार असेल, तर दरवर्षी गणपती आणण्याला अर्थ आहे, असं सांगणाऱ्या गुरुजींच्या नजरेतला गणपती कसा होता, त्याचा घेतलेला हा वेध…

श्यामची आई’ हा ग्रंथ लिहिणारे साने गुरुजी आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. आपल्या ज्ञानामध्ये, सद्भावनांमध्ये वाढ होणार असेल आणि ती गणरायाला दाखवता येणार असेल, तर दरवर्षी गणपती आणण्याला अर्थ आहे, असं सांगणाऱ्या गुरुजींच्या नजरेतला गणपती कसा होता, त्याचा घेतलेला हा वेध.

अमळनेरच्या खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये साने गुरुजी 17 जून 1924  रोजी शिक्षक म्हणून रूजू झाले. त्याच वर्षी शाळेतल्या गणेशोत्सवालाही प्रारंभ झाला. या शाळेचे पुढे प्रताप हायस्कूल असे नामकरण झाले. साने गुरुजींवर या शाळेच्या छात्रालय (वसतिगृह) प्रमुखाचीही जबाबदारी सोपवलेली होती. तिथे साने गुरुजी ‘छात्रालय’ नावाचे दैनिक दररोज पहाटे उठून स्वहस्ताक्षरात लिहून काढायचे. ‘छात्रालया’च्या एका अंकात गुरुजींनी लिहिले होते, छात्रालयाच्या ग्रंथालयात गणेश चतुर्थीच्या सुमारास बरीच नवीन पुस्तके मागविली आहेत. ती येणार आहेत. मुलांनी वाचावित इच्छा असेल तर. ‘यंग इंडिया’ही आठ दिवसांनी येऊ लागेल. मी स्वत: ‘क्रॉनिकल’ घेणार आहे. तोही छात्रालयात ठेवित जाईन. वाचीत जा म्हणजे झाले.

निरोगी आरोग्य व सतेज बुद्धीबाबत गुरुजींनी एका अंकात नमूद केले आहे, पुढील वर्षी आपण देवास या. सिद्धीविनायक विश्वेश्वरास पुन्हा आणू; परंतु या वर्षापेक्षा पुढील वर्षी आपल्या मनाची वाढ, हृदयातील सद्‌भावनांची वाढ, बुद्धीची वाढ व शारीरिक बलाची वाढ आपणास त्यास दाखविता आली पाहिजे. पुढील वर्षी गणपती येईल, त्यावेळी प्रत्येक काम, नवीन ज्ञान देवापुढे मांडावे. म्हणजे त्यास आनंद होईल.

मुलांच्या प्रगतीच्या अनुषंगाने गुरुजी लिहितात, गणपती बाप्पा दरवर्षी आपली सुधाराणा पाहण्यास येतो. त्याला मुलांची सर्वांगीण सुधारणा दिसली, तनमन सुसंस्कृत दिसले तर तो आनंदाने चार दिवस राहील. नाही तर त्यास आपल्याबद्दल दया, प्रेम वाटणार नाही.

साने गुरुजींनी प्रताप हायस्कूलमधील नोकरीचा 1930 मध्ये राजीनामा दिला होता. नंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यांच्याजवळ आजोबांकडची गणपतीची लहान सुंदर पितळी मूर्ती होती. ती मूर्ती ते नेहमी खिशात ठेवत असत. एका मित्राने ती मूर्ती त्यांच्याकडून मागितली. गुरुजींना क्षणभर मोह पडला; परंतु त्यांनी ती मूर्ती त्याला देऊन टाकली. कारण विरक्त वृत्ती हीच त्यांच्या जगण्याची प्रेरणा होती.

साने गुरुजींनी ‘साधना’ साप्ताहिकातून आपली पुतणी सुधास (सुधा साने-बोडा) उद्देशून पत्रं लिहिली होती. ती पत्रं सुधास उद्देशून असली तरी सर्वच वाचकांमध्ये, विशेषत: मुलांमध्ये जिज्ञासा उत्पन्न करणारी होती. सप्टेंबर 1949 च्या अंकातील पत्रामध्ये त्यांनी नमूद केले होते, गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय केला. या दहा दिवसांत एकत्र यावे, ज्ञानाची उपासना व्हावी, राष्ट्रीय वृत्ती वाढावी, असा त्यांचा हेतू. आज राष्ट्र स्वतंत्र आहे. आपण आपल्या उत्सवाला सर्वांना बोलवावे. कुरुंदवाड गणेशोत्सवात मुसलमान बंधूही पूर्वी येत. ती सुंदर प्रथा आज आहे की नाही, मला माहीत नाही.

साने गुरुजींना लहानपणी सगळेजण ‘पंढरी’ म्हणून हाक मारत असत. त्यांनी एका पत्रात आपल्या बालपणीच्या गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला होता. ते लिहितात, गौरी-गणपतीचे दिवस येणार म्हणून तयारी सुरू होती. गावात अनेकांकडे गणपतीच्या मूर्ती तयार होत होत्या. तो मुक्या पटवर्धन- तो किती सुंदर गणपती बनवतो! लहानपणी आम्ही मुले गावाबाहेर किल्ल्याकडे एका पऱ्ह्याच्या काठी जात असू. तेथे चिकण माती असे. एकदा काठाची माती काढताना मी प्रवाहात पडलो, वाहूनच जायचा! आम्ही मुलांनी त्या मातीचा गणपती केला, उत्सव केला. मारकुटे हेडमास्तरांची बदली व्हावी म्हणून. तो आमचा नवसाचा गणपती होता.

साने गुरुजींनी सुधाला लिहिलेल्या एका पत्रात नमूद केले होते, तू मागे लिहिलेस की, समितीच्या काही बायका गांधीजींबद्दल वाटेल ते बोलतात. ‘एवढा काय गांधीजींबद्दल पुळका येतो तुम्हाला?’ असे एक बाई म्हणाल्या. ते ऐकून तुला वाईट वाटले, तू उठून गेलीस वगैरे. चांगले केलेस. त्यांना पाप करू दे. तू दूर राहा. तुझ्या मैत्रिणी, तुम्ही तुमचा मानवता संघ काढा. गणपतीचा उत्सव सर्वत्र सुरू आहे. नाना प्रकारचे, नाना आकारांचे गणपती- नेहरूरूपधारी, गांधीरूपधारी असे नमुने. गणपती शेत नांगरीत आहे, असेही देखावे आहेत म्हणे. त्या-त्या वेळच्या गरजांना अनुरूप असा आपला देव बनतो.

गणपतीचे मस्तक मोठे आहे. पोट मोठे आहे. सर्वांचे अपराध तो पोटात घालील आणि थोर विचार डोक्यात खेळवील. गणपतीचे स्वरूप म्हणजे महान नेत्याचे स्वरूप. गांधीजी सर्वांचे अपराध पोटात घालीत. डोक्यात महान विचार खेळवीत. केवळ चिरफाड करणारे ते नव्हते, तर समन्वय करणारे होते. सारे जग हिंसेकडे जात असता ‘जगाला जर खरी शांती हवी असेल, तर या विशेष मार्गाने जा’ असे ते सांगणारे होते. ते साधे नव्हते, तर विनायक म्हणजे विशेष रीतीने नेतृत्व करणारे होते. अशा भावनेतून गुरुजी मुलांना गांधीदर्शन घडवत असत.

मुंबई आणि कोकणातल्या गणेशोत्सवाचे वर्णन सांगताना साने गुरुजी लिहितात, गौरी-गणपतीचे दिवस कुणबी मंडळींत फार आनंदाचे. मुली माहेरी येतात. नवी लुगडी, नवे कपडे आणि त्यांचे ते नाच. मुंबईचे रामा लोक नाचाची तालीम घेतात. तो नाच फार आवडतो. पायांत घुंगरू, हातांत निरनिराळ्या रंगांचे रूमाल. एकदम बसतात, उठतात. गिरकी घेतात. रूमाल नाचवतात. वाद्ये वाजत असतात. आनंद असतो. शेतीची कामे संपलेली असल्यामुळे हे पंधरा दिवस ते मजेत दवडतात; परंतु पाऊस नीट पडलेला असला, तर हा आनंद... नाही तर चिंताच असते.

मुळातच आपले सण-उत्सव कृषक संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत. त्याबाबत साने गुरुजी सुधाला सांगताना लिहितात, घरी आणलेल्या गणपतीभोवती आरास केलेली आहे लोकांनी. वरती ती भाळी. भाळीला कवंडळे, कांगण्या; तसेच दोडके, सहस्रफळ वगैरे भाजी-फळे. कांगण्यासुद्धा दिसतात छान. जणू बारीक सुपाऱ्यांचे पेन्द्रे! मला गणपतीच्या डोक्यावर पावसाळ्यातील फळे टांगायची कल्पना फार आवडते. जे आपण पावसाळ्यात निर्मिले, त्याचीच सजावट उपयुक्त. तेच सुंदर!

गणपतीला निरोप दिल्यानंतरच्या भावपूर्ण वातावरणाचे वर्णन करता साने गुरुजी लिहितात, गणपतीला बुडवायला नेतो, तेव्हा जरा वाईट वाटते. जणू घरातलेच कोणी जात आहे, असे वाटते. आम्ही गणपती घेऊन वाजत-गाजत कोंढीवर गेलो. चौरंग डोक्यावर घेऊन तरुण पाण्यात शिरले. ‘गणपती बाप्पा मोरया’ जयघोष होत होता. पाणी गळ्याएवढे झाले. गेले...आणखी पुढे गेले... बुडवले गणपती... मूर्ती तळाशी गेल्या...

मुंबईत 1940 मध्ये ब्राह्मण सभेच्या गणपतीच्या उत्सवात त्यांना व्याख्यानासाठी बोलावले होते. तेथे त्यांच्या व्याख्यानात विघ्न आणण्यासाठी पुष्कळ लोक आले होते. एकदा साने गुरुजींनी कुठे तरी लिहिले होते, नाशिकच्या रामाच्या रथाला हरिजनाचे हात लावू देत नसाल, तर ती...

व्याख्यानात विघ्न आणणाऱ्यांनी हस्तपत्रके वाटली होती. त्यात लिहिले होते, ते शब्द मागे घ्या न् मग बोला.

हस्तपत्रक हातात घेऊनच साने गुरुजी बोलायला उभे राहिले आणि ते म्हणाले, मी लहानपणी गणपतीचं जे अथर्वशीर्ष शिकलो, त्यात ‘सर्वे जगदिदं त्वत्तो जायते’- ‘हे सारं जग तुझ्यापासून जन्मलं’, असं म्हटलं आहे. आम्ही ब्राह्मणच त्याच्यापासून जन्मलो, असं नाही. आपण सारी प्रभूची लेकरं. त्याच्याजवळ सर्वांना जाता येत नसेल, तर तो देव कसा?

साने गुरुजी दोन तास बोलले. ती सभा शांतपणे पार पडली. विरोधक शांत राहिले. लहानपणी साने गुरुजी गणपतीच्या देवळात जायचे, उपवास करायचे, खूप फुले आणून पूजा करायचे. कालांतराने ते तसे काही करीत नसत. एखादे वेळेस देवाची आठवण आली की ते जेथे असत तिथे क्षणभर डोळे मिटून डोके टेकवत असत. तेवढ्याने त्यांना समाधान वाटे.

लहानपणी श्याम शाळेतल्या मुलांना देवादिकांच्या, साधुसंतांच्या गोष्टी सांगत असे. चातुर्मासात पालगड येथील श्यामच्या घराजवळील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. श्यामच्या घरी मुले जमली. घरातील रिकामे डब्बे घेतले. मुले डब्बे बडवत भजने म्हणू लागली, मुलांच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. पुराण ऐकायला आलेले म्हणू लागले, काय शिंची कार्टी!

हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? असे कोणी तरी म्हणाले.

श्यामची आईदेखील मंदिरातच होती. हा संवाद ऐकून ती घरी आली, श्याम!

 आईच्या आवाजातला क्रोध लक्षात येताच श्याम चपापला. भजन थांबले. डब्ब्यांचा मृदुंग मुका झाला. श्यामने विचारले, काय झाले आई?

तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला, आईने रागातच विचारले.

आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत, श्याम म्हणाला.

श्यामचे म्हणणे आईने ऐकून घेतले. मग तिने श्यामला समजावून सांगितले. श्यामला ते पटले. आई म्हणाली होती, हळूहळू टाळ्या वाजवा. ताल धरा, म्हणजे झाले. वाजविणे ही महत्त्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरड व वाजविणे हेच आवडते? श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो, ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये.

श्यामला हे उमगले. म्हणूनच मोठेपणी श्यामचे गणेशप्रेम विरक्तीकडे, मूल्यांकडे झुकले.

-डॉ. जगदीश मोर

#नवसाचा_गणपती #साने_गुरुजी #श्यामची_आई