रानातल कवी
अमळनेरहून निघताना दुपार पार टळून गेली
होती. थोडे अंतर पार केल्यावर तिन्हीसांजेचा पिवळसर प्रकाश सर्वत्र पसरला होता. जूनची
दहा तारीख पाठमोरी झाली होती. तप्त उन्हाच्या झळा सोसून व्याकुळ
झालेल्या वावरांचे आभाळाकडे डोळे लागले होते. कधी दोन- चार
थेंब कोसळतील आणि सुगंधी श्वास सोडता येईल, या प्रतीक्षेत शेतीमाती होती. अधूनमधून आकाशात शुभ्रआभ्रखंड दर्शन
देत होते. पावसाचा पत्ता नव्हता. आम्ही साधरणत: रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास पत्ता
शोधशोधत कांद्याचे कोठार असलेल्या लासलगावच्या विश्रामगृहात पोहचलो.
एक तरुण समोर आला, “तुम्ही कवीदादाचे पाहुणे का?”
‘कवीदादा’ शब्द भारी वाटला. पत्रकार
आणि कवी विजय चोरमारे आणि मी सोबत होतो. कवी आडनावसुद्धा असल्याने कवीदादा असू शकतो;
पण आम्ही कवी आडनाव असलेल्या व्यक्तीच्या भेटीसाठी आलो नव्हतो. आडनाव कवी नसलेल्या;
पण कविता आणि गाणी लिहिणाऱ्याच्या भेटीसाठी आलो होतो. आम्ही म्हणालो, “कवीदादा नव्हे; आम्ही ‘कवी प्रकाश होळकरां’च्या
भेटीसाठी आलो आहोत.”
“अहो, तेच ते कवीदादा!”
प्रकाश होळकरांचे हे एक नवीन टोपण नाव
कळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्रामगृहातून होळकरांच्या घरी निघालो. गावात शिरलो. गाव
तसे मोठे आहे. रस्त्याच्या कडेला दोन- तीन डालक्यांत आंबे विकणारा मध्यम वयीन गृहस्थ
बसला होता. त्याला विचारले, “प्रकाश होळकराचं घर कुठल्या गल्लीत आहे?”
डोकं खाजवत तो म्हणाला, “लासलगावात बरेच होळकर आहेत. प्रकाश
होळकर नेमकं काय करतात.”
“शेतकरी आहेत.”
“अहो, इथले बहुतांश होळकर शेतीच करतात.”
“तेही शेतीच करतात; परंतु कविता आणि सिनेमाची गाणीदेखील लिहितात.”
“असं सांगा ना! तर तुम्हाला कवीदादांच्या घरी जायचं आहे!”
“हो, प्रकाश होळकर- कवीदादांकडेच जायचंय आम्हाला.”
“समोरच्या रस्त्यानं सरळ जा. थोडं पुढं गेल्यावर डाव्या हाताला वळा. तेथेच कवीदादा
राहतात.”
एखाद्या कवीची आख्या गावाला त्याच्या
नावाऐवजी ‘कवीदादा’ म्हणून ओळख असणे, ही गोष्ट निश्चितच कुठल्याही पुरस्कारापेक्षा
मोठी आहे. कारण भालचंद्र नेमाडे यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ही ओळख ‘लेखकरावा’प्रमाणे
‘कवीराव’ अशी नाही. ती आपुलकीने, प्रमाणे ‘कवीदादा’ अशी आहे.
जनमाणसांच्या
भावना शब्दरूपात अविष्कृत करणाऱ्या या कवीचे घर रानात आहे. कविवर्य ना. धो. महानोरांच्या
‘रानातल्या कवितां’चा वारसा सांगणार या ‘रानातल्या कवी’ची भेट झाली आणि कवीदादाने
‘कोरडे नक्षत्र’ मोठ्या आपुलकीच्या ओलाव्याने भेट देऊन आमचे स्वागत केले आणि गप्पांची
मैफिल काव्यफुलांनी बहरून गेली. कवीदादांच्या शब्दाशब्दांतून काव्यगंधाची अनुभूती मिळत
होती. या भेटीला फार वर्षे झाली नाहीत; परंतु कवीदादांसोबतचा स्नेह फार जुना असल्यासारखा
वाटतो. कवीदादांना आणि त्यांच्या कवितांना- गाण्यांना खऱ्या अर्थाने समजून घेता आले
ते अलीकडेच ‘मंत्रालय अधिकारी- कर्मचारी कल्याण मंच’ आयोजित ‘कवितेचं गाणं’ या कार्यक्रमात!
श्री. होळकर यांची जडणघड लासलगावत झाली. तिथल्या शेती आणि मातीशी त्यांचे अतूट
नाते आहे. ते स्वतः शेती करत असल्याने त्यांच्या कवितेत येणारा निसर्ग हा केवळ
वर्णनात्मक नसून तो त्यांच्या जगण्याचा भाग आहे. त्यांच्या ‘कोरडे नक्षत्र’ या काव्यसंग्रहातून ग्रामीण भागातले दुःख आणि दुष्काळ ठळकपणे जाणवतो; पण तरीही त्यांचे शब्द जगण्याची उमेद जागवतात. ‘पुन्हा एकदा रानवेळ’मध्ये निसर्गाच्या विविध छटांचे दर्शन घडते. ‘टिंग्या’, ‘गोष्ट छोटी डोंगरावराएवढी’, ‘बाबू बॅण्डबाजा’, ‘टपाल’, ‘चिनू’, ‘प्रियतमा’,
‘चूकभूल द्यावी घ्यावी’, ‘धुळमाती’, ‘पिंकी: एक सत्य कथा’, ‘जागर’, ‘कामधेनू’, ‘घाटी’
आदी मराठी सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखनही केले आहे.
होळकरांच्या कविता- गाण्यांत शेतकरी जीवनातील दाहकता आणि निसर्गाचे सौंदर्य यांचा सुरेख संगम आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कविवर्य ना. धो. महानोरांप्रमाणेच होळकर यांच्या कविता शेती, माती, पाऊसपाणी,
वृक्ष, पशुपक्षी आणि गावशिवाराभोवती रुंजी घालतात. मातीशी
इमान राखणारा आणि निसर्गाशी संवाद साधणारा हा एक निसर्गवेडा कवी आहे.
श्री. होळकर यांच्या कुटुंबाचे कोरडवाहू
शेती हेच जगण्याचे साधन होते. कुठल्याही कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी येणारा संघर्ष
त्यांनाही चुकला नाही. ते दररोज भल्या पाहटे उठून दुधाचा रतीब घालायचे. कुटुंबाची जगण्याची
कसरत सुरू असताना प्रकाश दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. आता शिक्षणाची वाट बंद
झाली, असे वाटत असतानाच गावातील विजय काचरे यांनी श्री. होळकर यांना पुन्हा दहावीचे
पेपर देण्यासाठी प्रेरित केले आणि ते उत्तीर्ण झाले.
श्री. होळकर यांनी लासलगाव महाविद्यालयात
अकरावीला प्रवेश घेतला. काही माहिन्यानंतर सूचना फलकावर नोटीस लागली होती. महाविद्यालयाच्या
‘नक्षत्र’ नावाच्या नियतकालिकासाठी कथा, कविता, लोककथा, लेख देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना
करण्यात आले होते. मराठी विभागप्रमुख विजय काचरे नियतकालिकाचे संपादक होते. त्यांचेकडे
होळकर दररोज दूध घालायचे. सर आपल्याला ओळखतात. आपण काही तरी लिहिले आणि त्यात प्रसिद्ध
झाले तर कॉलेजातली मुलेमुली आणि गावतले लोक आपल्याला ओळखतील, ही भावना होळकरांच्या
मनात दाटून आली.
होळकरांचा किंवा घरातल्या कोणाचाही
वाचन, लेखन आणि साहित्याशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. गावातही साहित्यकविषयक वातावरण
होते, असेही नाही. एके दिवशी होळकर शेतात गेले होते. दुपारचे रखरखित ऊन होते. भेगाळलेली
जमीन होती. नदी- नाले आठलेले होते. पाण्याचा ठाव नव्हता. दुष्काळी वातावरण होते. त्यात
रुईचे झाड होळकरांच्या नजरेस पडले. उन्हाळ्यातही ते हिरवेगार होते. त्याच्या आजुबाजूला
पालापाचोळा पडला होता. त्याकडे पाहून होळकरांना वाटले, थोडीशी ओल असली तरी माणसाने
टिकून राहवे. आशा सोडू नये. नैराश्य कुरवाळत बसू नये, हेच तर काचरे सरांनी आपल्याला
सांगितल्याने पुन्हा आपले शिक्षण सुरू होऊ शकले. त्यावरून त्यांना उत्सस्फूर्त ओळी
सूचल्या,
वाळल्या झाडाचा पाचोळा भूईला
फाटलेल्या भूईचा आधार रुईला
होळकर घरी गेले कागदावर त्या ओळी लिहिल्या.
सायकल घेऊन काचरे सरांकडे धावपळ करत गेले. त्यांना त्या ओळी ऐकवत होळकर म्हणाले, “सर, या ओळी सूचल्या आहेत.”
“अरे, एवढ्या भर दुपारी कशाला? संध्याकाळी आला असता तरी चालले असते. नाही तरी सकाळी
दूध घालण्यासाठी येताना या ओळी आणल्या असत्या तरी चालले असते.”
काचरे यांनी त्या दोन ओळी बघितल्या
आणि संशयाने होळकरांकडे बघितले, “हे तूच लिहिलं आहे का?
“हो सर, मीच लिहिलं आहे.”
“दोन ओळींची कविता कशी छापायची? आणखी काही किमान आठ-दहा ओळी लिहून आण.”
“सर, मला सूचलं तर आणखी लिहून आणेल; पण या ओळी तुम्हाला कशा वाटतात?”
“या ओळी फार छान आहेत; पण तू लिहिल्या असतील, असं वाटत नाही. एखाद्या वृत्तपत्राच्या
रविवारच्या पुरवणीतून तू त्या घेतल्या असाव्यात, असं मला वाटतं.”
“नाही सर, मीच लिहिल्या आहेत. हवं तर तुम्ही माझ्यासोबत या. मी तुम्हाला शेतातली
भेगाळलेली जमीन, पालापाचोळा, रुईचं झाड दाखवतो!”
“ठीक आहे. आणखी काही ओळी लिहून आण.”
होळकरांच्या शब्दांना भावनांचे धुमारे फुटले होते; परंतु काचरे
सरांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. असाच प्रसंग दादा कोंडके यांचाही आहे. ते परळच्या
आर. एम. भट हायस्कूलमध्ये सातवी इयत्तेच होते. त्यांच्या बापट मास्तरांनी मुलांना शाळेच्या
गॅदरिंगनिमत्त प्रसिद्ध होणाऱ्या अंकासाठी काही तरी मजकूर लिहून आणयला सांगितला होता.
फूल तोडलं तर झाड भकास होईल, त्याला काय वाटेल, कल्पनेतून दादांनी कविता लिहून आणली,
वदला वृक्ष मला पाहूनी
आहो तोडू नका उगाच
फुल ते ऐश्वर्य माझे असे
मातीमोल ठरेन मी
मस्तीखोर म्हणून शाळेत दादांची ख्याती
होती. त्यामुळे बापट मास्तर, मुख्याध्यापक आणि घरातलेही कोणी दादांनी कविता लिहिली,
यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते; पण पुढे अवघ्या सकल मराठी मनाला दादांच्या गाण्याने
वेळ लावले आणि दादा कोंडके हे नाव चित्रपट कथा लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि अभिनेते
म्हणून अजरामर झाले.
प्रकाश होळकरांकडेही काचरे सरांनी संशयाने
बघितले आणि काही ओळी लिहियला सांगितले. लहान मुली खेळताना कानात कर्णफूल म्हणून रूईचे
फूल घालत असत. ते बघिलतले आणि त्यांना पुढच्या ओळी सूचल्या,
रुईच्या पाकळ्या पोरींच्या कानांत
लाजून हसल्या तळ्याच्या पाण्यात
लासलगावत पाणी नाही, तळे कोठून येणार;
पण त्या मुली फुटलेल्या आरशाच्या तुकड्यांत पाहून कानातले रुईची फुले न्याहळत असत.
आरशाच्या तुकड्यांना त्यांनी तळ्याची उपमा दिली. या ओळी घेऊन पुन्हा होळकर काचरे सरांकडे
गेले, “सर, आणखी दोन ओळी सूचल्या. बघा कशा आहेत?”
“अशा दोन- दोन ओळी घेऊन येऊ नकोस. पूर्ण कविता घेऊन ये.”
होळकर घरी आले; पण त्यांच्यातली ऊर्मी
आणि सृजनशीलता त्यांना काही स्वस्थ बसू देई ना. त्यांना साळुंख्याचा थवा दिसला. महिला
पाणवठ्यावर एकत्र येतात. गप्पा मारतात. तशा साळुंख्याही एकत्र येऊन गप्पागोष्टी करीत
असाव्यात, असे त्यांना वाटले आणि त्यांना अजून काही ओळी सूचल्या,
पिवळ्या पायाच्या साळुंख्या आल्या
आल्या त्या आभाळी न्हाहल्या
अखेर अकरावीतल्या प्रकाशची कविता पूर्ण
झाली. ती त्याने ‘नक्षत्र’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी काचरे सरांकडे दिली. सरांनी ती
प्रसिद्ध करण्याचे आश्वास दिले. गडी खूश झाला. नवीन शैक्षणिक वर्षे कधी सुरू होईल आणि
अंक कधी हातात पडेल, या प्रतीक्षेत होते. वर्षे संपले. अंक आला. महाविद्यालयात अंक
वाटप सुरू झाले. रांगेत उभे होळकरांनी अंक
घेतला. झपाझप अंक चाळत गेले. कविता काही सापडेना. बहुधा एकमेकांना चिकटलेल्या पानांत
ती असेल म्हणून त्यांनी बारकाईने एकएक पृष्ठ उलगडून बघितलं; पण कविता काही नजरेस पडली
नाही. होळकरांचा स्वप्नभंग झाला. त्यांच्या मनात काचरे सरांबद्धल कटूता निर्माण झाली.
काचरे सरांनी एक दिवस होळकरांना बोलवले.
त्यांच्या हातात साखर आणि एक अंक दिला. ते म्हणाले, “प्रकाश, तुझ्या कवितेचा दर्जा कॉलेजच्या नियतकालिकातल्या
कवितांपेक्षा खूप वरचा आहे. म्हणून मी ती ‘अनुष्टूभ’कडे पाठविली होती. ती त्यात प्रसिद्ध
झाली आहे.”
होळकरांना आनंद झाला. आपल्याला आता
सगळे गाव ओळखेल, या आनंदात ते घरी गेले; पण ‘अनुष्टूभ’ कोणाला माहीतच नव्हते. काचरे
सरांनी आपली बोळवण केली, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. काचरे सरांकडे एकमेव
अंक यायचा. त्यामुळे होळकरांची कविता त्यांना स्वत:ला आणि काचरे सरांनाच माहीत होती;
पुन्हा ते निराश झाले. अकरावी- बारावीतल्या मुलाचे यापेक्षा आणखी काय मोठे स्वप्न असेल.
काचरे सरांनी होळकरांची समजूत काढली,
“प्रकाश, तुझी कविता ‘अनुष्टूभ’मध्ये
प्रसिद्ध होणे, ही तुझी या वयातली मोठी कमाई आहे. या अकांच्या संपादक मंडळात कविवर्य
पुरुषोत्तम पाटील, ना. धो. महानोर, भाषाशास्रज्ञ अशोक केळकर, समीक्षक रमेश वरखेडे असा
दिग्गजांचा समावेश आहे.”
सगळे खरे आहे, आपण आपल्याला कोणीही
कवी म्हणून ओळखणार नाही, ही खंत त्या किशोर वयीन मुलाच्या मनात कायम होती; पण एके दिवशी
अनुष्टूभच्या व्यवस्थापकांनी कळविले, “प्रकाश, तुझ्या कवितेचे ना. धो. महानोरांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये (तत्कालीन औरंगाबाद)
एका भाषणात कौतुक केले आहे.”
होळकरांना आनंद झाला. पाठोपाठ पत्र
यायला लागली. ती पत्र केवळ सर्वसामान्य वाचकांची नव्हती. ती आनंद यादव, शांताबाई शेळके
यांसारख्या दिग्गजांची प्रेरणादायी पत्रे होती; परंतु होळकरांना वाटले की कुणी तरी
खोडसाळपणा केला असावा आणि मोठ्या साहित्यिकांच्या नावाने पत्रे पाठविली असतील. म्हणून
ते काचरे सरांकडे गेले. त्यांना पत्र दाखविली. ते म्हणाले, “हे पत्र आनंद यादव सरांचंच आहे. मला
त्यांचे अक्षर माहीत आहे.”
किशोरवयीन प्रकाशचा उत्साह आता मात्र
दुणावला होता. तो आनंदला होता. कवी म्हणून आपल्याला कोणी तरी ओळखू लागले आहे, या आनंदाच्या
भरात त्यांना काही ओळी सूचल्या,
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवरती
खेडे आमच्या टेकडीवरती
नवी कविता घेऊन होळकर काचरे सरांकडे
गेले, “सर, मी आणखी एक कविता लिहिली आहे.”
काचरे सरांनी कविता बघताच कागद भिरकावून
दिला. होळकर अस्वस्थ झाले. काचरे सर म्हणाले, “अरे, कुठं आहे तुझं गाव टेकडीवरती? तुझ्या गावात कांदा
आहे. विहिरी आटल्या आहेत. पाणी नाही. राबणाऱ्या बायका आहेत; पण तुझ्या कवितेत वास्तव
कुठंच नाही. अशी कविता असते का?”
काचरे सरांच्या शब्दांचा होळकरांच्या
मनावर खोल परिणाम झाला. वास्तवापासून दूर जात उगाच कविकल्पना करण्यात अर्थ नाही, याची
त्यांना जाणीव झाली. त्यावर ते म्हणतात, “डोळ्याला जे दिसतं, जे काळजाला भिडतं, ज्याचे ओरखडे आपल्या
ह्रदयावर उमटतात, ते आपल्याला कवितेत आणता आलं पाहिजे, हे मी काचरे सरांकडून शिकलो.
त्यांनी माझ्यासारख्या ओबडधोबड झाडाची छाटणी केली. त्याला आकार दिला. मला बहकू दिले
नाही आणि बाजारी कवी होऊ दिले नाही.”
प्रकाश होळकर यांच्या कवितांमध्ये, गीतांमध्ये ग्रामीण जीवन आणि निसर्ग यांचे अत्यंत तरल आणि वास्तववादी चित्रण असते. त्यांच्या कवितेतून माती हा
केवळ एक पदार्थ नसून ती एक ‘जिवंत
संवेदना’ असल्याची खात्री पटते. शेती, माती आणि नाती यांच्यातील अतूट नाते
त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रकट होत असते. कष्टकरी
शेतकऱ्याचे जगणे, त्याचा घाम आणि
त्यातून फुलणारी सृष्टी, याचे यथार्थ दर्शन त्यांच्या कवितांमधून
घडते.
होळकरांच्या कवितांमध्ये निसर्ग केवळ पार्श्वभूमी म्हणून येत
नाही, तर तो एका सजीव
पात्रासारखा वावरतो. पाऊस, ऊन, वारा आणि झाडे-वेली यांना ते मानवी भावना
बहाल करतात. ते अत्यंत साध्या; पण
प्रभावी प्रतिमा वापरून निसर्गाचे सौंदर्य मांडतात. रानाफुलांचा सुगंध, पहाटेची थंडी किंवा शेतात राबणाऱ्या
बैलांविषयीची माया त्यांच्या कवितेत ओतप्रोत भरलेली असते. निसर्गातील बदलांचा
मानवी मनावर होणारा परिणाम ते अतिशय सूक्ष्मपणे टिपतात. पावसाच्या प्रतीक्षेत करपून जाणारी कोवळी पिके आणि पिचली जाणारी शेतीमातीतली माणसे यातील आर्तता त्यांच्या कवितेतून प्रतीत होते. ‘घामाचा
गंध आणि मातीचा छंद’ यांचा सुरेख संगम त्यांच्या कविता
आणि गीतांमध्ये असतो. प्रकाश होळकर ग्रामीण
भागातले केवळ निसर्गरम्य चित्र न रंगवता, तिथल्या भीषण वास्तवावरही ‘प्रकाश’ टाकतात.
प्रकाश होळकर दहावीत नापास झाल्याची आठवण सांगत असताना अरुण शेवते यांचे ‘नापास
मुलांचे प्रगतिपुस्तक’ हे पुस्तक आठवले. अमिताभ बच्चन आकाशवाणीच्या; तर स्मिता पाटील
दूरदर्शनच्या वृत्तनिवेदकाच्या परीक्षेत नापास झाल्या होत्या. किशोरी आमोणकर महाविद्यालयात
पहिल्या वर्षी नापास झाल्या होत्या. व्ही. शांताराम यांना विद्यापीठ परीक्षेच्या आधीच्या
चाचणी परीक्षेत अपयश आले होते. डॉ. श्रीराम लागू चौथीच्या परीक्षेत आणि एमबीबीएसच्या
शेवटच्या वर्षात नापास झाले होते. नेल्सन मंडेला एल.एल.बीच्या परीक्षेत अनेक वेळा अपयशी
ठरले होते. शाहरुख खान हिंदीच्या चाचणी परीक्षेत नापास होत असे. न्यूटनला शिष्यवृत्तीच्या
परीक्षेत अपयशाला सामोरे जावे लागले होते. श्री. शेवते यांच्या पुस्तकातले एक वाक्य
आहे, “अनेकदा
अपयशाची चाहूल काही माणसांना लगेच लागते. त्याक्षणी ते अपयशाची सुरू होणारी पाऊलवाट
पुसून टाकतात.”
होळकरांनीदेखील अपयशाची पाऊलवाट त्याक्षणीच
पुसून टाकली होती. साहित्य आणि चित्रपट सृष्टीत जागोजागी त्यांच्या कीर्तीच्या पाऊल
खुणा उमटल्या आहेत. त्यांच्या कविता किंवा गाणी असंख्य आज रसिकांच्या ओठी असतात. त्यांना
आतापर्यंत महाराष्ट्र शासनासह विविध संस्था, संघटांनी असंख्य पुरस्कार देऊन गौरविले
आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे किशोरवयीन जीवनात आपल्या गावातल्या दोन- चार लोकांनी कवी
म्हणून आपल्याला ओळखावे, यासाठी धडपडणारा प्रकाश आज अवघ्या महाराष्ट्राला ग्रामीण आणि
निसर्ग कवी ‘प्रकाश होळकर’ म्हणून परिचित झाले आहेत. लासलगावात तर ‘प्रकाश होळकरां’ऐवजी
‘कवीदादा’ या नावानेच ते ओळखले जातात, यापेक्षा दुसरी आणखी चांगली ओळख काय असू शकते.
अशा या कविदादाला
वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
-डॉ. जगदीश मोरे