Monday 17 April 2017

शेतीला जोड कृषी पर्यटनाची...



            गावाचा निसर्गरम्य परिसर, स्वतःची शेतीवाडी आणि थोडीशी कल्पकता असेल, तर निश्चितपणे कृषी पर्यटन व्यवसायाची चांगली सुरवात करता येते. असाच प्रयत्न रायगड जिल्ह्यातील मांडवा (दस्तुरी) येथील विजय पाटील यांनी केला आहे. कृषी पर्यटनामुळे भाजीपाला, फळांना बाजारपेठ मिळाली, उत्पन्नाचा नवा स्रोतही मिळाला….
            
मुंबई- गोवा महामार्गाने वडखळ फाट्यावरून अलिबागला जावं लागतं. मुंबईपासून अलिबाग १०८ किलोमीटरवर आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मांडवा हे जवळचं बंदर. अलिबागपासून मांडवा वीस किलोमीटरवर आहे. कोणत्याही मार्गापेक्षा गेट वे ऑफ इंडियावरून बोटीने मांडव्याला आणि पुढं तेथून अलिबागला जाणं अत्यंत सुलभ आहे. बोटीच्या प्रकारानुसार ४० ते ५५ मिनिटांत हे अंतर पार करता येतं.
            अलिबाग, मांडवा परिसर निसर्गरम्य आहे. त्याबरोबरीने परिसरात चांगले समुद्र किनारे असल्याने वर्षभर पर्यटकांचा ओघ असतो. त्यामुळे अलिबाग आणि लगतच्या गावांमध्ये गेल्या काही वर्षांत पर्यटन संस्कृती चांगलीच रुजली आहे. या परिसरात निवास व्यवस्था सहज उपलब्ध होते. गाव परिसरात पर्यटन व्यवसाय वाढत असताना त्यामध्ये स्थानिकांना सामावून घेतल्याशिवाय पर्यटन संस्कृती रुजणं अशक्य आहे. याचा विचार करून परंपरा, अधुनिकता आणि रोजगाराची सांगड घालत महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने निवास व न्याहरी योजनेची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळाली. स्थानिक संस्कृतीचे जतन आणि संवर्धनला हातभार लागला. परिसरातील पूरक व्यवसायांना चालना मिळाली. महत्त्वाचं म्हणजे या उपक्रमामुळे पर्यटकांची वाजवी दरात सोय होते. याच योजनेतून मांडवा (दस्तुरी) येथील विजय पाटील, सौ. वैशाली पाटील यांनी घरच्या शेतीमध्ये मांडवा व्ह्यूव वीकेंड होमहे एक छोटसं पर्यटन केंद्र विकसित केलं आहे.
शेतीवर उभारले पर्यंटन केंद्र
            अलिबाग
तालुक्यातील मांडवा (दस्तुरी) गावात विजय पाटील यांची शेती आहे. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर विजय पाटील गावी शेतीवर राहायला आहे. या गाव परिसरात निसर्गरम्य किनारे, भाजीपाला लागवड, आंबा, नारळाच्या बागा असल्याने पर्यटकांचा वर्षभर ओढा कायम असतो. हे लक्षात घेऊन त्यांनी शेतीबरोबरीने कृषी पर्यटन केंद्राची सुरवात केली. त्याची माहिती देताना श्री. पाटील म्हणाले, माझी मांडवा अलिबाग रस्त्यावर १५ गुंठे आणि जवळच्या परिसरात साडेतील एकर शेती आहे. त्यामुळे मी शेतीला जोड व्यवसाय म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने निवास व न्याहरी योजनेतून पर्यटन केंद्र सुरू केले. रस्त्याजवळील जागेत स्वतःसाठी घर तसेच पर्यटकांना राहण्यासाठी सर्वसुविधांसह दोन खोल्या बांधल्या. घराच्या परिसरात परसबाग फुलविली. यामध्ये हंगामानुसार चेरी टोमॅटो, पालक, चवळीची भाजी, लाल माठ, ब्रोकोली, वांगी, कोथिंबीर लागवड करतो.
            घरासमोर शेणानं सारवलेलं अंगण आहे. अंगणाच्याकडेने डेरेदार आंब्याची कलमे बहरलेली आहे. त्यामुळे नैसर्गिक सावलीत पर्यटक अंगणात जेवायला बसतात. निसर्गाचा आनंद घेतात. आमच्याकडे शनिवार- रविवारी किमान १५ ते २० पर्यटक मुंबईहून येतात. प्रति माणशी दोन जेवण, नाश्ता, राहणे असे आम्ही हजार रुपये घेतो. सुटीचे दिवस वगळून इतर दिवशी दरात सवलत दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीचे दर आकारतो. घरगुती पद्धतीने शाकाहारी, मांसाहारी जेवण ही आमची खासियत. काही पर्यटक जेवणासाठी खास आमच्याकडे येतात. माझी बायको सौ. वैशाली ही स्वयंपाकघर सांभाळते. मी शेती सांभाळतो. पर्यटकांना परिसरातील शेतीची माहिती देतो. आम्ही दोघेच बहुतांश शेती आणि पर्यटन व्यवसाय सांभाळतो. गरजेनुसार स्वयंकापासाठी महिला मदतनीस घेतली जाते.असं त्यांनी सांगितलं.
भाजीपाला शेतीत सुधारणा
            शेती व्यवस्थापनाबाबत  श्री. पाटील म्हणाले, माझी गाव परिसरात वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती आहे. तेथे पावसाळ्यात भात शेती करतो. त्यानंतर रब्बी, उन्हाळी पिकांची लागवड केली जाते. यामध्ये तोंडली, दुधी भोपळा, कारले, पालेभाज्या, कोथिंबीर, टोमॅटो, वाल, ज्वारीची लागवड असते. शक्यतो शेतीसाठी आम्ही सेंद्रिय खतांचाच जास्तीत जास्त वापर करतो. माझ्या भावाकडे तीन म्हशी आहेत. त्यामुळे शेतीसाठी पुरेशी शेणखताची उपलब्धता होते. पर्यटकांच्या स्वयंपाकासाठी शेतीमधील धान्य, कडधान्य, भाजीपाल्याचा जास्तीत जास्त वापर करतो. जास्तीचा भाजीपाला व्यापाऱ्यांना विकतो. पर्यटक माझ्या शेतीलाही भेटी देतात. भाजीपाला, फळांची स्वतः तोडणी करतात. तोच भाजीपाला आम्ही स्वयंपाकासाठी वापरतो. मी शहरी पर्यटकांना शेतीमधील पीक पद्धती, सेंद्रिय शेती, पशुपालनाची माहिती देतो. त्यामुळे पर्यटकांना शेती व्यवस्थापनाची माहिती कळते. शेत शिवार फिरण्याचा त्यांना आनंद मिळतो. पर्यटक जाताना पालेभाजी, आंबे, जांभूळ, करवंदे खरेदी करतात. त्यामुळे भाजीपाला, फळांना चांगला दर मिळतो.
निसर्गरम्य परिसराची मिळाली साथ
            मांडवा (दस्तुरी) गाव परिसर हा निसर्गरम्य आहे. गावाजवळ मांडवा बीच आहे. सहा किलोमीटरवर किहीम बीच आहे. अर्ध्या भागात विस्तीर्ण वाळू आणि अर्ध्या भागातील खडकांवर आदळणाऱ्या लाटांच्या तुषारांत पर्यटकांना सेल्फीही काढता येतो. येथे पर्यटकांना शहाळे, ताडगोळे मिळतात. सतरा किलोमीटरवर अलिबाग बीच, कुलाबा किल्ला आहे. अलिबागच्या कोळी वाड्यात वाळत घातलेले मासे, जेट्टीवर मासेमारी बोटींची ये-जा, माशांची प्रत्यक्ष हाताळणी पर्यटक अनुभवतात. त्यामुळे असा या निसर्गरम्य परिसराचा उपयोग श्री. पाटील यांनी कृषी पर्यंटनासाठी चांगल्या प्रकारे करून घेतला आहे.
घरगुती जेवणाला पर्यटकांची पसंती
            विजय पाटील हे पर्यटकांची जेवणाची सोय घरीच करतात. वैशाली पाटील या स्वतः स्वयंपाक करतात. या भागात ताजी गावठी मासळी मिळते. पर्यटकांच्या जेवणात जिताडा मासा, तळलेले मासे, माशांचं कालवण, कोळंबीचं लोणचं, खारवलेले मासे, गावरान कोंबडी, सुकं चिकन, काजू गऱ्यांची भाजी, काजूकरी, कोंबडीवडे, तांदळाची भाकरी, तांदूळ आणि नाचणीचे पापड, जोडीला सोलकढी! सर्व काही घरच्या चवीचे असते. पर्यटकांची आवड आणि मागणीनुसार जेवणाची व्यवस्था केली जाते. त्यामुळे काही पर्यटक खास जेवणासाठी पाटील यांच्या घरी येतात. जाहिरात न करता केवळ पर्यटकांच्या ओळखीतून आणि मौखिक प्रचारातून पाटील यांनी कृषी पर्यटनात स्वतः ओळख तयार केली आहे.
संपर्क: श्री.विजय पाटील,
मोबाईल- ९२७०५५८५५५.
(
लेखक राज्य निवडणूक आयोग, मुंबई येथे जनसंपर्क अधिकारी आहेत.)

No comments:

Post a Comment