Saturday, 20 June 2015

साताऱ्यातले जलयुक्त शिवार




'शेतकरी' मासिकाच्या मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झालेला सातारा जिल्ह्यातील ओढाजोड कल्पाबाबतचा माझा लेख. 
       गुळुंब (ता. वाई) येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून ओढाजोड प्रकल्प राबविला जात आहे. जिल्हाधिकारी श्री. अश्विन मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली टँकरमुक्तीच्या दिशेने टाकलेल्या या कल्पक पावलांचा घेतलेला हा वेध...
       अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा असल्या तरी 'पाणी' ही मानवाची मूलभूत गरज आहे. पाण्याविषयी आतापर्यंत खूप चिंतन झाले आहे. चिंतनशील विचार कृतीत आणण्यासाठी राज्य शासनातर्फे 'जलयुक्त शिवार अभियान' राबविले जात आहे. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील प्रत्येकी पाच गावांत पहिल्या टप्प्यातील कामे सुरु झाली आहेत. काही तालुक्यांत पाचपेक्षा जास्तही कामे सुरु झाली आहेत. त्यातील गुळुंब (ता. वाई) येथील ओढाजोड हा अत्यंत महत्वाकांक्षी आणि कल्पक प्रकल्प ठरणार आहे.
           सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या गुळुंबवर नियतीने काहीसा अन्यायच केला आहे. गुळुंब येथून मांढरदेव आणि भालेघरचा डोंगर सहज दृष्टिक्षेपात पडतो. तो अगदी सातआठ किलोमीटर अंतरावर आहे. तेथून पुढे महाबळेश्वरचा परिसर सुरु होतो. तेथे राज्यातला सर्वाधिक पाऊस कोसळतो. मांढरदेव आणि भालेघर डोंगर परिसरातही चांगला पाऊस होतो. गुळुंबमध्ये मात्र केवळ सरासरी 400 मिलीमीटर पाऊस होतो. अगदीच थोड्या अंतरावर निसर्गातील ही विषमता जाणवते. या विषमतेचा मात्र इथल्या गावकऱ्यांच्या जगण्यावर थेट परिणाम होतो. त्यावर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञा पत्रातील ''खडक फोडून तळी टाकी पर्जन्यकाळापर्यंत पाणी पुरेल ऐशी मजबूत बांधावी'' या उक्तीप्रमाणे गुळुंब येथे पाझर तलाव बांधण्यात आला आहे. काही वर्षांपर्यंत 2 हजार 949 लोकसंख्येच्या गावाची तहान हाच पाझर तलाव भागवत होता. आता मात्र डिसेंबर-जानेवारीतच हा तलाव तळ गाठतो आणि टँकरला निमंत्रण देतो. 2010 पासून टँकरला पर्याय राहिलेला नाही. दरवर्षीच टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येते. जलयुक्त शिवार अभियानातून गुंळुंबच्या पाण्याचा ताळेबंदही (वॉटर ऑडिट) तयार करण्यात आला आहे. त्यात 340 कोटी 94 लाख लीटरची तूट आढळून आली आहे.
          जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी गुळुंबला भेट देऊन टंचाईवर कायमस्वरुपी कशी मात करता येईल याबाबत ग्रामस्थांशी विचारविनिमय केला. त्यात ग्रामस्थांनी चांदक आणि गुळुंब ओढाजोड प्रकल्प सुचविला. जिल्हाधिकारी श्री अश्विन मुद्गल यांनादेखील ही कल्पना आवडली. त्यांनी स्वत: यात लक्ष घातले. सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पाडले आणि ओढाजोड प्रकल्पाचा प्रारंभ झाला. चांदकच्या ओढ्यावर पूर्वी लहानसा बंधारा होताच. नैसर्गिक उतारानुसार  त्याच्या पाटातून काही प्रमाणात शेते भिजली जात होती. आता ते बंधाराही आणि पाटही नामशेष झाला आहे. त्या बंधाऱ्याच्या पाण्याच्या आठवणी मात्र आजही अनेक ग्रामस्थ सांगतात. पालकमंत्री  विजय शिवतारे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे.
           गुळुंबच्या पश्चिमेस चांदक गाव आहे. चांदकच्या वरच्या बाजूला मांढरदेव आणि भालेघरचा डोंगर आहे. तिथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्याच परिसरात चांदकचा ओढा उमग पावतो. त्याला गुळुंबच्या ओढ्यापेक्षा जास्त पाणी असते. गुळुंबचा ओढा गुळुंबच्या परिसरातच उगम पावतो. त्याला फारसे पाणी नसते. चांदकच्या ओढ्यातून मात्र पावसाळ्यात खूप पाणी वाहून जाते. त्याच्यातील वाहून जाणारे पाणी गुळुंबच्या पाझर तलावात टाकल्यावर गुळुंबच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. वाहून जाणारे पाणी अडविले पाहिजे, हा बहुमोल संदेश छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुले आणि अनेक साधूसंतांनी दिला आहे. त्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे,
            'नदी सागरी मिळावा, तिची अपार भक्ती व्यर्थचि जावी
            ऐसी ईश्वरी इच्छाचित नसावी, उपयोगी यावी सर्वांच्या''
ग्रामगीतेतल्या या ओळी आता गुळुंबमध्ये प्रत्यक्षात येत असल्याने ग्रामस्थ आणि शेतकरीही सुखावले आहेत. ओढाजोड प्रकल्पामुळे चांदक आणि गुळुंबला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. शिवाय या शिवारातील शेतकऱ्यांच्या 15 विहिरीनाही लाभ होणार आहे. बागायती क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरीही मोठ्या उमेदीने पुढे आले आहेत. अनेकजण लोकवर्गणी देत आहे. अनेक जणांनी श्रमदानाची तयारी दर्शवली आहे.
ओढाजोड प्रकल्पाला सुमारे 60 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ज्ञानदीप सहकारी पतसंस्था, किसनवीर सहकारी साखर कारखाना, वाई रोटरी क्लब; तसेच अन्य एका उद्योगानेही आर्थिक आणि यंत्र सामुग्रीच्या स्वरुपात मदत देऊ केली आहे. आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. बळ, युक्ती आणि द्रव्याचा इथे संगम झाला आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पुढील ओळींचे इथे स्मरण झाल्याशिवाय राहत नाहीत.
''बळ बुद्धी वेचुनिया शक्ती, उद्क चालवावे युक्ती
 नाही चळण तया अंगी, धावे लवणामागे वेगी''
        जलयुक्त शिवार अभियानातून हा प्रकल्प राबविला जात आहे. चांदक गावच्या बंधाऱ्यावर सिमेंट क्रॉक्रिटचा वळण बंधारा बांधला जाणार आहे. या बंधाऱ्यापासून गुळुंबच्या बंधाऱ्यापर्यंत साधारणत: 1.50    किलोमीटर लांबी बंदिस्त सिमेंट पाईप टाकले जाणार आहेत. 600 मिली मीटर व्यासाची पाईप असतील. काही ठिकाणी ही पाईपलाईन उभारुन ती पुढे नेली जाईल. काही शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईपलाईन जाणार आहे. त्यासाठी त्यांनी आनंदाने संमती दिली आहे. नैसर्गिक उतार शेवटपर्यंत राखला जाईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारे पंपिंग करता उच्च दाबाने हे पाणी गुरुत्व पद्धतीने गुळुंबपर्यंत नेले जाईल. वाहून जाणाऱ्या पाण्यातून साधारणत: दोन वेळा गुळुंबचा पाझर तलाव भरुन घेतल्यास ते पाणी उन्हाळ्यामध्ये वापरता येईल. परिणामी गुळुंबची टँकरपासून मुक्ती होऊ शकेल आणि परिसरातील विहिरींचा पाझरही वाढू शकेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

विकेंद्रीत पाणीसाठ्यांवर भर
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकेंद्रीत स्वरुपात पाणी साठे तयार केले जातील. पाण्याच्या उपलब्धतेबाबत जिल्हाभरात समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. अगदी माण-खटाव सारख्या दुष्काळी भागालाही न्याय देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर ओढा जोड सारखे प्रकल्प निश्चितच उपयुक्त ठरतील.
                                                                                          -श्री. विजय शिवतारे, पालकमंत्री, सातारा
गुळुंबची एकी कौतुकास्पद
ओढा जोडणीसाठी गुळुंबच्या ग्रामस्थांनी टाकलेले पाऊल म्हणजे त्यांच्या सकारात्मक भावनेचे प्रकटीकरण आहे. त्यांनी दाखवलेली एकी कौतुकास्पद आहे. गुळुंबला एकूण 340 कोटी 94 लाख लीटर पाण्याची तूट भासते. ती भरुन काढण्यासाठी ओढा जोढणीसारखा प्रकल्प निश्चितच वरदान ठरु शकतो. त्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीसह ग्रामस्थांच्या पाठीशी उभे आहे.
-श्री.अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी, सातारा


टँकरमुक्तीच्या दिशेने
वाई तालुक्यातील गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागातो, हेच मुळात आश्चर्यजणक आहे. ओढा जोड प्रकल्प म्हणजे टँकरमुक्तीच्या दिशेने केलेली वाटचाल आहे; परंतु पाणी येऊन प्रश्न सुटणार नाही. पाण्याचा शिस्तीने आणि काटकसरीने वापर करावा लागेल. त्यासाठी जिल्हा परिषद गावकऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करेल.
-जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा

ग्रामस्थांच्या एकीचे फळ
ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकीमुळेच गुळुंबच्या पाण्याचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लागला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही या प्रकल्पाचा लाभ होऊ शकतो. आमच्या गावकऱ्यांचा उत्साह वाढविणारा हा प्रकल्प आहे. सगळ्यांमध्येच सहकार्याची भावना निर्माण झाली आहे. प्रकल्पासाठी मदत करणाऱ्या सर्वांना मी मन:पूर्वक धन्यवाद देते.
-सौ. अल्पना यादव, सरपंच, गुळुंब
गुळुंबच्या पाण्याचा ताळेबंद
  • गावाची एकूण लोकसंख्या- 2 हजार 949
  • सरासरी पर्जन्यमान- 400 मिलीमीटर
  • पिण्यासाठी प्रतिवर्षी लागणारे पाणी- 5 कोटी 38 लाख लीटर
  • जनावरांसाठी लागणारे पाणी- 78 लाख लीटर
  • पिकांसाठी लागणारे पाणी- 418 कोटी 50 लाख लीटर
  • गावाची एकूण पाण्याची गरज- 424 कोटी 66 लाख लीटर
  • पावसाद्वारे उपलब्ध होणारे एकूण पाणी- 435 कोटी 60 लाख लीटर
  • त्यापैकी जमिनीत मुरलेले प्रकल्पांतील उपलब्ध पाणी- 83 कोटी 72 लाख लीटर
  • वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे भासणारी तूट- 350 कोटी 88 लाख लीटर

Tuesday, 17 March 2015

गौरव विश्वविजेत्यांचा

भारतीय क्रिकेट संघानं  2011 चा विश्वचषक जिंकल्यावर दुसऱ्या दिवशी राजभवनातखेळाडूंचा तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. या समारंभाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली होती. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेनिमित्त तेव्हा लिहिलेल्या लेखाचे स्मरण झाले. तोच हा लेख...
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत श्रीलंकेला धूळ चारत भारतीय संघानं विश्वविजेतेपदाला गवसणी घातली... मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरून उठलेली विजयाची लहर क्षणार्धात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली. गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधीच सर्वत्र विजयाच्या गुढ्या उभारल्या गेल्या!
विश्वविजयाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी मुंबईतील राजभवनात `टीम इंडिया`चा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषिमंत्री आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास हॉटेल ताजमहलपासून विजयी वीरांना राजभवनकडे घेऊन निघालेल्या दोन अलिशान बस ताजचा परिसर, काळाघोडा, मरिन ड्राईव्हमार्गे मलबार हिलवरून राजभवनात दाखल झाल्या. रस्त्याच्या दुतर्फा अबालवृद्धांची गर्दी होती. ही मिरवणूक नव्हती. तरीही क्रिकेट प्रेमींनी खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बस आणि त्यातील क्रिकेटवीरांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.
बस राजभवनावर दाखल झाल्या आणि पोलिसांच्या बँड पथकानं शूरवीरांना सलामी दिली. `जय हो...`ची धून उपस्थितांच्या रोमारोमात संचारली होती. एकामागून एक क्रिकेटपटू राजभवनच्या हिरवळीवर दाखल झाले. उपस्थितांच्या नजरा विजयाचे हिरो युवराज, झहीर, धोणी, सचिनला शोधत होत्या; पण धोणी काही दिसेना! अचानक धोणी समोर आला; क्षणभर त्याला अनेकांनी ओळखलं नाही. धोणीनं लांबसडक केसं कापून आपलं डोकं खेळपट्टीसारखं चकाचक केलं होतं! सर्व खेळाडू आले. राष्ट्रपतींसह मान्यवरांसोबत ग्रुप फोटो सेशन सुरू झालं. धडाधड फ्लॅश पडले. खेळाडूंच्या टी-शर्टवरील हिरव्या-पांढऱ्या रंगाचे पट्टे... खाली हिरवंगार टवटवीत गवत... समोर निळाशार अथांग समुद्र... मावळतीला आलेल्या सूर्याची पिवळी किरणं... लखलखते शुभ्र फ्लॅश म्हणजे एकाच वेळी असंख्य रंगांची उधळण होती. आपल्या विविधतेतल्या एकात्मतेचं ते प्रतीक होतं. याच एकतेच्या वज्रमुठीनं भारतीय क्रिकेटला उत्कर्षाचा मार्ग दाखविला होता.
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं भल्याभल्यांना चीत केलं होतं. वज्रमुठीच्या तडाख्यानं उपांत्यपूर्व लढतीत
ऑस्ट्रेलियाला केवळ हरवलंच नाही तर त्यांच्या सम्राटपदाला आवाहनही दिलं. रिकी पाँटिंगलाही, `बस, आता फक्त भारतच`, असं म्हणायला भाग पाडलं. मुक्ताफळं उधळणाऱ्या आणि `माइंड गेम` खेळणाऱ्या शाहीद आफ्रिदीच्या संघाचा आपल्या वज्रमुठीनंच उपांत्य लढतीत `गेम` केला होता. अतिंम लढतीतल्या वणव्यात लंकेचं दहन झालं.
ग्रूप फोटो सेशन आटोपलं. औपचारिक समारंभ सुरू झाला. अंतिम सामन्यात नायकपदाला साजेशी खेळी करणाऱ्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोणीच्या नावाचा पुकार होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रपतींनी पुष्पगुच्छ देऊन त्याचा गौरव केला. संपूर्ण स्पर्धेत रुसलेली धोणीची बॅट अंतिम सामान्यात चांगलीच बरसली आणि तो `हिरो` ठरला. दुसरं नाव होतं सचिन रमेश तेंडुलकर! अनेकांच्या ओठांचा चेंडू झाला आणि `व्हाव! सच्चिनSSS`, असे उद्‌गार बाहेर पडले. राष्ट्रपतींनी सचिनला पुष्पगुच्छ देताच टाळ्यांचा गजर झाला. 21 वर्षाच्या अविरत क्रिकेट कारकीर्दीची, 30 हजारांहून अधिक धावांची, 99 शतकांची, असंख्य विक्रमांची आणि त्या विश्वचषकात तिलकरत्ने दिलशाननंतरच्या (500) सर्वाधिक 482 धावांच्या खेळीच्या स्मृती जागविणारा तो क्षण होता. सचिनपाठोपाठ विरेंद्र सेहवागचा गौरव झाला आणि उपांत्य सामन्यात उमर गूलला गूल करणारी फलंदाजी आणि सलामीच्या लढतीत बांगलादेशविरुद्ध 175 धावांची खेळी सहज नजरेसमोर येऊन गेली.
नावाप्रमाणे गंभीर खेळी करणाऱ्या गंभीरच्या चेहऱ्यावर गौरव स्वीकारताना भलताच उत्साह होता. आता सन्मान होता तो भारताच्या विश्वविजयाच्या खऱ्या शिल्पकाराचा- युवराज सिंगचा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला. विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकविणाऱ्या युवराजच्या हातात बॅट असो वा बॉल कमाल झालीच समजा, असा हा हुकमी एक्का. त्यानंतर विराट खेळी करणारा विराट कोहली, स्फोटक फलंदाज युसूफ पठाणचा सत्कार झाला. आणखी एक महत्त्वपूर्ण योगदान देणारं नाव पुकारलं गेलं ते झहीर खानचं. पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार गजर झाला. अस्सल मराठी मातीतला श्रीरामपूरचा हा रांगडा गडी. पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या बरोबरीनं झहीरनं या स्पर्धेत सर्वाधिक 21 बळी घेतले.
गुजरातमधून इखार नावाच्या कोणत्या तरी खेड्यातून आलेला आणि पाकिस्तानविरुद्ध टिच्चून मारा करणारा मुनाफ पटेल सत्काराच्या वेळीही भारीच खूश दिसत होता. आक्रमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या `दुसराफेम` हरभजन सिंगच्या चेहऱ्यावर संयम होता. मधल्या फळीत शेवटच्या क्रमांकावर येऊनही आश्वासक फलंदाजीनं मॅचेस आणि मनं जिंकणाऱ्या सुरेश रैनाच्या गौरवाचा क्षण म्हणजे `रैना है ना` असाच होता. केरळचा स्टायलीश आणि प्रचंड आक्रम गोलंदाज श्रीशांत मात्र यावेळी कमालीचा शांत होता. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मल्याळी भाषेत श्रीशांतशी संवाद साधला. पीयुष चावला, अशिष नेहरा, आर. आश्विन सगळ्यांचा गौरव झाला. आणखी एका खास व्यक्तीचा गौरव झाला ते म्हणजे भारतीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन.
संघाचं अभिनंदन करताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ``विश्वविजेतेपद पटकवून आपल्या क्रिकेट संघानं तमाम भारतीयांना उत्साहाचा आणि आनंदाचा क्षण प्राप्त करून दिला आहे. या यशात महाराष्ट्राचे दोन सुपूत्र सिचन तेंडुलकर आणि झहीर खान यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाच्यावतीनं प्रत्येकी एक कोटी रुपये देऊन सन्मान करण्यात येईल, तसंच संघाच्या सर्पोट स्टाफमधील महाराष्ट्रातील सहकाऱ्यांना बीसीसीआय प्रमाणं बक्षिसं दिली जातील.``
गौरव समारंभानंतर उपस्थितांमधलं आणि खेळाडूंमधलं अंतर गळून पडलं. लहान-मोठ्या सर्वांनाच खेळाडूंसोबत छायाचित्र काढण्याचा मोह आवरला गेला नाही. प्रत्येकला सचिनसोबत, धोणीसोबत छायाचित्र हवंच होतं. युवराज, झहीर, गंभीर, सेहवाग, युसूफ, कोहली, रैना, मुनाफ, हरभजन सोबतच्या छायाचित्राचीही संधी कुणालाच सोडायची नव्हती. उर्वरित खेळाडूंसोबतही वेळ, जागा आणि छायाचित्रकार उपलब्ध होईल, तसे क्षण टिपले जात होते. काही जण एकमेकांच्या मोबाईलमधील कॅमेऱ्याद्वारे हे ऐतिहासिक क्षण टिपत होते. अनेक जण विश्वचषक हातात घेऊन तो मनसोक्तपणे न्याहळत होते.
समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन म्हणाला की, ``ज्या मातीत वाढलो. लहानाचा मोठा झालो, त्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या मातीतच विश्वचषक जिंकण्यासारखा दुसरा आनंद नाही. मुंबईकरांसमोर माझ्या सहकाऱ्यांनी मला उचलून घेतलं, तेव्हा डोळ्यातून चटकन पाणी आलं``
सचिनची प्रतिक्रिया ऐकून उपस्थितही भावूक झाले. समारंभ संपत आला; पण उपस्थितांची उत्सुकता शमत नव्हती. खेळाडूंची अखेरपर्यंत कॅमेरा आणि उपस्थितांच्या विळख्यातून सुटका होणं शक्य नव्हतं. विश्वचषक स्पर्धेप्रमाणेच या समारंभाच्या स्मृतीही मनात साठवत उपस्थितांनी राजभवनाचा निरोप घेतला.