Tuesday 9 September 2014

विधानसभा निवडणूक आचारसंहिता

निवडणूक सुधारणांमधील ‘आदर्श आचारसंहिता’ हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल ठरले आहे. ‘काय करावे’ आणि ‘काय करु नये’ यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे 1960 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारत निवडणूक आयोगाने सर्वप्रथम जारी केली होती. आचारसंहितेची ती सुरवात होती. त्यात प्रचारसभा, मिरवणुका, भाषणे, घोषवाक्य, प्रचारफलक आदींबाबत सूचना होत्या. 1962 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आयोगाने ही मार्गदर्शक तत्वे सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि राज्य सरकारना वितरीत केली. सत्ताधारी पक्षाकडून निवडणुकीत होणारा सत्तेचा गैरवापर टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने 1979 मध्ये विविध राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून पुन्हा काही उपाय योजले. आज अस्तित्वात असलेली आचारसंहिता 1991 मध्ये श्री. टी. एन. शेषन मुख्य निवडणूक आयुक्त असताना एकत्रित आणि सर्वसमावेशक स्वरुपात सर्वप्रथम आणली गेली. अर्थात, त्यात वेळोवेळी दुरुस्त्याही होत असतात.
श्री. शेषणन यांच्या कारकिर्दीत आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीस सुरवात झाली आणि तिचा अधिकच बोलबाला झाला. श्री. शेषन आणि आदर्श आचरसंहितेमुळे निवडणूक आयोगालाही ठळक ओळख प्राप्त झाली. कालांतराने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी असलेल्या ‘राज्य निवडणूक आयोगा’नेही अशा प्रकारची आचारसंहिता लागू केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होते, हा बदल साधारणत: दोन वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता मात्र भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर लगेचच अंमलात येते.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेतील ठळक बाबी  ‘काय करावे’ आणि ‘काय करु नये’ या स्वरुपात प्रसिद्ध केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे...
काय करावे
ü    निवडणुका घोषित होण्यापूर्वी  निवडणूक क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील.
ü    पूर, अवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांतील जनतेसाठी पीडानिवारण आणि पुनर्वसन कार्य सुरु करता व चालू ठेवता येऊ शकेल.
ü    मरणासन्न किंवा गंभीररीत्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देणे चालू ठेवता येऊ शकेल.
ü  मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणे निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना नि:पक्षपातीपणे उपलब्ध झाली पाहिजेत. त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना नि:पक्षपातीपणे करता आला पाहिजे.
ü  इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रम पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी.
ü    शांततापूर्ण आणि उपद्रवरहित गृहस्थजीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा.
ü  स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.
ü  प्रस्तावित सभेच्या जागी कोणतेही निर्बंधक किंवा प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सूट मिळण्याकरिता अर्ज केला पाहिजे आणि अशी सूट वेळीच मिळवावी.
ü    प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी.
ü  सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी.
ü मिरवणूक सुरु होण्याची वेळ आणि जागा, ती जेथून जाणार असेल तो मार्ग आणि ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येईल आणि पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी.
ü    मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करुन घेऊन, त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंध यांचेही अनुपालन करण्यात यावे.
ü  मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये.
ü  मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजितरीतीने पार पडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे.
ü  सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्र ठळकपणे लावावीत.
ü  मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नांव किंवा पक्षाचे नांव असू नये.
ü  प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहनांवरील निर्बंधाचे पूर्णत: पालन करण्यात यावे.
ü    निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच फक्त कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करता येईल, इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी (उदा.मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किंवा आमदार इत्यादी) तिला अटीतून सूट मिळणर नाही.
ü    निवडणुका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किंवा समस्या भारत निवडणूक आयोग किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात.
ü  निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निवडणुकीच्या विविध पैलूंशी संबंधित असलेल्या सर्व बाबींविषयीचे निदेश, आदेश व सूचनांचे पालन करण्यात यावे.
ü  आपण एखाद्या मतदारसंघातील मतदार किंवा उमेदवार किंवा त्या उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी नसाल तर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आपण त्या मतदारसंघातून निघून जावे. 
काय करु नये
û    सत्ताधारी पक्ष किंवा शासनाने केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्य कोषातील खर्चाने      कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे.
û  कोणतीही मंत्री तो किंवा ती उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार  म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार  नाही.
û  शासकीय कामाची निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करु नये.
û  मतदाराला, पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये.
û  मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करु नये.
û  वेगवेगळ्या जाती, समूह किंवा धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील मतभेद वाढतील,  परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण होईल, असे कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करु नये.
û  इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी  आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
û  इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर, आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त  माहितीच्या आधारावर टिकाटिप्पणी करु नये.
û  देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणतेही प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचाराची  भाषणे, भित्तीपत्रके आणि निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केला जाणार नाही.
û  मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे  तोतयेगिरी करणे, मतदान केंद्रापासून 10 मीटर्सच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त  करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासात सार्वजनिक सभा घेणे, आणि  मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यासारख्या भ्रष्ट  आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई आहे.
û  लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने  करणे किंवा धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब केला जाणार नाही.
û  स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत,  वाहने इत्यादींच्या मालकाच्या परवानगीशिवाय (जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला  दाखविण्यासाठी व त्यांच्याकडे जमा करण्याकरिता) ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाण्या  लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही.  यामध्ये खाजगी व सार्वजनिक मालमत्ता या दोहोंचाही समावेश आहे.
û  इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा  मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करु नये.
û  ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ  नये.
û  क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू  मिरवणुकीच्या काळात जवळ बाळगण्यात येऊ नयेत.
û  इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करु नयेत.
û  मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ  भित्तीपत्रके ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करु नये.
û  ध्वनिवर्धकाचा मग ते एका जागी लावलेले असोत किंवा चालत्या वाहनावर बसविलेले असोत,  त्यांचा सकाळी 6.00 पूर्वी किंवा रात्री 10.00 नंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी  पूर्वपरवानगीशिवाय वापर करण्यात येऊ नये.
û  संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणूका  यांच्या मध्येही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा/  मिरवणुका रात्री 10.00 नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये आणि त्याशिवाय  त्याचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदींचा मोसम, परीक्षेचे दिवस इत्यादींसारख्या परिस्थितीच्या अधीन असेल.
û  निवडणुकीच्या काळात दारुचे वाटप केले जाणार नाही.
û  ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला  सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अशी कोणतीही व्यक्ती, मतदानाच्या दिवशी, त्याच्या  सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदान केंद्र असलेल्या जागेच्या परिसरात (100 मीटर्सच्या आत)  प्रवेश करणार नाही; तसेच, अशी कोणतीही व्यक्ती, मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा  कर्मचारीवर्गासह मतदारसंघामध्ये फिरणार नाही. जर, सरकारी सुरक्षा पुरविलेली व्यक्ती,  मतदार असेल तर, केवळ मतदान करण्यासाठी सोबत असलेल्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह  त्याच्या/तिच्या ये-जा करण्यावर निर्बंध घालील.
û  ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला  सरकारी सुरक्षा पुरवली आहे किंवा त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत अशा  कोणत्याही व्यक्तीची निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी  प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये.