Monday 17 April 2017

शेतीला जोड कृषी पर्यटनाची...



            गावाचा निसर्गरम्य परिसर, स्वतःची शेतीवाडी आणि थोडीशी कल्पकता असेल, तर निश्चितपणे कृषी पर्यटन व्यवसायाची चांगली सुरवात करता येते. असाच प्रयत्न रायगड जिल्ह्यातील मांडवा (दस्तुरी) येथील विजय पाटील यांनी केला आहे. कृषी पर्यटनामुळे भाजीपाला, फळांना बाजारपेठ मिळाली, उत्पन्नाचा नवा स्रोतही मिळाला….
            
मुंबई- गोवा महामार्गाने वडखळ फाट्यावरून अलिबागला जावं लागतं. मुंबईपासून अलिबाग १०८ किलोमीटरवर आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मांडवा हे जवळचं बंदर. अलिबागपासून मांडवा वीस किलोमीटरवर आहे. कोणत्याही मार्गापेक्षा गेट वे ऑफ इंडियावरून बोटीने मांडव्याला आणि पुढं तेथून अलिबागला जाणं अत्यंत सुलभ आहे. बोटीच्या प्रकारानुसार ४० ते ५५ मिनिटांत हे अंतर पार करता येतं.
            अलिबाग, मांडवा परिसर निसर्गरम्य आहे. त्याबरोबरीने परिसरात चांगले समुद्र किनारे असल्याने वर्षभर पर्यटकांचा ओघ असतो. त्यामुळे अलिबाग आणि लगतच्या गावांमध्ये गेल्या काही वर्षांत पर्यटन संस्कृती चांगलीच रुजली आहे. या परिसरात निवास व्यवस्था सहज उपलब्ध होते. गाव परिसरात पर्यटन व्यवसाय वाढत असताना त्यामध्ये स्थानिकांना सामावून घेतल्याशिवाय पर्यटन संस्कृती रुजणं अशक्य आहे. याचा विचार करून परंपरा, अधुनिकता आणि रोजगाराची सांगड घालत महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने निवास व न्याहरी योजनेची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळाली. स्थानिक संस्कृतीचे जतन आणि संवर्धनला हातभार लागला. परिसरातील पूरक व्यवसायांना चालना मिळाली. महत्त्वाचं म्हणजे या उपक्रमामुळे पर्यटकांची वाजवी दरात सोय होते. याच योजनेतून मांडवा (दस्तुरी) येथील विजय पाटील, सौ. वैशाली पाटील यांनी घरच्या शेतीमध्ये मांडवा व्ह्यूव वीकेंड होमहे एक छोटसं पर्यटन केंद्र विकसित केलं आहे.
शेतीवर उभारले पर्यंटन केंद्र
            अलिबाग
तालुक्यातील मांडवा (दस्तुरी) गावात विजय पाटील यांची शेती आहे. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर विजय पाटील गावी शेतीवर राहायला आहे. या गाव परिसरात निसर्गरम्य किनारे, भाजीपाला लागवड, आंबा, नारळाच्या बागा असल्याने पर्यटकांचा वर्षभर ओढा कायम असतो. हे लक्षात घेऊन त्यांनी शेतीबरोबरीने कृषी पर्यटन केंद्राची सुरवात केली. त्याची माहिती देताना श्री. पाटील म्हणाले, माझी मांडवा अलिबाग रस्त्यावर १५ गुंठे आणि जवळच्या परिसरात साडेतील एकर शेती आहे. त्यामुळे मी शेतीला जोड व्यवसाय म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने निवास व न्याहरी योजनेतून पर्यटन केंद्र सुरू केले. रस्त्याजवळील जागेत स्वतःसाठी घर तसेच पर्यटकांना राहण्यासाठी सर्वसुविधांसह दोन खोल्या बांधल्या. घराच्या परिसरात परसबाग फुलविली. यामध्ये हंगामानुसार चेरी टोमॅटो, पालक, चवळीची भाजी, लाल माठ, ब्रोकोली, वांगी, कोथिंबीर लागवड करतो.
            घरासमोर शेणानं सारवलेलं अंगण आहे. अंगणाच्याकडेने डेरेदार आंब्याची कलमे बहरलेली आहे. त्यामुळे नैसर्गिक सावलीत पर्यटक अंगणात जेवायला बसतात. निसर्गाचा आनंद घेतात. आमच्याकडे शनिवार- रविवारी किमान १५ ते २० पर्यटक मुंबईहून येतात. प्रति माणशी दोन जेवण, नाश्ता, राहणे असे आम्ही हजार रुपये घेतो. सुटीचे दिवस वगळून इतर दिवशी दरात सवलत दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीचे दर आकारतो. घरगुती पद्धतीने शाकाहारी, मांसाहारी जेवण ही आमची खासियत. काही पर्यटक जेवणासाठी खास आमच्याकडे येतात. माझी बायको सौ. वैशाली ही स्वयंपाकघर सांभाळते. मी शेती सांभाळतो. पर्यटकांना परिसरातील शेतीची माहिती देतो. आम्ही दोघेच बहुतांश शेती आणि पर्यटन व्यवसाय सांभाळतो. गरजेनुसार स्वयंकापासाठी महिला मदतनीस घेतली जाते.असं त्यांनी सांगितलं.
भाजीपाला शेतीत सुधारणा
            शेती व्यवस्थापनाबाबत  श्री. पाटील म्हणाले, माझी गाव परिसरात वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती आहे. तेथे पावसाळ्यात भात शेती करतो. त्यानंतर रब्बी, उन्हाळी पिकांची लागवड केली जाते. यामध्ये तोंडली, दुधी भोपळा, कारले, पालेभाज्या, कोथिंबीर, टोमॅटो, वाल, ज्वारीची लागवड असते. शक्यतो शेतीसाठी आम्ही सेंद्रिय खतांचाच जास्तीत जास्त वापर करतो. माझ्या भावाकडे तीन म्हशी आहेत. त्यामुळे शेतीसाठी पुरेशी शेणखताची उपलब्धता होते. पर्यटकांच्या स्वयंपाकासाठी शेतीमधील धान्य, कडधान्य, भाजीपाल्याचा जास्तीत जास्त वापर करतो. जास्तीचा भाजीपाला व्यापाऱ्यांना विकतो. पर्यटक माझ्या शेतीलाही भेटी देतात. भाजीपाला, फळांची स्वतः तोडणी करतात. तोच भाजीपाला आम्ही स्वयंपाकासाठी वापरतो. मी शहरी पर्यटकांना शेतीमधील पीक पद्धती, सेंद्रिय शेती, पशुपालनाची माहिती देतो. त्यामुळे पर्यटकांना शेती व्यवस्थापनाची माहिती कळते. शेत शिवार फिरण्याचा त्यांना आनंद मिळतो. पर्यटक जाताना पालेभाजी, आंबे, जांभूळ, करवंदे खरेदी करतात. त्यामुळे भाजीपाला, फळांना चांगला दर मिळतो.
निसर्गरम्य परिसराची मिळाली साथ
            मांडवा (दस्तुरी) गाव परिसर हा निसर्गरम्य आहे. गावाजवळ मांडवा बीच आहे. सहा किलोमीटरवर किहीम बीच आहे. अर्ध्या भागात विस्तीर्ण वाळू आणि अर्ध्या भागातील खडकांवर आदळणाऱ्या लाटांच्या तुषारांत पर्यटकांना सेल्फीही काढता येतो. येथे पर्यटकांना शहाळे, ताडगोळे मिळतात. सतरा किलोमीटरवर अलिबाग बीच, कुलाबा किल्ला आहे. अलिबागच्या कोळी वाड्यात वाळत घातलेले मासे, जेट्टीवर मासेमारी बोटींची ये-जा, माशांची प्रत्यक्ष हाताळणी पर्यटक अनुभवतात. त्यामुळे असा या निसर्गरम्य परिसराचा उपयोग श्री. पाटील यांनी कृषी पर्यंटनासाठी चांगल्या प्रकारे करून घेतला आहे.
घरगुती जेवणाला पर्यटकांची पसंती
            विजय पाटील हे पर्यटकांची जेवणाची सोय घरीच करतात. वैशाली पाटील या स्वतः स्वयंपाक करतात. या भागात ताजी गावठी मासळी मिळते. पर्यटकांच्या जेवणात जिताडा मासा, तळलेले मासे, माशांचं कालवण, कोळंबीचं लोणचं, खारवलेले मासे, गावरान कोंबडी, सुकं चिकन, काजू गऱ्यांची भाजी, काजूकरी, कोंबडीवडे, तांदळाची भाकरी, तांदूळ आणि नाचणीचे पापड, जोडीला सोलकढी! सर्व काही घरच्या चवीचे असते. पर्यटकांची आवड आणि मागणीनुसार जेवणाची व्यवस्था केली जाते. त्यामुळे काही पर्यटक खास जेवणासाठी पाटील यांच्या घरी येतात. जाहिरात न करता केवळ पर्यटकांच्या ओळखीतून आणि मौखिक प्रचारातून पाटील यांनी कृषी पर्यटनात स्वतः ओळख तयार केली आहे.
संपर्क: श्री.विजय पाटील,
मोबाईल- ९२७०५५८५५५.
(
लेखक राज्य निवडणूक आयोग, मुंबई येथे जनसंपर्क अधिकारी आहेत.)

Wednesday 5 April 2017

फरक पडतो!

मित्रांनो, तुम्ही नागरिकशास्त्राच्या धड्यात महानगरपालिकेचे कार्य आणि जबाबदाऱ्या शिकला आहात. कोण सांगू शकेल बरं ते, जाधव सरांनी विचारलं.
विनित बोट वर करत म्हणाला, सर महानगरपालिका आपल्या शहराची स्वच्छता राखते. शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पुरविते...
बरोबर, आपल्याकडे शहरी आणि ग्रामीण अशा दोन प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती या शहरी; तर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या संस्थांवर गाव आणि शहरातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेबरोबरच रस्ते, परिवहन, पाणी पुरवठा, जन्म- मृत्यूच्या नोंदी, रस्त्यांवरील दिवाबत्ती इ. पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असते, सरांनी अधिक तपशीलवारपणे स्पष्ट केलं.
वर्गभर नजर फिरवत जाधव सरांनी पुन्हा बोलायला सुरवात केली, विद्यार्थ्यांनो, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेला म्युनिसिपालिटी असं म्हणतात. मध्यम व गरीब वर्गातल्या लोकांच्या जिविताचा आणि म्युनिसिपालिटीचा अगदी निकटचा संबंध आहे. म्युनिसिपालिटीचा कारभार मध्यम व गरीब वर्गाच्या प्रतिनिधींच्या तंत्रानेच चालला पाहिजे.असं भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या 1 मार्च 1929 च्या अग्रलेखात नमूद केलं आहे. सर्वसामान्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था किती महत्वाच्या आहेत, हे आजही नव्यानं सांगण्याची गरज नाही.
सर, पण त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था असं का म्हणतात? ऊर्वीनं विचारलं.  
सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या तत्वानुसार स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा पुरविण्याचं काम या लोकनियुक्त संस्था करतात. म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाम्हणतात.
सर, गांधीजींचे स्वराज्याविषयीचे विचार आम्ही इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहेत. सलीम म्हणला.
सलीमकडं कटाक्ष टाकत जाधव सर म्हणाले बाळा, बरोबर! गांधीजींनी स्वराज्यासाठी अहिंसक मार्गानं मोठा लढा दिला. इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वतंत्र करणं म्हणजे स्वराज्य मिळवणं, याचा अर्थ आपलं स्वत:चं राज्य म्हणजे स्वराज्य. गांधीजींनी पंचायत व्यवस्थेवरही मोठा भर दिला होता. ते म्हणतं की, प्रत्येक गाव एक गणतंत्र असेल व तिथं पंचायत असेल. तिला सर्वाधिकार असतील. भारताच्या खऱ्या लोकशाहीत प्रत्येक गावाला एक घटक मानलं जाईल. पंचायतीचा कारभार त्याच गावातील लोक पाहतील.ग्रामपंचायत असो किंवा महानगरपालिका तिचा कारभार लोकनियुक्त प्रतिनिधींमार्फत चालविणं म्हणजे ती स्वतंत्र असणं, असा त्याचा अर्थ घेता येईल.
विनितला पुन्हा प्रश्न पडला, सर, लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणजे काय?
मतदारांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी किंवा त्यालाच लोकप्रतिनिधी असंही म्हणतात. 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असतो. त्यासाठी मतदार यादीत नाव असावं लागतं. मतदार यादीत नाव असलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क प्राप्त होतो. सरांनी स्पष्ट केलं.
सर, मतदान नाही केलं तर काय फरक पडतो. दोघा- तिघांनी एका सुरात विचालं.
भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे। आपुल्या मतावरीच साचे।
एकेक मत लाखमोलाचे। ओळखावे याचे महिमान।।
मत हे दुधारी तलवार उपयोग न केला बरोबर।
तरी आपुलीची उलटता वार आपणावर शेवटी।।
सरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ओव्या म्हणत सुरवात केली, बाळांनो, परीक्षेत रिकाम्या जागा भरा यातलं एखादं उत्तर अपूर्ण राहिलं किंवा एखादं गणित चुकलं तर तुमच्या एकूण गुणांमध्ये फरक पडतो. अशा एकेका गुणाचे प्रश्न सोडवायचे राहिल्यास तुमच्या एकूण गुणांची टक्केवारी कमी होते. दहावी किंवा बारावीत एक गुण कमी मिळाला म्हणून आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्यास काय होते ? सरांनी विद्यार्थ्यांनाच प्रश्न विचारला.
सर, संपूर्ण आयुष्यावर फरक पडतो. विद्यार्थींनी एकसाथ उत्तर दिले.
फरक पडतो ना! तसाच फरक एका मतानंही पडतो. एका मतानं आपल्या गावाचं, शहराचं पर्यायानं देशाचं भविष्य बदलू शकतं. थोडक्यात आपल्या गावाचं किंवा शहराचं भवितव्य आपल्या हातात असतं.
अबोल असलेल्या प्रवीणनं हळूच विचारलं, सर, ते कसं?
बाळांनो, तुम्ही अजून मतदार नसला तरी तुमचे आई-वडील, आजी- आजोबा कदाचित मोठे भाऊ- बहीण मतदार असतील. या प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे. शिवाय ते फार विचारपूर्वक करायला हवं. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये. गिफ्ट किंवा पैशांच्या स्वरुपात आपल्या मताची किंमत करू नये. आपलं मत योग्य त्या उमेदवाराला दिलं पाहिजे. चांगले उमेदवार विजयी झाल्यास शहराचं किंवा गावाचं भविष्य बदलू शकतं. गंभीर चेहरा करत जाधव सर समजवून सांगत होते.
सर, मतदानाच्या दिवशी बाबांना आणि आईला एकाच दिवशी सुट्टी मिळते. त्यामुळे आम्ही पिकनिकला जातो. स्वातीनं उत्साहात सांगितलं.
बाळा, यात तुझी चूक नाही. तुला अजून मोठं व्हायचं आहे; पण तुझ्या आई- बाबांना सांग की, आपण हक्कांसोबतच कर्तव्यदेखील निभावले पाहिजे. मतदानामध्ये हक्क आणि कर्तव्य दोन्ही सामावले आहेत. भारतीय संविधानानं आपल्याला हा हक्क दिला आहे. सजग आणि सुजाण नागरिक म्हणून आधी मतदान करा मगच पिकनिकला जाऊ, असा आई- बाबांकडं आग्रह धरा. तर मग सांगाल ना बाळांनो, आपल्या आई- बाबांना मतदान करायला; कारण एका गुणाप्रमाणेच एका मतानंही फरक पडतो!