Saturday, 21 February 2026

निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न

गाव झालं लई न्यारं!

पावसाळा संपला. ढेकळांचे अमाप पीक आले, हे नित्याचेच झाले. दुष्काळ दरवर्षीच येतो; परंतु लोकांनी कधी तरी, केव्हा तरी स्वप्नात इथल्या मातीचा साक्षात्कार बघितला. एका जिद्दीने रात्रंदिवस राबून कोसळलेला थेंब अन् थेंब जागीच जिरवला. सोन्याचा कोंभ रूजवून काढला. वैराण रानात नक्षत्रतारकांचे लखलखते जीवन तरारून आले! हे शब्द आहेत ना. धो. महानोरांच्या कवितेतले; पण ही कथा खानदेशातली नाही. ती आहे माणदेशातली; परंतु ती व्यंकटेश माडगुळकरांच्या ‘बनगरावडी’तल्या मास्तरांची नाही. ती आहे माणदेशातल्या निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांची. त्यांच्या माणसांची, तिथल्या मातीची, अर्थातच ‘दळवी पॅटर्न’ची!

गावाच्या परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या दळवी यांच्या प्रयत्नांची फलश्रुती पत्रकार व लेखक सुनील चव्हाण यांनी ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केली आहे. हे पुस्तक म्हणजे ग्रामविकासाचे ‘हँडबुक’ किंवा ‘कार्यपुस्तिका’ आहे. शेती आणि ग्रामीण विषयाचे जाणकार असलेले चव्हाण यांनी एका दुर्लक्षित, दुष्काळी खेड्याच्या परिवर्तनाचे चित्र शब्दबद्ध केले आहे.

खटाव तालुक्यातील (जि. सातारा) निढळचे भूमिपूत्र असलेले दळवी यांनी सुवर्णपदकासह एम.एस्सी. (ॲग्री) पदवी संपादन केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 1983 मध्ये उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारीसह विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. प्रशासकीय सेवा कार्यकाळात दळवी यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना, महत्मा गांधी तंटामुक्त गाव योजना आदी अनेक योजना संकल्पित करुन शासनाच्या वतीने त्यांची राज्यस्तरावर अंमलबजावणी केली.

घार उडे आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी’ या म्हणीप्रमाणे श्री. दळवी शासकीय सेवेनिमित्त कुठेही असले तरी त्यांचा एक पाय सतत गावकडे असायचा. त्यातूनच त्यांनी निढळमध्ये परिवर्तन घडवून आणले. ते 2018 मध्ये पुणे विभागीय आयुक्त म्हणून निवृत्त झाले; परंतु आपल्या जन्मगावचा केलेला कायापालट म्हणजे निवृत्तिनंतरचे त्यांचे उफाळून आलेले प्रेम नाही. त्यासाठी ते गेली चार दशके झटत होते. प्रशासकीय सेवेतील जबाबदाऱ्या सेवाभावी वृत्तीने पार पाडत असतानाच निढळच्या विकासावर ते जातीने लक्ष देत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ग्रामसुधारणेचा मूलमंत्र। सज्जनांनी व्हावे एकत्र। संघटना हेचि शक्तीचे सूत्र। ग्रामराज्य निर्माण करी॥ या ओव्यांचा ते अखंड कृतिशीलपणे जप करत राहिले.

आपल्या भविष्याची किंवा समृद्धीची गुरुकिल्ली आपल्याच हाती आहे, ही जाणीव निढळच्या ग्रामस्थांमध्ये रुजविण्यात श्री. दळवी यशस्वी झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिकत असताना त्यांनी आपल्या गावावर संशोधनात्मक प्रबंध तयार केला होता. जवळपास 750 माणसे मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांत रोजगारासाठी स्थलांतरीत झाल्याचे त्यांना आढळले. गावतली शाळा बंद पडण्याच्या वाटेवर होती. सततच्या दुष्काळाने गाव आपले गावपण हरवून बसले होते.

निढळकरांना एकत्र आणण्यासाठी 1983 च्या दिवाळी पाडव्याला त्यांनी घेतलेल्या ग्रामसभेत परिवर्तनाचे बीज अंकुरले. ‘निढळ नोकरवर्ग आणि व्यावसायिक संघटने’ची स्थापना केली. लोकवर्गणीतून विद्यालयाची भव्य इमारत उभी केली. गावातील विविध कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीशिवाय भौतिक विकासाला अर्थ नाही, या जाणिवेतून दळवी यांनी गावाच्या पाणलोट विकासाचा संकल्प केला; पण पदरी अपयश येऊन हा ‘नाबार्ड’चा हा प्रकल्प रद्द झाला. दळवी निराश झाले; पण हतबल झाले नाहीत. नाबार्डच्या मदतीने पुन्हा नव्याने 2006 मध्ये 1.46 कोटी रुपयांचा पथदर्शी पाणलोट विकास प्रकल्प हाती घेतला आणि तो विक्रमी वेळेत पूर्ण केला. हा तपशील रंजक आहे. 

निढळचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी 525 मिमी. आहे; परंतु पाणलोट विकासामुळे सिंचनाच्या सुविधा आल्या. बागायती पिके गावात वाढली. शेतीपूरक व्यवसाय सुरू झाले. भौतिक विकासातही गाव पुढे गेले. दलित वस्त्यांचा विकास केला गेला. विविध सुविधा गावच्या पायाभूत विकासाची साक्ष देतात. ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत एखादे कॉर्पोरेट पद्धतीचे कार्यालय वाटते. एखाद्या खेड्यात साडेतीन एकरवर सुंदर व प्रशस्त उद्यान असू शकेत, यावर क्षणभर पुस्तक वाचताना विश्वास बसत नाही. वाड्या-वस्त्या डांबरी रस्त्याने जोडल्या गेल्या. या गावाला चक्क रिंगरोड आहे.

श्री. दळवी यांनी व्यक्तिकेंद्रीत दृष्टिकोन न ठेवता गावाला केंद्रबिंदू मानून पावले टाकली. उत्साहाने सळसळणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज उभी केली. आजी- माजी सैनिकही ग्रामविकासात स्वत:ला झोकून देऊन योगदान देत आहेत. महिलांनाही ग्रामविकासात सहभागी करुन घेतले आहे. निळकंठेश्वर पतसंस्था, कार्यकारी सेवा संस्था, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा ह्या गावातल्या मुख्य अर्थवाहिन्या बनल्या आहेत. एकेकाळी मनिऑर्डवर चालणाऱ्या या गावात आता कोट्यवधींचे व्यवहार कसे होऊ लागले याचे उत्तर पुस्तकातून मिळते.

अध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीच्या वाटेवरही निढळ अग्रेसर आहे. दळवींच्या प्रयत्नांनी गावातील हेमाडपंथी पुरातन महादेव मंदिराचा 1996 मध्ये जीर्णोद्धार घडवून आणला. अंधश्रद्धा निर्मुलन आणि व्यसनमुक्तीसारख्या चळवळीही गावात रुजविल्या. गावाने ‘संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात’ प्रथम क्रमांक पटविला. ‘निर्मल ग्राम पुरस्कारा’नेही निढळचा सन्मान झाला. ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजने’तेही निढळने बाजी मारली आहे. या गौरवास्पद कामगिरीचे गमक सविस्तरपणे या पुस्तकातून उलगडत जाते.

शेती- मातीच्या भवतालातला अंधार गड होण्याची भीती संभवताना शेतकरी व ग्रामस्थांमध्ये स्वावलंबी आणि स्वाभिमानी आयुष्य जगण्याची उमेद जागविण्याचा ध्यास श्री. दळवी यांनी ऊरी बाळगला होता. तो चार दशकानंतर फलश्रुत झाला. निढळमधून रोजगारासाठी होणारे स्थलांतर आता जवळपास थांबले आहे. बाहेर गेलेली माणसं गावात परतू लागली आहेत. सर्वांगीण विकास झाला की माणसं खेड्यांकडे वळू शकतात. निढळ हे त्याचं उदाहरण आहे. दुष्काळी आणि दुर्लक्षित खेडे असलेले निढळ आता ‘परिपूर्ण गाव’ किंवा ‘स्मार्ट व्हिलेज’ कसे झाले? याचे कथनही हे पुस्तक करते. निढळच्या धरतीवर राज्यातील इतर गावांचा विकास व्हावा यासाठी दळवी यांनी समविचारी लोकांना बरोबर घेऊन सत्त्व फाउंडेशनची स्थापना केली. त्याची माहिती पुस्तकात आहे. पुस्तक संपूर्ण रंगीत असून त्यात निम्मी पाने जवळपास छायाचित्रे आहेत. निढळच्या विकासाची ती साक्ष आहे.

प्रख्यात अभिनेते आणि ‘नाम फाऊंडेशन’चे नाना पाटेकर यांची ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाचा केवळ मसुदा वाचून त्यांनी प्रस्तावना लिहिलेली नाही. त्यासाठी त्यांनी निढळला भेट दिली. गावात एक दिवस मुक्कामही केला. सगळी विकासकामे स्वतः पाहिली. एका माणसाने ध्यास घेतला तर काय आणि किती करु शकतो, याचं हे उदाहरण आहे. निढळ गावाचा कायापालट ही चंद्रकांतची कमाल आहे, असे श्री. पाटेकर यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे.

(निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न, लेखक: सुनील चव्हाण, पृष्ठे- 200,   प्रकाशक: सत्त्व फाउंडेशन, पुणे. संपर्कासाठी लेखकाचा भ्रमणध्वनी क्र. 9403855345)  

                                                                                                   -डॉ. जगदीश मोरे