Friday 24 July 2020

अष्टपैलू व्यक्तिमत्व

नीला सत्यनारयण: अष्टपैलू व्यक्तिमत्व

व्रत प्रशासकीय सेवेचे आणि मन कवीचे… अशी नीला सत्यनारायण यांची ओळख! शासनामध्ये 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्यावर पाच वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची ‘राज्य निवडणूक आयुक्त’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकीय सेवेबरोबरच त्यांनी गीत, संगीत आणि साहित्यातही मुशाफिरी केली होती.

श्रीमती नीला सत्यनारायण यांच्यातल्या विविध पैलूंना लहानपणापासूनच आकार मिळत गेला होता. शालेय जीवनापासूनच त्यांची आणि कवितांची गट्टी जमली होती. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी संगीताचे धडे गिरविले होते. वडिलांच्या बदलीमुळे मुंबई, नाशिक, पुणे, दिल्ली मग पुन्हा मुंबई असा त्यांचा प्रवास झाला. दिल्ली विद्यापीठातून बीए; तर पुणे विद्यापीठातून एमएची पदवी प्राप्त केली. जुलै 1972 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली होती. ठाणे जिल्ह्यातून त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांचा मंत्रालयात कृषी व सहकार, सामाजिक कल्याण, सांस्कृतिक व युवा कार्य, वैद्यकीय शिक्षण व औषधे, नगर विकास, अन्न व नागरी पुरवठा, सांस्कृतिक व पर्यटन, वस्त्रोद्योग, महिला व बाल विकास, माहिती व जनसंपर्क, सामान्य प्रशासन, गृह, वने, महसूल अशा विविध विभागांची जबाबदारी सांभाळत अपर मुख्य सचिव पदापर्यंत प्रवास झाला. जून 2009 मध्ये या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावर राज्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.

राज्य निवडणूक आयोग ही सांविधानिक संस्था आहे. या संस्थेच्या प्रमुख पदाच्या जबाबदारीचे भान आणि महत्व राखले किंबहुना त्यात त्यांनी भरच घातली आहे. त्याच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. आयोगाचे अद्ययावत संकेतस्थळ, मतदारांसाठी हेल्पलाईन, तळमजल्यावर मतदान केंद्रे, ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंगांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था, वृद्ध आणि गरोदर महिलांना रांगेत थांबावे लागू नये म्हणून प्राधान्य, प्राण्यांच्या क्रुरपणे वापरावर निर्बंध अशा अनेक सुधारणा त्यांनी केल्या.

निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी संविधानातील तरतुदींचा केवळ शाब्दिक अर्थ न घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महिलांना सामाजिक व राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती योजना सुरू केली आहे. प्रथमच निवडून आलेल्या ग्रामपंचायत महिला सदस्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि इतर महिलांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वत: पुढे यायला हवे, हा त्यामागचा उद्देश आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या सबलीकरणासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण म्हणून श्रीमती सत्यनारायण यांनी या प्रकल्पाला ‘क्रांतिज्योती’ हे नाव दिले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना आता 50 टक्के आरक्षण मिळाले आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही सार्वजनिक जीवनात आत्मविश्वासाने वावरता यावे, या दृष्टीने प्रथमत: आयोगाने ग्रामपंचायतींच्या महिला सदस्यांसाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आणि दहा जिल्ह्यांत अंमलबजावणी सुरू केली. संपूर्ण कुटुंबाचा डोलारा व्यवस्थितपणे सांभाळू शकणारी महिला ग्रामपंचायतींचाही कारभार व्यवस्थितपणे पाहू शकते. त्यासाठी त्यांना केवळ प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हाच विचार श्रीमती सत्यनारायण यांनी प्रत्यक्षात आणला होता

श्रीमती सत्यनारायण यांचा प्रशासकीय सेवेतील कृतीचा आणि कर्तृत्वाचा आलेख कायम उंचावतच राहिला आहे. त्याच वेळी त्यांच्यातील संवेदनशील कवयित्री, संगीतकार आणि लेखिका काय सजग राहिली आणि घडतही गेली. शांत, सयंमी आणि नि:श्चल व्यक्तिमत्वाच्या श्रीमती सत्यनारायण यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून कुठलीही बारीकसारीक घटना किंवा प्रसंग निसटणे केवळ अशक्य असते. प्रत्यक्ष कृती, गतिशील स्वभाव आणि निरीक्षण क्षमतेमुळे त्यांचे आयुष्य अधिकच समृद्ध होते गेले. त्यांची ही समृद्धता कधी कविता, कथा तर कधी कादंबरीच्या रुपाने व्यक्त होत राहिली.

आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतील अनुभवजन्य ज्ञान आणि माहिती वाचकांबरोबर शेअर करताना श्रीमती सत्यनारायण यांच्या सर्जनशीलतेतून रात्र वणव्याची’ ही कादंबरी साकारली आहे. एक पूर्ण अपूर्ण’,आयुष्य जगताना, एक दिव (जी)वनातला, ओळखीची वाट, जाळरेषा, टाकीचे घाव, डेल्टा 15, तुझ्याविना, पुनर्भेट, मैत्र, सत्यकथा आदी विविध पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

‘एक पूर्ण अपूर्ण’ हे पुस्तक असंख्य माता-पितांना प्रेरणा देणारे आहे. विशेष गरजा असलेल्या आपल्या मुलाच्या निमित्ताने त्यांनी हे आत्मकथन सादर केले आहे. अशी मुले असणाऱ्या प्रत्येक आईच्या पाठीवर त्यांनी धीराचा हात तर ठेवलाच; पण अशा मुलांचे संगोपन कसे करावे याचा कानमंत्रही या पुस्तकाद्वारे दिला आहे. ‘सत्यकथा’ या पुस्तकाद्वारे त्यांनी मराठी मुला-मुलींना उद्योग व्यवसायाकडे कसे वळावे आणि देशाच्या विकासात आपला हातभार कसा लावावा हे सांगणारी सुंदर कथा गुंफली आहे. निसर्गाविषयीच्या त्यांच्या प्रेमाचे ‘एक दिवस (जी)वनातला’ या पुस्तकातून दर्शन घडते. निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण का करावे, हे फार रंजक पध्दतीने त्यांनी या पुस्तकात मांडले आहे. ‘ओळखीची वाट’ या काव्यसंग्रहात निसर्ग, प्रेम, समाज अशा विविध विषयांवरील कवितांचा समावेश आहे.

लेखनाखेरीज श्रीमती सत्यनारायण यांनी संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही योगदान दिले आहे. ‘तूच माझी आई’, ‘जोडीदार’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘सावित्री’ या मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. ‘सौभाग्य’ या मराठी चित्रपटाचे आणि ‘दक्षता’ या मराठी टीव्ही मालिकेचे शीर्षक गीतही त्यांचेच होते. जीवनभर का साथ, माता की जय हो, सखी मै श्यामबोलो कृष्ण या नावाने हिदी गाण्यांच्या सीडी प्रकाशित झाल्या आहेत. प्रीतीचे तराणे, झुलेत मनात गाणे, आपल्या बरसत धारा, आकाश पेलताना ‘धिम्‌ताना धिम्‌ताना हे मराठी गाण्यांचे अल्बमही त्यांच्या नावावर आहेत. त्यात रवींद्र साठे, साधना सरग, विभावरी जोशी, ऋषिकेश रानडे आदी आघाडीच्या गायकांनी गाणी गायली आहेत. केंद्र शासनाचा अहिंदी भाषिक लेखक पुरस्कार-1985 आणि महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार-2006 सह त्यांना विविध संस्थांकडून वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

-जगदीश मोरे

No comments:

Post a Comment