Friday 5 May 2023

महाराष्ट्र शाहीर: अमळनेरचा वसा आणि वारसा (Amalner)

अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार असल्याची घोषणा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात झाली आणि पाठोपाठ ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा प्रदर्शित झाला. बालपणी शाहीर साबळेंचे वास्तव्य अमळनेरमध्ये होते. पत्रकार म्हणून मला शाहिरांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. ती आठवण सिनेमा पाहताना ताजी झाली. शाहीर साबळे आणि अमळनेरच्या नात्याबरोबरच अमळनेरच्या सांस्कृतिक संचिताबाबतचा हा एक संक्षिप्त आढावा…  

अमळनेर येथील मीराबाईंकडे संतसज्जनांचे येणे- जाणे असायचे. गाडगेबाबा एकदा त्यांच्याकडे आले होते. तिथे त्यांनी कृष्णाचे गाणे ऐकले. बाल कृष्णाच्या आवाजाने ते भारावून गेले. त्यांनी कृष्णाचे घर गाठले. बाबांच्या अवचित दर्शनाने कृष्णाची आजी धन्य झाली. साताजन्माची पुण्याई सार्थकी लागली. अश्रुभरलेल्या डोळ्यांनी आजी म्हणाली, बाबा, माझं भाग्य लय थोर म्हणून तुम्ही स्वत: माझ्या दारी आलात. तुम्ही माझ्याजवळ कायबी मागा… जे आसंल ते मी दिवून टाकीन!

बाबा हसत म्हणाले, माहे, माले तुह्यावाला नातू दे.

बाबांच्या मागणीने आजी गांगरली. थरथर कापत म्हणाली, बाबा, माझं काळीज कापून मागितलं असतं तर तुमच्या पायावर वाहिलं असतं. अख्खं घरदार म्हणाला असता तर त्यावर पाणी सोडून तुमच्या संगं गाव- गाव भीक्षा मागाय निघाले असती. अवं, पर ह्ये कसं द्यावं? बोलून चालून सोयऱ्याचं पोर. लेक- जावाय काय म्हणंल? सोयऱ्या धायऱ्यात तोंड दावाय जागा ऱ्हाइल का मले?

बाबांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. आजीचा ठाम नकार होता. बाबांचा हेतू चांगला होता. ते चांगली माणसं हेरायचे. कृष्णाही त्यांना भावला होता. कृष्णाने केवळ भजने गाऊन टाळकुटेपणा करण्याऐवजी डफ हातात घेऊन लोकजागृती करावी. सोबत त्याचे शिक्षणही पूर्ण व्हावे, अशी बाबांची धारणा होती; पण बाबा आल्या पावली परत गेले.

कृष्णा खदखदू लागला. साने गुरुजींनाही एकदा आजीमुळे असेच माघारी जावे लागले होते. गुरुजींनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमळनेरकरांसाठी सेनापती बापट या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. कृष्णाच्या देशभक्तीपर कवनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार होती. जेवणे आटोपून प्रेक्षक मंडपात जमू लागले होते. बत्तीच्या प्रकाशाने मंडप उजडून निघाला होता. गुरूजी आतुरतेने कृष्णाची वाट बघत होते. कृष्णाच्या नावाचा वारंवार पुकारा सुरु होता. आजीने कृष्णाला घरातच कोंडले होते. त्याची घालमेल सुरू होती. दरवाज्यावर थाप पडली. दातओठ खात आजीने कडी उघडली. प्रत्यक्षात सानेगुरुजीच दारात!

नापसंती दर्शवित आजी म्हणाली, कायवो गुरूजी?

कृष्णा काय करतोय घरी अजून? कार्यक्रम सुरू व्हायला आला. गुरुजींनी विचारले.

गुरूजी, माफ करा या येडीला. मला न्हाय धाडता यियाचं कृष्णाला तुमच्या संगटी.

अहो माई, कृष्णाचा गाण्याचा कार्यक्रम आहे आता. सगळी तयारी झालीय. दहा मिनिटांत परत धाडतो त्याला घरी.

गुरुजी, एकदा सांगितलं ना. अहो, त्याला साळा शिकायला पाठवलंय आईबापानी माझ्याकडं. तुमच्या संगं गाण बजावणं करून साळंचा इस्कोट करण्यासाठी न्हाई.

जसी तुमची मर्जी माई.

गुरूजी शांतपणे परत गेले. कृष्णा आतल्या आत तडफडत होता. सानेगुरुजींप्रमाणे गाडगे बाबाही परत गेले होते. आपल्यासारख्या सामान्य पोरासाठी थोरामोठ्यांचे अपमान व्हावेत, हे पाहून कृष्णाला वाईट वाटत होते.

आई- वडिलांनी कृष्णाला शिक्षणासाठी अमळनेरला आजीकडे पाठविले होते. अन्‌ शेवटी नको तेच झाले. कृष्णाची सातवीची म्हणजे त्यावेळच्या फायनलची परीक्षा जवळ आली. केंद्र होते जळगाव. जाण्याचा खर्च तीन रूपये होता. आजीला वाटायचे की परीक्षेला बसून याचा काही उपयोग नाही. म्हणून तीने पैसे देण्यास नकार दिला. कृष्णाने आदळआपट केली. काही उपयोग झाला नाही. शेजारपाजाऱ्यांनी वर्गणी करून पैसे द्यायचे कबूल केले; पण कृष्णा स्वाभिमानी. त्याने पैसे घेतले नाहीत. बहाद्दर परीक्षेला गेलाच नाही. शेवटी सातवी नापास हीच त्याची शैक्षणिक पात्रता राहिली; पण जगणे समृद्ध करणाऱ्या चार- पाच वर्षांच्या अनुभवांची शिदोरी उराशी घेत कृष्णाने गुपचूप आपले पसरणी गाव गाठले. कृष्णाचे अमळनेरमधील तीळ- तांदूळ संपले होते.

कृष्णा! कोण होता कृष्णा? ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गौरवगाण कानावर पडले की आठवात ते शाहीर साबळे. तेच ते… तो कृष्णा! स्वातंत्र्य चळवळीबरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही योगदान देणारे; तसेच गीतकार, संगीतकार, गायक, वादक कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे!

गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमामुळे शाहीर साबळे यांच्याविषयीच्या माझ्या वैयक्तिक आठवणी ताज्या झाल्या. दै. ‘सकाळ’मध्ये असताना माझी धुळ्याहून साधारणत: सप्टेंबर 2006 मध्ये मुंबईत ‘सकाळ न्यूज नेटवर्क’साठी बदली झाली होती. सकाळ न्यूज नेटवर्क संपादक आणि प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे (ठाणे येथील 84 व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) यांनी मला एका विशेष पुरवणीसाठी शाहीर साबळे यांची मुलाखत घ्यायला सांगितले. शाहिरांच्या परळमधल्या घरी गेलो. आदराने त्यांना सगळे ‘बाबा’ म्हणत. नतमस्तक व्हावे, असे हे उतुंग व्यक्तिमत्व. मी अमळनेरचा म्हटल्यावर त्यांना आनंद झाला. गाडगेबाबा, साने गुरुजी, अमळनेरची जत्रा याबाबत त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझ्यासाठी ती मेजवणी होती!

बाबा अमळनेरच्या आठवणी सांगू लागले. मलाच भारावून गेल्यासारखे झाले. अमळनेरला जाण्यासाठी आई कृष्णाची समजूत काढत होती, लेकरा, आमच्या ह्या वढाताणीत तुझ्या लिव्हण्या- वाचण्याचा खेळखंडोबा नग, तवा तुला मामासंगती धाडायचं यवाजलंय. तवा तू साळा सीक, अमळनेरची तुझी आजी आबाळ न्हाय होऊ दियाची.

कृष्णा देशावरून खानदेशात येऊन पोहचला. तो अमळनेरच्या नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये जाऊ लागला. वाटेवर साने गरुजींचे निवासस्थान होते. ते प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक होते. (प्रताप हायस्कूलचा माजी विद्यार्थी म्हणून माझ्यासारख्याला आजही स्फुरण येते.) त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचे लोण खेडोपाडी पोहचले होते. साने गुरुजींच्या पुढाकारातून अमळनेरला मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या सभा व्हायच्या. त्यात देशभक्तीपर गाणी, पोवाडे, कविता सादर केल्या जायच्या. त्यात कृष्णा उत्साहाने सहभागी व्हायचा.

साने गुरुजींच्या सभेत एकदा कृष्णाने ‘रमला कुठे गं कान्हा’ हे गीत म्हटले. ते ऐकून गुरुजींनी त्याच धर्तीवर सारी राष्ट्रे जाती पुढती, मिळवा जगी हो ज्ञाना हे गाण लिहून दिले आणि कृष्णाला गायला सांगितले. या प्रसंगाची आठवण सांगताना शाहीर साबळे म्हणत, अमळनेरला मला पाठविलं होतं शिक्षण घ्यायला. ते काही माझ्या नशिबी नव्हतं; पण ज्ञान मात्र मी मिळवलं या जगाच्या शाळेतून.

गुरुजींच्या त्या उत्स्फूर्त गीताने कृष्णा भारावून गेला होता. त्याने विचारले, मलासुद्धा असं गीत रचता येईल का? गुरूजी हसून म्हणाले, नक्की येईल, प्रयत्न कर. साक्षात सानेगुरुजींचे कृष्णाला आशीर्वाद लाभले. त्याची धडपड सुरू झाली.

अमळनेरला आवळे नावाचे स्टेशनमास्तर होते. ते संगीत साधनाही जोपासत. ते राहायला कृष्णाच्या आजीच्या शेजारीच होते. कृष्णाच्या आवाजाचे ते नेहमी कौतुक करीत आणि आजीचे बोलणे खात. प्रख्यात गायिका हिराबाई बडोदेकर यांचा एकदा अमळनेरमध्ये मुक्काम होता. आवळे मास्तरांची हिराबाईंशी ओळख होती. त्यांनी कृष्णाला हिराबाईंकडे गाणे गाण्यासाठी नेले. इतक्या मोठ्या गायिकेसमोर कृष्णाने संकोचाने गाणे गायले. बाईंनी कृष्णाचे कौतूक केले. शाबासकी देत म्हणाल्या, मास्तर, गोड गळा लाभलाय पोराला. गाण्याच्या हरकती समजून घेतल्यात त्यानं. खड्या आवाजाची देणगी लाभलीय. येवढ्या लहान वयात ही जाणीव? खरंच वाटत नाही. तेव्हा मास्तर, तुम्हाला सांगते, सहा महिने आमच्याकडं ऱ्हायला तर नाव काढील. विचारा त्याच्या घरच्यांना.

         अमळनेरमध्ये प्रत्येक जाणकाराला कृष्णाचा लळा लागायचा; पण आजी गाणे शिकायला सहा महिने काय सहा मिनिटेही पाठवणार नाही, याची त्याला पुरती जाणीव होती. कृष्णाला बालपणापासूनच गाण्याचा छंद होता. त्याच्या भवताली जन्मापासूनच गाणे होते; पण आई चिंतीत असायची. गायलास तर अमळनेरला आजीकडे पाठविन,’’ अशी धमकी ती द्यायची.

धमकी खरी झाली; पण कृष्णाच्या आयुष्याला अमळनेरमध्ये पैलू पडले. आईचा गाण्याला विरोध होता, असे नाही; पण गळ्याच्या पोषणाच्या नादात पोटापाण्याची आबाळ होऊ नये, याची तिला काळजी वाटायची. ती म्हणायची, गाण्यानं पोट भरत नाही. हाताला काम असंल तर विरुंगुळा म्हणून ओठावर गाणं असावं.  

         कृष्णा अमळनेरहून पसरणीला गेला. कृष्णाला समज येऊ लागली होती; पण गाण्यापासून दूर जात होता. तो आता कृष्णा साबळे म्हणून उदरनिर्वाहासाठी मुंबईत आला. मीलमध्ये नोकरी करू लागला. स्वराज्य मीलमध्ये एकदा साने गुरुजी येणार होते. कृष्णाला कळले. तो तिथे गेला. गुरुजींनी बहुदा ओळखले नाही. तो म्हणाला, गुरुजी मी कृष्णा… तुमचा कृष्णा… कृष्णा साबळे… अमळनेरचा कृष्णा!

         गुरूजींना आनंद झाला. कृष्णा गात नाही कळल्यावर गुरुजी म्हणाले, तू जीवंत कसा? गाणं तुझा श्वास आहे. गाण्याची तुझ्या आत्म्याला गरज आहे. तू शाहीर आहेस. तू फक्त गात नाहीस तर जनतेला तू चेतवतोस आणि त्यांच्या भावनांना पेटवतोस.

         गुरुजींच्या शब्दांनी कृष्णाचाच अंतरआत्मा जागृत झाला. सर्व विरोध झुगारून कृष्णाने गाण्याचा निर्धार केला आणि महाराष्ट्रला एक उतुंग शाहीर लाभले… शाहीर कृष्णराव साबळे! सिनेमात हा प्रसंग अधिक भावोत्कटपणे चितारला आहे. सिनेमाच्या मध्यांतरापर्यंत शाहीर साबळे आणि अमळनेरचे संदर्भ मध्येमध्ये येत राहतात. मध्यांतरानंतर शाहिरांची यशाची चढती कमान आणि जगण्यातील चढउतारही उलगडत जातात. त्यांच्या जीवनातील काव्य आणि कारुण्याचे दर्शन होते.   एका अद्‌भूत व्यक्तीच्या जगण्याची अनुभूती घेत मी वैयक्तिकरीत्या अमळनेरकर म्हणून थिएटरमधून बाहेर पडलो होतो.  

अमळनेर हे शहर खानदेशातील सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि सांस्कृतिक पंढरी आहे. श्रीमंत प्रताप शेठ यांनी इथे कापड मील उभारली. अण्णाभाऊ साठे यांनी अमळनेरच्या मील कामगारांवर पोवाडा रचला, ‘अमळनेरचे अमर हुतात्मे लाल नऊ तारे, रक्तामाजी विझले निखारे ते धगधगणारे’ 1945 मध्ये मोहम्मद हुसेन हाशम प्रेमजी यांच्या ‘वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट लिमिटेड’ने म्हणजे ‘विप्रो’ने पहिला श्वास येथेच घेतला. विप्रोच्या आजच्या महाकाय वटवृक्षाचे बिजारोपण इथेच झाले. भारतभरासाठी महत्वाची ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी’ (तत्त्वज्ञान मंदिर) इथे उभी राहिली. त्यामुळे देश- विदेशातले आणि साने गुरुजींसारखी माणसे अमळनेरशी जोडली गेली.

प्रख्यात अभिनेत्री स्मिता पाटील यांचे मूळ गावदेखील अमळनेरमधीलच. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील, काका उत्तमराव पाटील आणि काकू लीलाताई पाटील यांच्याशिवाय इथल्या इतिहासाची पाने ओलांडता येत नाहीत किंबहुना तो पूर्णच होऊ शकत नाही. उत्तमराव पाटील साने गुरुजींचे आवडते विद्यार्थी होते. खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे असा विशाल दृष्टिकोन इथेच अंकुरला. साने गुरुजींनीच बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो अशी स्फूर्तीदेखील या मातीत जागविली.

साने गुरूजी प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक होते. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाची शिकवण देण्यासाठी हस्तलिखित ‘छात्रालय’ आणि छापील ‘विद्यार्थी’ ही दोन नियतकालिके सुरु केली होती. दोन्हीतील लेखण वाचून तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्याने प्रताप हायस्कूल हे राष्ट्रद्रोही मच्छरांची पैदास करण्याचे ठिकाण बनले असल्याचा शेरा मारला होता. राजकारण, समाजकारण व देशप्रेमाने भारवलेल्या या भूमीतूनच वारकरी संप्रदायाचा ध्वज मोठ्या डौलाने आपल्या खांद्यांवर फडकवित संत सखाराम महाराजांनी खान्देशात भावजागरण केले.

अमळनेर मध्ये आता तब्बल 71 वर्षानंतर पुन्हा साहित्याचा गजर होणार आहे. मराठी वाङ्मय मंडळ आयोजक आहे. 1952 मध्ये इथे पहिल्यांदा साहित्य संमेलन भरले होते. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी अध्यक्ष होते. यावेळी कोण अध्यक्ष असेल याची उत्सुकता आहे. सोशल मीडायावर लोकांनी आपले अध्यक्ष जाहीर करून टाकले आहेत. कुणी तरी अभय बंग यांचे नाव सूचविले आहे. साने गुरुजींचा सहवास लाभलेले बाबा आढाव याचंही नाव कुणी तरी घेतलं आहे. जळगाव जिल्ह्यात 1984 (शंकरराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली) नंतर प्रथमच साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे मराठी कादंबरीला, साहित्याला नवा आयाम देणारे भालचंद्र नेमाडे यांना अध्यक्ष केले पाहिजे, असेही काहींना वाटते. अध्यक्षाचे नाव जाहीर होईपर्यंत सोशल मीडियावर साहित्यिक गप्पा अशाच सुरू राहतील. अध्यक्ष कोणीही होवो; पण तो साहित्यिक असावा, असा मिस्किल टोलाही एकाने या गप्पांत हाणला आहे. गेल्या रविवारी (ता. 30) नेमाडे सरांच्या घरी गेलो होतो. त्यांना सहज सोशल मीडियावरच्या गप्पांविषयी सांगितले. ते म्हणाले, मुळात मी साहित्य संमेलनाला जात नाही. लिखाणाचं बरंच काम बाकी आहे. लोक ‘हिंदू’च्या दुसऱ्या भागाविषयी विचारणा करत आहेत.

 अमळनेरसारख्या गावात भव्यदिव्य साहित्याचा मेळा फुलणार आहे. अमळनेर निमशहरी किंवा गाव म्हणून लहान असले तरी त्याची ‘लिगसी’ खूप मोठी आहे. त्याची प्रचिती ‘माझा पोवाडा’मधील शाहीर साबळेंच्या विधानातून येते. ते म्हणतात, अमळनेरनं मला भरभरून दिलं. अमळनेरच्या वास्तव्यात माझ्या कलागुणांचा चोहोबाजूंनी विकास झाला. थोरामोठ्यांच्या सहवासाने लोखंडाला ‘परिसा’चा स्पर्श लाभल्यामुळे माझं अवघं जीवन सुवर्णमय झालं!

डॉ. जगदीश मोरे

संदर्भ: 1) शाहीर साबळे यांची मुलाखत, 2005, मुंबई

         2) साबळे शाहीर, माझा पोवाडा, मेजेस्टिक प्रकाशन, मुंबई

         3) https://vishwakosh.marathi.gov.in

         4) महाराष्ट्र शाहीर, केदार शिंदे दिग्दर्शित सिनेमा


Monday 24 April 2023

बेडकाच्या भाजीवरून आठवलं म्हणून... (सचिन तेंडुलकर)

 

 तोच तो सचिनला आवडणार वडापाव

सचिन खवय्यादेखील आहे. वांद्र्यातील चिकन बिरयाणी त्याला विशेष आवडते. त्याचं वडापाववरचे प्रेम तर सर्वश्रुत आहे; पण एकदा तो मित्राच्या घरून जेऊन आला. बेडकाची भाजी खाल्ल्याचे त्याने घरी सांगतले. सगळेच चक्रावले. नंतर लक्षात आले. त्याने भेंडीची भाजी खाल्‍ली होती, हा किस्सा सचिनच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त त्याचाच मोठा भाऊ नितीन तेंडुलकर यांनी आज लिहिला आहे. यावरून सहज आठवलेल्या काही सूरस कथा... दंतकथा....     

हॉटेलातल्या वडापावला गाडीवरच्या वडापावची चव शक्यच नाही. उगाच टापटीप आणि स्वच्छतेची कास धराल तर चवीला मुकाल. टिशू पेपरात पॅक केलेल्या वडापावपेक्षा रोजचे इश्यू मांडणाऱ्या वर्तमानपत्राच्या रद्दीत गुंडाळलेला वडापाव अधिक चविष्ट असतो. गाडीवरचा वडापाव दिसला की, तोंडाला पाणी सुटतेच. पाय आपोआप थबकतात. सुट्टे पैसे नसले तरी भागते. तेलाने कळकट मळकट झालेला क्यूआर कोड बहुतांश गाड्यांवर असतोच. आपल्या मोबाईलात गुगलपे, पेटीएम असतचं ना. विरासतीत मिळालेल्या संपत्तीसारखे! तोपर्यंत वडापावच्या अनावर ओढीनं जिभेवरचे पाणी ओठांचा बांधही ओलांडू पाहते. तेंव्हा आठवतो अवघ्या क्रिकेट जगताचा लाडका सचिन आणि त्याचा लाडका वडापाव. मग काय ‘आयला वडापाव’!

तुम्हाला म्हणून सांगतो सचिनच्या आवडीचा आणि तो खायचा (असं म्हणतात) तोच वडापाव खायचो बरं का आम्हीपण!

खोटं वाटतंय?

सचिन राहायचा कलानगरला वांद्रे पूर्वेत. ‘मातोश्री’पासून फर्लांगभर अंतरावर. आपल्या सर्वांना माहीत आहे- त्याची शाळा शारदाश्रम! तत्पूर्वी मात्र तो होता, वांद्रे पूर्वच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. क्रिकेटसाठी तो दादरच्या शाळेत गेला होता. नावारुपाला आला आणि राहायला वांद्रे पश्चिमेला गेला.

विषय आहे वडापावचा. शासकीय वसाहतीत न्यू इग्लिश स्कूलकडे जाताना वडापावचा एक लोकप्रिय अड्डा लागतो. सचिनला तिथला वडापाव आवडतो, लोक चवीने अशी चर्चा करतात. खरे खोटे माहीत नाही; पण चिनने स्वत: ट्विट केल्याशिवाय त्यांच्या या वडापावचे ‘सत्य’ उलगडणार नाही. माणूस मोठा झाला त्याच्या नावाभोवती अशा कथा- दंतकंथा अविष्कृत होतात. बाकी एकूणच वडापावच्या प्रेमाविषयी सचिनने स्वत: ‘सचिन अ बिलिएन ड्रिम’मध्येही सांगितले आहेच. शिवाय विविध मुलाखती किंवा कार्यक्रमांतही सचिन वडापावविषयी बोललाच आहे; पण मला उत्सुकता आहे ती वांद्र्यातल्या वडापावशी असलेल्या सचिनच्या कथित नात्याची.

मी वांद्रे शासकीय वसाहतीत राहायचो तेही त्या वडापावच्या अड्ड्याजवळ. सचिनचं नक्की माहीत नाही, नुसतीच चर्चित चर्वणे; पण अजित तेंडुलकर यांना (कोविडकाळापूर्वी) तिथून वडापाव पार्सल घेऊन जाताना मी स्वत: पाहिले आहे. तिथं आणि एमआएजीत ‘वॉक’च्या वेळी (विशेषत: संध्याकाळी) अजित तेंडुलकरांना पाहिल्यावर साक्षात सचिनचं दर्शन झाल्याचा भाव मनात जागृत व्हायचा. दुधाची तहान ताकावर भागायची एवढंच!

एमआयजीत कधीकधी सकाळी लवकर अर्जुनही नेट प्रॅक्टिससाठी आयचा आणि क्रिकेटच्या देवाच्या वारसदाराचे दर्शन घडायचे. वडापावऐवजी फक्त चटणीच वाट्याला आली तरीही आनंद मानून घेण्यासारखं. केवढं ते अप्रूप! यंदाच्या हंगामात तर अर्जूनचे आयपीएलमध्ये पदार्पणही झालं आहे. तो त्याची स्वत:ची ओळख प्रस्थापित  करेल  की नाही? या प्रश्नाचे उत्तर काळच देईल.  

आणि हो, एकदा चार्वी वडापाव घेऊन आली. जाम खूश होती. मी विचारले, वडापावच आणलाय ना?

ती म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का? सचिनचा भाऊ अजित तेंडुलकर...

मलाच काय सगळ्यांना माहीत आहे. त्यात काय गुपित! मी उद्‌गारलो.

तसं नाही. पूर्ण ऐकणार आहात का?

मग कसं? ते सांग

अजित तेंडुलकरही माझ्यासोबत आपल्या इथंला वडापाव घेत होता! अजित तेंडुलकर जणू काही तिचा समवयस्कच. केवढं ते कौतुक!

सचिनचे पुस्तक असो की सिनेमा अथवा मुलाखत- वडापावचे रवंथ झालेच पाहिजे. तो आता मैदानात चौके- छक्के मारत नसला तरी त्याचे गारुड आजही कायम आहे. कुठलेही ट्विट करो प्रसिद्धी आहेच. अलीकडेच सचिनने बेस्टच्या 315 नंबरच्या बसचा एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला होता. सचिन त्याच बसने कलानगर- शिवाजी पार्क- कलानगर असा प्रवास करायचा. त्याच आठवणींना त्याने या व्हिडिओत उजाळा दिला आहे. आधीही त्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मग आपणच का मागे राहवे या बसशी नाते जोडायला? शासकीय वसाहतीत राहत असताना पहिल्यांदा आधारकार्ड काढताना पत्त्याचा लॅंडमार्क म्हणून ‘315 बेस्ट बस स्टॉपजवळ’ असे लिहिले होते. याच बसने सचिन जायचा, हेच तेव्हा  डोक्यात होते. त्याचेही भलतेच कौतुक. शासकीय वसाहतीत काही अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या आता दुसऱ्या पिढ्याही आहेत. त्यातील बहुतांश जण न्यू इंग्लिस स्कूलमध्येच शिकले आहेत. त्यातील  काही जण सांगतात, सचिन एक वर्षे आमच्या मागं होता... एक वर्षे पुढं होता; पण तेव्हा तो कुठं एवढा मोठा होता! आम्ही सोबत होतो आणि आजही एकमेकांना ओळखतो, असे सांगणारा मात्र कोणीच घावला नाही.

शासकीय वसाहतीत कॉलनीत एक सलून होते. त्यातला एक चाचा हमखास सांगत असे, सचिन केस कटवाने मेरे पास आता था. बहुत प्यारा बच्चा था. मुझे चाचा कहे कह के पुकारता था. पण कुणास ठावूक चाचाच्या बोलण्यावर काही विश्वस बसेना; पण जनश्रुती म्हणून त्यांचा आनंद घ्यायला काय हरकत आहे? असो!

सचिनचं सोडा. मूळ विषयाकडे वळा. आपला विषय आहे वडापाव!

भारतातील पहिल्या ॲपल स्टोअरचे उद्घाटन गेल्या आठवड्यात (18 एप्रिल) मुंबईत झालं. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी त्याचं उद्घाटन केले. टीम कूक यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचीही भेट घेतली. माधुरी यांनी टीम कुक यांना वडापावचा पाहुणचार केला. ते  स्वत: माधुरीने ट्विट केले. वडापाव स्वादिष्ट असल्याचे म्हणत कुक यांनी रिट्विट केले. ‘तेजाब’ मधल्या ‘मोहिनी’ने कुक यांना वाडपावची मोहिनी घातली.

मुंबईत वडापाव कुठलाही असो, मुंबईकरांच्या जिभेवरचं त्याचंही गारूड कधीच कमी होणार नाही. फार तर वडापावचा जुना ‘ब्रॅड’ लुप्त होतो. दुसरा ब्रँड काही काळासाठी नव्यानं नाव कमवितो; पण मुंबईकरांचं वडापावावरचं प्रेम काही कमी होत नाही. शिवाय कधी तेंडुलकर तर कधी माधुरीसोबत टीम कूकमुळे वडापावला प्रसिद्धी मिळतचे. कष्टकऱ्यांही ‘वडापाव’तो. कारण बजेटमध्ये तोच बसतो. खवय्यांची मात्र चंगळ असते. म्हणून तर वडापाव दिसताच क्षणी जीभ पाणावते!

                   -जगदीश मोरे

Tuesday 4 April 2023

तो राजहंस एक

 

नवरी मिळेना शेतकऱ्याला

मातीशी नातं तोडायचं असतं, असं नाही; पण शेतीत पिकणाऱ्या दारिद्र्यावर जगण्यासाठी पुढच्या आणखी किती पिढ्यांना मातीत ढकलावं, हा त्याच्या सुप्त मनातला सवाल असतो. ‘सोनं पिकविणारी आपली काळी आई’ आणि ‘आपण आहोत जगाचे पोशिंदे’, या सुविचारांच्या स्मरणानं त्याचं पोट भरत नाही आणि सरणापुरती लाकडंही पिकत नाहीत. मग शेती करणाऱ्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नाही. त्याचं आक्रंदन हेलावून टाकतं. तेच ‘तो राजहंस एक’मधून प्रतित होत राहतं...

थाटामाटात वरात निघाली होती. घोड्यावर स्वार नवरदेव एकामागून एक येत होते. वरात मोठी होती. वऱ्हाडी कमी, नवरदेव जास्त होते. ती सामूहिक विवाह सोहळ्याची वरात नव्हती. तो उपवर मुलांचा मोर्चा होता. लग्नाला मुली मिळत नाही म्हणून! हा लक्षवेधी मोर्चा निघाला होता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर. गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीकडेही यानिमित्तानं गांभीर्यानं लक्ष वेधलं गेलं; पण शेती कसणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली न मिळणे हा विषय किती ज्वलंत आहे, याची ‘तो राजहंस एक’ हे नाटक पाहिल्यावर केवळ कल्पनाच येत नाही, तर संवेदनशील माणसाचं ह्रदय पीळवटल्याशिवाय राहत नाही.

नाटककार दत्ता पाटील यांनी लिहिलेले ‘तो राजहंस एक’ हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्टतर्फे आयोजित राष्ट्रीय वसंत नाट्य महोत्सवात पाहण्याच्या योग आला. साताऱ्याच्या ‘परिवर्तन’ या संस्थेच्या ‘मानसरंग प्रकल्पां’तर्गत दिग्दर्शक सचिन शिंदे यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. दत्ता पाटील आणि सचिन शिंदे यांच्यासोबतचे एक जबरदस्त नाव म्हणजे प्राजक्त देशमुख. प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शीत ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर अनेक विक्रम रचत आहे. ‘तो राजहंस एक’मध्ये प्राजक्त ज्ञानेशच्या भूमिकेत शिरतो आणि प्रेक्षकाच्या काळजात घर करतो.

ज्ञानेश स्वप्नांच्या आशेवर जगत राहतो. तो कवी आहे. जागतिक कवी होण्याची त्याला आस आहे; पण त्याच्या कवितांना विचारतय कोण? नैसर्गिक न्यायही त्याच्या वाट्याला नाही. काव्यागत न्यायापासून त्याचं जगणं कोसोमैल दूर आहे. परिस्थितीनं त्याला भ्रमित केलंय. अवघा भवतालच संभ्रमित झाला आहे. त्यात तो स्वत:च अस्तित्व शोधतोय. तिशी उलटली आहे. तेहतीसचा झाला आहे. चौतीस मुलींच्या घरचे कांदेपोहे खाऊन उपयोग झालेला नाही. त्याला मुली आवडतात. मुली त्याला नाकारतात. लहान भाऊ सुधीर संसारात रमलाय. बारावी नापास झाल्यावर सुधीरनं मार्केट कमिटीत हमाली वगैरेचं काम धरलं. त्यामुळे कुटुंबात आणि गावात तो महत्वाचा माणूस वाटतो. ज्ञानेश एम.ए. झाला आहे; पण शिक्षकाच्या नोकरीसाठी लाच द्यायला दहा लाख रुपये नाहीत. बाप लाचेसाठी शेतीचा तुकडा विकायला तयार नाही. न कळत्या वयात आई सोडून गेली आहे. कुटुबांची त्रेधातिरपीट उडाली आहे. पस्तिसावं स्थळ सांगून आलं आहे. ज्ञानेशला आता कांदेपोह्याचं आकर्षण राहिलं नाही. तरी वडील आणि भावाच्या आग्रहस्तव तो मुलगी बघायला जातो. मधुरा त्याला नुसतीच आवडत नाही; तर ती त्याला भावतेही. तीही सह्रदयी आहे; पण तिचीसुद्धा काही स्वप्नं आहेत. दोघांच्या स्वप्नांच्या प्रवासातून कथासूत्र पुढं जातं. ती त्याच्या स्वप्नांची राणी होते की नाही, तेच तर बघण्यात खरी मजा नाही; वेदना आहे. तरुण शेतकऱ्याचं ते आक्रंदन आहे.

‘तो राजहंस एक’च्या माध्यमातून दत्ता पाटील आपल्या जबरदस्त लेखणीनं शब्दवेदनांचा विस्मयकारक प्रवास घडवून आणतात. अल्पभूधारक किंवा लहान शेतकऱ्याची दु:खं किती भव्य असतात, त्याच्या जगण्याचं सबळ कारण शेतीचा तुकडा असतो आणि मरण्याचंही कारण तोच तुकडा असतो. असाच तुकडाधारी शेतकरी- ज्ञानेश आणि त्याचा बाप आत्महत्येच्या सीमेवर उभा आहे. आईनं तर पदरातली कोवळी मुलं सोडून ही सीमा ओलांडली आहे. शेतकऱ्याच्या जगण्याची कल्पना फक्त ‘जगाचा पोशिंदा’ ही भली मोठी उपाधी माहीत असणाऱ्याला, अरेरे हे असंही असतं! असे उद्‌गार काढायला हे नाटक भाग पाडतं.

प्राजक्त देशमुखनं ज्ञानेशच्या भूमिकेत जीव ओतला आहे. त्यासाठी त्यांनं लावलेल्या आवाजानं आपलं काळीज कंपित होतं. प्रेक्षक कानांत आणि डोळ्यांत जीव एकवटून तल्लीनतेनं वेदनेची अनुभूती घेतात. अस्वस्थ होतात. अल्पभूधारक किंवा लहान शेतकऱ्याच्या मुलाच्या मानसशास्रीय स्थितीचा वेध घेणारं हे नाटक पाहताना आपणही प्रेक्षक म्हणून स्वत:च्या मन:स्थितीचा ठाव घेऊ लागतो. स्वत:चं अस्तित्व चाचपळून पाहतो. विषय- आशयाच्या परिप्रेक्ष्यात स्वत:चं स्थान शोधू लागतो. शेती आणि मातीशी असलेलं नातं किलकिलं करत शहराची वाट धरून योग्य ते केल्याचं समाधान मानायचं की पळ काढला म्हणून सल बाळगायची, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. शहरात गेल्यावर आयुष्याची घडी न बसल्यास मात्र अब मैं राशन की क़तारों में नज़र आता हूँ, अपने खेतों से बिछड़ने की सज़ा पाता हूँ या खलील धनतेजवी यांच्या रचनेप्रमाणे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी गत होते.

शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी शेतकऱ्याच्याही मुली मिळत नाहीत. शेतीत पुरेसं पीकत नाही. नोकरी नाही. रोजगार नाही आणि लग्नही जुळत नाही. तरणीबांड पोरं व्यसनाच्या आहारी जातात. दारू, सिगारेट नित्त्याचं होतं. अशाच मुलांचा शेतकरी बाप शेतकरी जावई नको म्हणतो. त्याच्या वाट्याला आलेलं कृषक जीवन तो आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी नाकारतो. शहरातला नोकरी- व्यवसायवाला जावई मिळावा म्हणून तो मुलीच्या लग्नासाठी शेतीचा तुकडा विकण्याच्या तयारीत असतो. त्याला मातीशी नातं तोडायचं असतं, असं नाही; पण शेतीत पिकणाऱ्या दारिद्र्यावर जगण्यासाठी पुढच्या आणखी किती पिढ्यांना मातीत ढकलावं, हा त्याच्या सुप्त मनातला सवाल असतो. ‘सोनं पिकविणारी आपली काळी आई’ आणि ‘आपण आहोत जगाचे पोशिंदे’, या सुविचारांच्या स्मरणानं त्याचं पोट भरत नाही आणि सरणापुरती लाकडंही पिकत नाहीत.

‘शेतकरी’ या शब्दाची आस्मिता राजकीय पटलावर कितीही टोकदार झाली तरी अल्पभूधारक किंवा लहान शेतकऱ्याच्या जगण्यात काहीच फरक पडत नाही. ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी माल्कम डार्लिंग यांनी 1925 मध्ये शेतकऱ्याच्या दारुण परिस्थितीविषयी असे उद्‌गार काढले होते, भारतीय शेतकरी कर्जबाजारी म्हणूनच जन्माला येतो. कर्जबाजारी म्हणूनच जगतो आणि कर्जबाजारी म्हणूनच त्याचा अंतही होतो. शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय पुढं येतो तेव्हा अनेक जण नकारात्मक असतात. काही अर्थतज्ज्ञांना त्यात नैतिक धोकाही दिसतो. कर्जमाफीची सवय लागेल, असं त्यांना वाटतं; पण के. एन. राज यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाचा दृष्टिकोन वेगळा असतो. ते म्हणतात, सरकार रस्त्याच्या विद्युतीकरणावर पैसे खर्च करते आणि जे कोणी या रस्त्याचा वापर करतात ते करदाता असोत अगर नसतो. सर्वांनाच या सेवेचा लाभ मिळतो, याच अर्थाने पाहिले तर कर्जमाफी ही समाज हितासाठी नसून त्या शेतकऱ्याच्या वैयक्तिक हितासाठी आहे,से वरकरणी वाटते कारण त्याचा लाभ मुख्यत्वे करून कर्जदाराला होत असतो; परंतु दारिद्र्याने गांजलेल्या कर्जात गळ्यापर्यंत बुडालेल्या एखाद्या शेतकऱ्याला जगवण्यासाठी कर्जमाफी देणे, शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाची सोय करणे, ग्रामीण जीवनात स्थैर्य आणणे. या गोष्टींचे सामाजिक लाभही पुष्कळ आहेत. म्हणून कर्जमाफी हे एक अनुदान आणि एक समाजहिताची गोष्ट आहे.

‘तो राजहंस एक’ या नाटकात शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय नाही; पण शेतकऱ्याच्या जगण्याकडे किती अतंर्विरोधातून पाहिले जाते, हे दिसते. शेवटी शेतऱ्याची ‘जात’च दुर्दैवी ठरते आणि त्या दुर्दैवी जातीचा ज्ञानेश प्रतिनिधी असतो. या दुर्दैवी जगण्यात वर्तमानाच्या खोलीत भूतकाळ आणून ठेवला जातो. मग तिथं वर्तमानालाच जागा राहत नाही. सतत एड्यागत सतावणारी जगण्याची त्याची भ्रांत संपत नाही. पहाट होते… शेणकुटाचा वास येऊ लागतो… गाई- बैलांच्या गळ्यातील घुंगरू निनादू लागतात… तो शेतकऱ्यासाठी अर्ल्ट असतो- सोसायटीच्या कर्जाचा हप्त्याची तारीख जवळ आली आहे! हे ज्ञानेश सांगतो तेव्हा प्रेक्षकांचे डोळे पाणावलेले  असतात.

शेतऱ्याच्या वेदना जगाला कशा कळत नाहीत किंवा दिसत नाहीत म्हणजे त्या जागतिक का होत नाहीत, हा ज्ञानेशच्या कवितांचा आशय असतो. शेतकऱ्याची दु:खं तो कवितांतून प्रतित करतो; पण शेतकऱ्याच्या पोरानं मनातलं लिहिलं तरीही तो किंवा त्याचं लिखाण जागतिक होत नाही. चार भिंतीआडच्या लैंगिक संबंधांच्या व्हिडिओ क्लिप जागतिक (व्हायरल या अर्थानं) होतात; पण आपली कविता जागतिक होत नाही. नोकरी नाही. रोजगार नाही. शेतात पिकत नाही. आपण केवळ पृथ्वीवरचा पर्यायानं जगावरचा भार आहोत, याची त्याला जाणीव आहे. तरीपण आपण जागतिक का होत नाही, हे ज्ञानेशचं दु:ख आहे. ज्ञानेशचे जीवनमूल्यांविषयीचे विचार स्पष्ट आहेत; पण त्याचं भविष्य पुसट आहे.

ज्ञानेश जगण्यातला विरोधाभासही मांडतो. शेतकरी बाप पोराशी संवाद साधत नाही की त्याला संवाद साधण्याची उसंतच मिळत नाही. संवाद साधण्यात वेळ गेल्यास आहे तेही त्याला गमविण्याची भीती सतावत असावी. ज्ञानेशला मोटार सुरू कर, मोटार बंद कर, पावसाला काय रोग झालाय, यंदासारखं उन उभ्या जन्मात बघितलं नाही एवढाच बापासोबतचा संवाद आठवतो आणि तोच नेहमीचा असतो. ही पृथ्वी माझ्या बापाच्या आणि भावाच्या कष्टानं हिरवीगार झाली आहे, असं तो लिहित असताना त्याचा भाऊ, ‘नवरी नटली आणि सुपारी फुटली’ या गाण्यावर कुठल्याशा तरी मिरवणुकीत नाचत असतो. कविता लिहिणारे नावा पुढं ‘कवी’ लावतात. कोणी ‘डॉक्टर’ लावतो. कुणी ‘ॲडव्होकेट लावतो. मगी मी ‘शेतकरी ज्ञानेश्वर दिलीप गांगुर्डे’ असं लिहिलं तर का नाही चालत. ‘शेतकरी’ शब्दाला मान किंवा जगमान्यता का नाही? हा त्याचा सवाल आहे. इथं भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतील एक संवाद आठवतो, खंडेराव, तू शेती करायचं ठरवलं तर नवरा होवू नकोस आणि लग्न करायचं ठरवलं तर शेतकरी होवू नकोस. संपूर्ण नाटकात शेतकऱ्याच्या जगण्याची परवड दत्ता पाटलांनी मांडली आहे. शेतकऱ्याचं जगणं शाप आहे, याची कल्पना ‘हिंदू’तल्याच आणखी एका संवादातून येऊ शकते, अरे मागच्या जन्मात काही पाप केलं अशील नं, तव्हा तं आपुन शेतकरी झालू? ते शिवलीलामृत बी बदलावं लागील भौ- शिवशंबू एकान्तात पार्वतीबरोबर क्रीडा करत असताना एक गंधर्व चुकून त्याच्या खोलीत घुसला. त्याला शाप दिला शंभूनं- जाय, तू महाराष्ट्रात शेतकरी व्हशील. हॉ हॉ हॉ

पार्श्वसंगीत आणि प्राजक्तच्या आवाजातील पार्श्वनिवेदनातूनही ‘तो राजहंस एक’ नाटक थेट ह्रदयाला भिडतं. इथं मात्र प्राजक्तचा आवाज भारदस्त असतो. नेपथ्य फारसं नसलं तरी ते आशयाला गर्भित करतं. प्रकाश योजनेमुळे काही प्रसंग विशेषत: हत्तीचा संदर्भ अधिक आशय संपन्न होतो. नाटकाची भव्यता वाढते. प्रेक्षकांतली अस्वस्थता गडद होते. नाटकात ज्ञानेशशिवाय इतरही पात्र आहेत. बाप आहे. लहान भाऊ आहे. मधुरा आहे आणि त्याला समजून घेणारा मित्र पभ्या आहे. या पात्रांच्या वाट्याला लहानलहान भूमिका आहेत. त्याततला सुपरिचित चेहरा म्हणजे मधुराच्या भूमिकेतील ‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम अनिता दाते; पण संपूर्ण नाटकात आणि नाटक संपल्यानंतरही ज्ञानेश डोक्यातून जात नाही. पडता पडल्यावर ज्ञानेशच्या डोक्यातला भुंगा आपल्या डोक्यात शिरतो आणि संवेदनशील माणसाचाही मेंदू पोखरू लागतो. ज्ञानेशनं साकारलेल्या तरुणाच्या काळजाच्या उडणाऱ्या ठिकऱ्या आणि मेंदूचा झालेला भुगा रंगमंचभर इतस्तत: विखुरल्याचा भास खिन्न करतो. ती जादू लेख, दिग्दर्शक आणि प्राजक्तची आहे.

भवतालचा वर्तमान अंधारलेला आहे. भविष्यकाळात हा अंधार अधिक गडत होण्याचा धोका संभवतोय. तो दूर करून शुभ्र आणि नितळ आयुष्य जगण्याची ज्ञानेशला आस आहे. राजहंसासारखी जगण्याला शुभ्रता लाभावी, यासाठी तो सातत्यानं चिंतन करतो. ते चिंतन कवितांतूनही अभिव्यक्त करतो. मानसिकदृष्ट्या बाह्यज्ञानेश संभ्रमित दिसत असला तरी तो आतून राजहंसासारखा शुभ्र आहे. तो सजग आहे. अंधारातून तो उजेडाकडे झेप घेऊ पाहत आहे. त्याला निर्मळ आणि मोकळ्या आकाशात राजहंसारखा मुक्त विहार करायचा आहे. त्यासाठीच त्याची धडपड आहे.      

‘तो राजहंस एक’ची कथा कशी सूचली असावी? हा भल्लाभल्यांना प्रश्न पडतो मराठी, गुजराथी व हिंदी नाटक- चित्रपटातील अभिनेते मनोज जोशींनाही हाच प्रश्न पडला होता. नाटक संपल्यासंपल्या त्यांनी तो थेट दत्ता पाटील यांना विचारला. खरं तर ही कोण्या एका तरुण शेतकऱ्याची कथा नाही; पण लहान शेतकऱ्यांच्या रोजच्याच जगण्याची वेथा आहे. प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवारदेखील ‘तो राजहंस एक’ हे नाटक पाहण्यासाठी आले होते. हजारो वर्षांच्या परंपरांच विघटन होतानाचा पट यात मांडलायं. या नाटकातून काही तरी भव्य प्रतित होते. ते एकदा पाहून संपूर्णपणे कळणार नाही.

-डॉ. जगदीश मोरे

Wednesday 22 March 2023

वसंत ऋतू

 

गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा

         वसंताच्या पुष्पोत्सवात न्हालेल्या चैत्रानं आपल्या आयुष्याच्या ओंजळीत आज आणखी एका नवीन वर्षाचं आणि सृजनशीलतेचं दान टाकलं. दानाच्याबाबतीत तो कधीच कसूर करत नाही; पण गेल्या वर्षाच्या आधीची दोन वर्षे आपल्याला आपली ओंजळ भरून घेता आली नव्हती. एका अदृष्य भयाणूणं माणसाच्या जगण्याच्या मूलभूत प्रेरणेलाच आव्हान दिलं होतं. ओंजळीचं काय अनेकांचं जगणंच त्यानं रितं केलं होतं. अनेक कुटुंबांचे आधारवड डोळ्यांदेखत कोसळले होते. काही कुटुंब निष्पर्ण झाले होते. कोरोनाची पहिली लाट तीन वर्षांपूर्वी वसंत ऋतूच्या सोबतच आली होती. दोन वर्षांपूर्वीची दुसरी लाटदेखील वसंताच्या हातात हात घेऊनच आली होती. ती फारच जीवघेणी होती. कोरोनासुद्धा चैत्रासारखा वसंतसखा भासू लागला होता.

चैत्रपालवी वसंताचा सांगावा घेऊन येते. दोन वर्षे वसंत कोरोनाचा सांगावा घेऊन येत होता. म्हणून गेल्या वर्षी माघातली पानगळ वसंताची चाहूल देत असताना मनात धडकी भरत होती. उघडीबोडकी झाडं भीषणतेचा इशारा करत होती. वसंतानं आपला नवा सखा सोबत आणू नये, हीच प्रार्थना हाती. ती स्वीकार झाली. वसंत एकटाच आला होता. कोरोनाची काजळी फिटू पाहत होती. यंदा तर ती पूर्णपणे निवळली आहे. आता कोरोनाला तीन वर्षे लोटली आहेत. कोरोनापूर्व काळ प्रस्थापित झाला आहे. त्यानं माणसं हिरावल्याच्या वेदना ताज्याच आहेत.

वसंत तोंडावर आला असताना यंदा मात्र पौषातलं धुकं माघच काय फाल्गुनाच्या शेवटापर्यंतही संपायचं नाव घेत नव्हतं. त्याला धुकं तरी कसं म्हणावं? ती प्रदूषणाची काजळी होती. त्यात ऐन फाल्गुनात कुठल्याशा तरी तापानं यंदा पुन्हा कोविळकाळाचं स्मरण करून द्यायला सुरुवात केली होती. मास्क वापरण्याचे सल्ले दिले जाऊ लागले होते. लोकांनी दुर्लक्ष केलं. तो भाग अलाहिदा. धुकं मात्र कायम होतं. बहरणाऱ्या वसंताला ते नजर लावेल की काय ही भीती होती. वसंताच्या आगमनाच्या एक दिवस आधी प्रभातवेळी मुंबई परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. धुकं वाहून गेलं. झाडंझुडपं धुऊन निघाली. सिमेंटचं जंगल म्हणजे शहरं ‘स्वच्छ व सुंदर’ झाली. वसंताची आणि गुढीपाडव्याची पहाट निरामय आसमंत घेऊन आली. प्रदूषणाचं मळभ दूर झालं आणि प्रदूषणात दिल्लीच्या पुढं जाऊ पाहणारी मुंबई माघारी आली. फोटो टिपण्याचा मोह आवरता आला नाही. इतकं स्वच्छ वातावरणाचं दान वसंतानं पहिल्याचं दिवशी दिलं.

निसर्ग तोच आहे. पण आता आमचे जीवन शहरी झाले आहे. जीवनाचे उद्दिष्टेही बदलू पाहते आहे. तरीपण एवढे खरे की कुठे गवातचे पात हलू दे, अद्याप ते आमच्या डोळ्यांना रिझवते. सांजसकाळचे पूर्वपश्चिमेचे रंग सुखदायक वाटतात. वाऱ्याची झुळूक अपूर्व स्पर्शसुख देते. पावसाच्या सरी अजूनही कानांत काळाचे अनादी गूढ कवन ओततात, हे दुर्गा भागवातांचे शब्द कालच्या जगण्याची आठवण करून देतात. अवकाळी पावसानं शहरी वसंत अधिक अल्हाददायक केला असला तरी शेतकऱ्याच्या जीवनात त्यानं पुन्हा पानगळ आणली आहे. पाऊस वेळेवर कोसळतो तेव्हा शेतकऱ्याला ताट मानेनं जगण्यासाठी तोच उभा करतो. अवकाळी कोसळण्यानं त्याचं जगणं उघडंबोडकं झालं. वसंताचं सौंदर्य खुलवणाऱ्या या शहरी पावसाचं किती कौतुक करावं? हा सवाल आहे. खरोखर आपल्या जीवनाची उदिष्टे बदलल्याची, ही साक्ष आहे. आपण प्रदूषण करतो आणि निसर्गाला धुवायला सांगतो. अवकाळी पाऊस कोसळतो तेव्हा बळीराजाचं जगणं वाहून जातं आणि अवकाळी पावसानंही अत्तराचे भाव कोसळतात का? अशा पोस्टी समाजमाध्यमांवर डकवतो.

पौष महिन्यातील म्हणजे हिवळ्यातील धुकं माघात ओसरू लागतं, हा निसर्ग नियम आहे. नद्यासुद्धा आता बारमाही वाहत नाहीत; पण प्रदूषणरुपी धुकं बारमाही राहतं. पाऊस आल्यावर ते थोडेफार कमी होतं. ऋतुचक्रातला हा बदल आहे. आपण त्याला जबाबदार आहोत. दुर्गा भागवतांनीच वर्णन केलेला एक प्रसंग इथं आणखी एक उदाहरण म्हणून सांगता येईल. अश्विनात एखादी पावसाची झड आली की दुसऱ्या दिवशी दुपारी उन्हात भाताच्या शेताजवळून जा. भाताचा सुवास वातावरणात कोंदलेला आढळेल. या दिवसांत मुंबई ते कल्याण एकदा तरी मी जाते. आणि ठाणे ते मुंब्रा भात- शेते रेल्वे लाईनजवळ पसरलेली असतात, त्यांचा दरवळणारा गंध गाडीत बसूनच हुंगण्याची मजा अनुभवते. वळवाचा पाऊस आला की मातीचा सुवास जसा उत्तेजक वाटतो तसाच हा शेतातल्या भाताच्या गंध. ‘ऋतुचक्र’ या पुस्तकातील या ओळी आहेत. आश्विनात आता मुंबई किंवा ठाण्याहून कल्याणला जाता- येताना हे आठवून पाहा. भलतीच अनुभूती येईल. कारण दुर्गा भागवतांनी केलेलं वर्णन 1956 मधील आहे. माणसानं आता निसर्ग पार बदलूनच टाकला आहे. रेल्वेलाईन लगत केवळ झोपड्या आणि एखादं दुसरं टॉवर नजरेस पडतं. आपण पालकात पनीर टाकून तृप्तीचे ढेकर देतो. तो पालक ट्रॅकलगतच्या रिकाम्या जागेवर गटारीच्या पाण्यावर पिकतो. मुळा आणि भेंडी तर फेमसच आहे. बाकी आश्विनात भाताच्या गंधाऐवजी सांडपाण्याचा दरवळ नक्कीच जाणवतो.

असो! आपला विषय वसंत ऋतूचा आहे; पण यास वसंत तरी कसा अपवाद राहणार! तरीही वसंत सृजनशीलतेची प्रेरणा देतो. निसर्गानंच नित्यनियमाप्रमाणे कालपरवा नागडीउघडी केलीली झाडंझुडपं आज पुन्हा हिरवाईनं नटली आहेत. म्हणून वसंत जगण्याला बळ देतो. कोसळल्यावर पुन्हा उभं राहण्याची ताकद देतो. सध्याचं बहरलेलं पुष्पवैभव चैत्रातल्या उन्हातही शीतलता देतं. बेबंधपणे निसर्ग खुलला आहे. रंगांची उधळण आहे. झाडाची शीतल सावली पसरली आहे. त्याचवेळी झाडाला वरून न्याहळण्याचीसुद्धा सोय शहरात असते. टॉवरच्या खिडकीतून नजर फिरवली तर झाडांचं विहंगम सौंदर्य नजरेत भरू लागतं. त्यासाठी वेगळ्या ‘दृष्टी’ची गरच नाही. फक्त डोळे उघडे करून बघता यायला हवं. ते महानगरांतही कमीअधिक दिसतं.  

यंदाचं हे मराठी नवीन वर्ष कोरोनाप्रमाणे सर्वच निर्बंधांपासून मुक्ती देणारं आणि नवी उमेद जागविणारं ठरावं. आपल्या सगळ्यांच्या नवोन्मेषी कल्पनांना वसंतातल्या पुष्पभारासारखा बहार येवो. आपल्या यशाची गुढी गगणाला भिडो. कीर्तीचा गोडवा श्रीखंडासारखा प्रत्येकाच्या मुखी नांदो, याच सदिच्छा!

गुढीपाडव्याच्या पुन:श्च आनंददायी शुभेच्छा!!

                                                                                                                              -डॉ. जगदीश मोरे.


Friday 14 October 2022

उदाहरणार्थ ‘पांडुरंगा’चं दर्शन वगैरे! (#नेमाडे/ #Nemade)

उदाहरणार्थ ‘पांडुरंगा’चं दर्शन वगैरे!

अमूक एक माणूस लिहू शकतो तेव्हा त्याने म्हशीप्रमाणे नियमित दूध किंवा निदान शेण तरी दिलेच पाहिजे, असे आजचे भाबडे साहित्यशास्र सांगते. हे शास्र आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कुठे कळते. कळले तरी आपण कुठे त्यात बसतो. बरं, आपण काही दररोज लिहित नाही आणि लेखक तर मुळीच नाही. ‘लेखकराव’ तर माहीतच नाही. शिवाय फेसबुक वगैरेंवर पोस्टी दररोज डकवत नाही. म्हणून तर उद्याच्या ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त हा लेख लिहिला...

उदाहरणार्थ ‘वाचन प्रेरणा दिना’च्या शुभेच्छा देताना ‘पांडुरंगा’च्या भेटीतून मिळालेल्या प्रेरणेबाबत वगैरे मला काही तरी शेअर करायचे आहे... 

तुमच्या लक्षात आलेच असेल. पांडुरंग सांगवीकर आठवलाही असेल!

तुम्हाला वगैरे सांगण्यारखं म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे सराची बऱ्याच दिवसानंतर नुकतीच भेट झाली. कोरोनापश्चात ही पहिलीच भेट. तीही पुण्यातील मित्र सुनील चव्हाणमुळे. नेमाडे सरांशी जुळलेले ऋणानुबंधही सुनीलमुळेच! कोरोनापूर्वी नेमाडे सरांना बऱ्याचदा भेटण्याचा योग आला आहे. त्यांच्याशी गप्पा म्हणजे आपण समृद्ध होत जातो. त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून दडपण येते; पण माणूस अतिशय प्रेमळ आणि गप्पावेल्हाळ. विविध विषयांवरील त्यांची परखड मते वाचनाची प्रेरणा देत असतात. प्रत्येक भेटीनंतर आपल्या शिदोरीत नवीन प्रेरणा आणि ऊर्जेचा संचय होतो. त्याच भेटीत त्यांचे सारथ्य करण्याचा योग लाभणे आणखीच आनंददायी-  लाभले भाग्य करतो सारथ्य!

            मी वांद्रा येथे राहत असताना विविध कारणांमुळे ने सरांकडे जाणे होत असे. पंधरा दिवसांपूर्वी सरांकडे जाताना माझ्याकडील त्यांची सर्व पुस्तके मी घेऊन गेलो. मला त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या हव्या होत्या. कोणतेही पुस्तक वाचताना पुस्तकावरच अनेक ठिकाणी अधोरेखित किंवा त्याबाबत दोन- चार शब्दांत काही तरी लिहून ठेवण्याची माझी सवय आहे. त्यांच्या पुस्तकांवरही अशाच खाणाखुणा व वाचताना जो विचार आला असेल ते लिहून ठेवलेले होते. त्यावर सरांची नजर गेली. ते मिश्किलपणे म्हणाले, यात माझ्या साहित्याची एक चांगली समीक्षा दडली असावी. मिश्किलता लक्षात घेऊनही सरांची ही टिप्पणी माझ्या अंगावर मूठभर मास चढविणारी होती.

सर, माझ्याकडे ‘मेलडी’ व ‘देखणी’ हे काव्यसंग्रह आणि ‘सोळा भाषणे’ ही पुस्तके नाहीत, ते स्वाक्षऱ्या करत असताना मी म्हणालो.

थांब! गेल्या आठवड्यातच ‘सोळा भाषणे’ची तिसरी आवृत्ती आली. तुला एक प्रत देतो, असे म्हणत लगेचच आतून त्यांनी नवीकोरी प्रत स्वाक्षरी करून मला दिली.

काव्यसंग्रहाच्या प्रती आता नाहीत. लवकरच एकत्रित काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. त्यात सर्व कविता असतील. आल्या- आल्या त्याची प्रत तुला नक्की देईन, असे सांगत त्यांनी त्यांच्या ठेवणीतील मेलडी’ व ‘देखणी’च्या प्रती आवर्जून दाखविल्या.

नेमाडे सरांनी त्यांच्या सर्व पुस्तकाच्या प्रत्येक आवृत्तीच्या प्रती क्रमवार जपल्या आहेत. त्यांची खोली ‘टॉप टू बॉटम’ आणि चौफेर भरगच्च पुस्तकांनी भरली आहे. औरंगाबादमध्ये असताना त्यांनी स्वत: ‘वाचा’ नावाची प्रकाशन संस्था काढली होती. दिलीप पुरुषोत्तम चित्रे, मनोहर ओक, वसंत दत्तात्रय गुर्जर, तुलसी परब, सतीश काळसेकर आदींचे साहित्यही त्यांनी प्रकाशित केले होते. ते सर्व बघता- चाळता आले. त्यांच्या खजिन्यातली ‘कोसला’च्या पहिल्या आवृत्तीची पहिली प्रतही चाळली. सप्टेंबर 1963 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कोसलाची किंमत होती दहा रुपये. 

नेमाडे सरांच्या घरी साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घेत असताना ‘ललित’च्या जून 2015 च्या अंकात वाचलेला लेख आठवला- साठोत्तर कालखंडात लघुअनियतकालिकांची चळवळ फोफावली होती. नेमाडे सरही त्यात सक्रीय होते. एकदा ते प्रकाशक रा. ज. देशमुख यांना भेटले होते. त्यांना म्हणाले, खांडेकरांसारखी कादंबरी आठेक दिवसांत सहज लिहिता येईल.

असं मोठ्या लेखकांची टिंगलटवाळी करणं सोपं आहे. एकतरी असं पुस्तक तुम्ही लिहून दाखवा, असे आव्हान देशमुखांनी दिले. नेमाडे सरांनी ते सहजपणे स्वीकारले आणि अभूतपूर्व युगप्रवर्तक ‘कोसला’ जन्मली.

कोसला’नंतर ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरीला’ आणि ‘झूल’ या कादंबऱ्या आल्या. ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’ ही अलीकडची बहुप्रतीक्षित कादंबरी. पाच- सहा वर्षांपूर्वी मी कोसला पुन्हा वाचली. कोसलाच्या नायकाचे- पांडुरंग सांगवीकरचे विश्व अधिक भावते. पांडुरंग खानदेशातून पुण्यात शिकायला जातो. मी पुण्यात ‘रानडे इन्स्टिट्यूट’ येथे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर सांगवीकर अधिक आपला वाटू लागला होता.

बिढार, हूल, जरीला आणि झूलचा नायक चांगदेव पाटीलही आपल्या गावशिवारातला असल्यासारखा भावतो. या चारही कादंबऱ्या ‘चांगदेव चतुष्ट्य’ म्हणून ओळखल्या जातात. नेमाडे सर स्वाक्षऱ्या करत असताना हे सगळे आठवू लागले.

चांगदेव चतुष्ट्यकातील झूलमध्ये नामदेव भोळे भेटतो. नामदेव भोळेचा स्वगतासारखा परिच्छेद झूलच्या पहिल्याच पृष्ठावर आहे, परवा आईच्या अस्थी नर्मदेत सोडताना आपण हिंदू धर्माच्या लाखो पिढ्यांच्या परंपरेतले एक सनातन धर्माभिमान आहोत, असं त्याला वाटलं. आपला सगळा बुद्धिवाद, नास्तिक तत्त्वज्ञान, पाश्चात शास्त्राचं अध्ययन अध्यापन- सगळं ढोंग तर नाही ना असं त्याला वाटून गेलं.

भोळेचं हे चिंतन आपल्याच जगण्यातली विसंगती दाखवते, असे भासत राहते. भोळेबद्दल नेमाडे सरांना विचारताच ते म्हणाले, भोळेलाच हिंदूचा नायक करायचे होते; पण त्याचे व्यक्तिमत्व हिंदूचा पट मांडताना सूट झाले नसते. शिवाय चांगदेव चतुष्ट्यकासारखं ‘खंडेराव चतुष्ट्य’ डोक्यात होतं.

मी हिंदू पहिल्यांदा वाचायला घेतली. तीस- चाळीस पृष्ठानंतर बाजूला ठेवली. कठीण वाटली. काही कालावधीनंतर पुन्हा घेतली आणि कष्टपूर्वक वाचली. त्यातला एक संवाद मनाला भिडतो, खंडेराव, तू शेती करायचं ठरवलं तर नवरा होऊ नकोस आणि लग्न करायचं ठरवलं तर शेतकरी होऊ नकोस.

खंडेराव विविध प्रश्नांच्या भोवऱ्यात फिरत असताना ‘आपली नेमकी ओळख काय?’ हा प्रश्न त्याला व्यापक संस्कृतीशोधाकडे नेतो. नेमाडे सरांचे समग्र वाङ्मय वाचल्यावर खंडेरावच्या संस्कृतीशोधाचा अंदाज येतो.

हिंदूच्या दुसऱ्या भागाचा मसुदा सहा- सात वर्षांपूर्वीच झाला होता; परंतु देशातील सामाजिक, राजकीय संदर्भ बदलल्याने त्यात पुन्हा बदल करणे आवश्यक झाले, हे नेमाडे सरांनीच एकदा सांगतिले होते.

कुठलाही वेगळा संदर्भ किंवा मुद्दा आठवला की तो ते मोजक्या शब्दांत चिठोऱ्यावर लिहून ठेवतात. उदा. त्यांनी एक चिठोरे दाखविले. त्यावर ‘पांडुरंग काळा? पांडुरपुरचा? दगडाहून वीट मऊ’ लिहिले होते.

असे का? मी उत्सुकता म्हणून विचारले.

पाडुंरंग विटेवरच का उभा राहिला असावा? त्यावरून पुढे काही तरी सूचेल. ते आतापासून डोक्यात राहील,

दगड आणि विटेची तुलना नेहमची होते; पण नेमाडे सर त्यांच्या शैलीत नक्कीच त्याबाबत कुठल्यातरी साहित्यकृतीत भाष्य करतील आणि ते आपल्याला वाचायला मिळेल.

नेमाडे सरांच्या देशीवादाबाबत काहीजणांचे आक्षेपही असतात. आपण मुदलात देशी असल्याशिवाय वैश्विक होऊ शकत नाही, ही भूमिका त्यांच्या देशीवादाच्या मांडणीतून प्रकट होते. देशी परंपरेचे भान राखणारे कुठल्याही लेखकाचे लेखन श्रेष्ठ ठरेल, असे त्यांना वाटते. वैश्विकतेच्या नावाखाली निव्वळ इंग्लड, अमेरिकेचे नियम पाळणे ही सर्व बौद्धिक क्षेत्रातही वसाहतवाद चालू ठेवण्याची लक्षणं आहेत, असे त्यांनी ऑक्टोबर 1998 मध्ये दिल्लीत केलेल्या एका भाषणात म्हटले होते.

आपली देशी मूल्ये ही जगातल्या आधुनिकतेत दिसणारी पोकळी भरून काढायला पूर्ण सक्षम आहेत, असेही त्यांनी याच भाषणात नमूद केले होते. हा सगळा तपशील ‘सोळा भाषणे’ या पुस्तकातील ‘देशीवाद आणि आधुनिकता’ या प्रकरणात आहे.

नेमाडे सरांसारख्या व्यक्तीची भेट झाल्यावर फोटो काढणे हे ‘शास्र’ असते. फोटोसह काही शब्द लिहून फेसबुवर टाकणे ‘महाशास्र’ असते. मग आपणही ही परंपरा पुढे नेली पाहिजे. त्यासाठी लिहावे की नाही, असे स्वत:लाच विचारून घेतले.

हो! उत्तर येताच हा प्रपंच थाटला.

नेमाडे सरांनी ‘टीकास्वयंवर’मध्ये ‘हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो कां?’ हे सांगितले आहे. त्यातला आणखी तपशील म्हणजे, अमूक एक माणूस लिहू शकतो तेव्हा त्याने म्हशीप्रमाणे नियमित दूध किंवा निदान शेण तरी दिलेच पाहिजे, असे आजचे भाबडे साहित्यशास्र सांगते.

हे शाहित्याचे शास्र आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कुठे कळते. कळले तरी आपण कुठे त्यात बसतो. बरं, आपण काही दररोज लिहित नाही आणि लेखक तर मुळीच नाही. लेखकराव तर दूरचा पल्ला आहे. शिवाय फेसबूक वगैरेवर दररोज पोस्टी डकवत नाही. म्हणून मी हा लेख लिहिला. उद्या वाचन प्रेरणा दिनाच्या पोस्टींचा पूर येईल. त्यात आपली पोस्ट वाहून जाईल. त्यामुळे आजच या दिनाच्या पूर्वसंध्येला पोस्ट डकवली. आणि हो! तुम्ही ती संपूर्ण वाचली. तुमचे आभार वगैरे.

उदाहरणार्थ तुर्तास एवढेच!

                                                                                                                              -जगदीश मोरे